मुंबई : ‘ओला’, ‘उबर’ चालकांनी पुकारलेल्या संपानंतर आणखी एका कंपनीविरोधात कर्मचारी संपाचे अस्त्र उगारू शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. खाद्य पदार्थ घरपोच पोहोचवणारी ‘फूड पांडा’ कंपनी कर्मचाऱ्यांना जाहीर केलेली मजूरी देण्यात अयशस्वी ठरत आहे.
पाच महिन्यांपूर्वी अशरफ खान या तरुणाने कंपनीमध्ये रुजू होण्यासाठी मुलाखत दिली होती. त्यावेळेस त्याला १३२० रुपये दिवसाला मिळतील, असे सांगण्यात आले. यानुसार आठवड्याभरात ९ हजार ६०० आणि महिन्याला पन्नास हजारापर्यंत कमाई होते, असे प्रलोभन कंपनीतर्फे दाखवण्यात आले. नोकरी हवी असल्याने आणि कमाई जास्त असल्याचे पाहून खान याने ४५ हजाराची दुचाकी आणि ९ हजार ४०० रुपयांचा मोबाईल खरेदी केला.
पहिले चार महिने सर्वकाही सुरळीत सुरू होते. पहिल्या महिन्यात ५८ हजार रुपयांची कमाई झाली. दुसऱ्या महिन्यात ५५ हजार, त्यानंतर कंपनीने दिवसाला दिली जाणारी मजूरी नऊशे रुपयांवरुन ४५० रुपयांवर आणली. याविरोधात जाब विचारण्यासाठी कार्यालयात गेलो असता जमत नसेल तर काम सोडून द्या, असे उत्तर देण्यात आले. ‘ओला’ ‘उबेर’ चालकांच्या संघटना प्रतिनिधींशी चर्चा करुन संपावर जाण्याचा विचार सुरू असल्याचे ‘फूड पांडा’च्या चालकांचे म्हणणे आहे. आमचा या संपाला पाठींबा असेल, अशी माहीती सर्वोदय चालक संघटनेचे सरचिटणीस स.प. सोनी यांनी दिली आहे.
अन्यथा संप अटळ
खाद्य पदार्थ पोहोचवणाऱ्या कंपन्यांमध्ये ‘स्वीगी’ महिन्याला २ कोटी ग्राहकांना सेवा देते. ‘झोमॅटो’चे १ कोटी ८० लाख ग्राहक आहेत. ग्राहकांना ऑर्डर पुरवल्यानंतर चालकांना मजूरी दिली जाते. जितक्या जास्त ग्राहकांपर्यंत खाद्यपदार्थ पोहोचवले जातात तितकी दुचाकी चालकांची कमाई ठरते. दरम्यान संपाच्या प्रश्नावर ‘ओला’ आणि ‘फूड पांडा’ कंपनीने अद्याप प्रतिक्रीया दिलेली नाही. या प्रकरणी तोडगा न निघाल्यास चालक संपावर जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/