पोलीस आणि फासेपारधी समाजाचे तसे फार जवळचे नाते... आपल्या देशात प्रचलित विविध परंपरांसारखी ही देखील एक परंपरा... परंतु, फासेपारधी आणि पोलीस ही परंपरा एका विशिष्ट शिक्षित समाजाने केवळ आपल्या पोटाची खळगी भरू पाहणाऱ्या एका अशिक्षित समाजाविरुद्ध केलेल्या अन्यायामुळे उदयास आली आणि दुर्दैवाने ही परंपरा आजही सुरूच आहे. परिणामस्वरुप, फासेपारधी समाज पोलिसांच्या भीतीने डोंगराकडे वळला. पोटाची आग विझवण्यासाठी वणवण भटकू लागला. पण, केवळ ‘भटकणे’ हा एकमेव पर्याय नसतो. त्याला काहीतरी उपाय शोधायला हवा, या हेतूने याच समाजातील मतीन भोसले हा तरुणाने पुढाकार घेण्याचे ठरविले. शाळेतच आपल्या एका शिक्षकाकडून मतीनला समाजकारणाचे बाळकडू मिळाले. तो नववीत असताना वनवासी समाजातील लोकांना सरकारी कार्यालयांमध्ये फेऱ्या मारूनही जातीचे दाखले मात्र मिळत नव्हते. त्याच्या निषेधस्वरुप मतीनने समाजबांधवांना जातीचे दाखले प्राप्त व्हावेत, म्हणून २५ तरुणांना सोबत घेऊन अमरावती-नागपूर हायवेवर सहा तास ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. त्यामुळे सहा महिन्यांमध्ये तीन हजार फासेपारधी समाजातील लोकांना जातीचे दाखले मिळाले. समाज शिक्षित करण्यासाठी मतीनचे हे पहिले पाऊल होते. पुढे येणाऱ्या अनेक अडचणींना तोंड देत, कधी कधी पोटाला उपाशी ठेवत तो शिक्षण घेऊ लागला. पुढे त्याने डीएड् पूर्ण केले. डीएड्नंतर त्याला काही महिन्यांमध्येच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षकाची नोकरी मिळाली. पण, मतीनने जो संघर्ष आजवर केला होता, तो त्याचा वैयक्तिक संघर्ष होता. त्याला समाजकार्याची ओढ स्वस्थ बसू देत नव्हती. ज्यावेळी मतीनने आपल्याच समाजात नीट डोकावून पाहिले, त्यावेळी हाच समाज त्याला अतिशय मागास वाटू लागला. आपल्याच समाजातील कुणाचा बाप तुरुंगात, तर कोणाचे आई-बाप दोघेही कैदेत. मतीनच्या मग असेही लक्षात आले की, पोलिसांनी अनेक समाजबांधवांना ते अपराधी नसतानाही जेलबंद केले आहे. अशा बांधवांसाठी काही तरी करायलाच हवे, या भावनेने मग मतीनने समाजकार्याची दिशा निर्धारित केली.
या सर्व बाबींचा अभ्यास केला असता, समाजातील अज्ञानामुळे हे सर्व घडत असून समाजाच्या अज्ञानाचे मूळ कारण हे शिक्षणाचा अभाव असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यामुळे आपला समाज शिक्षित, सुसंस्कृत झाला पाहिजे, यासाठी त्याने नोकरी सोडली. पण पुढे प्रश्न होता की, या मुलांना शिकविण्यासाठी गोळा कसे करायचे? म्हणून मग मतीन या मुलांना गोळा करण्यासाठी वणवण भटकला. पण, त्याच्याच समाजातील हे लोक आपल्या मुलांना शिक्षणासाठी घराबाहेर पाठवायलाही तयार नव्हते. कारण, ही मुलेच त्या पालकांची रोजीरोटी होती. लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी मग मतीन डोंगराळ भागात जाऊन काही महिने थांबायचा. मुले शिकली तर काय होऊ शकते, याचा विश्वास त्यांच्यात निर्माण करायचा आणि मग त्या मुलांना सोबत घेऊन यायचा.
मतीनला आजही विविध समस्यांना सामोरे जावे लागते. मुले आणि मतीन दोघेही रोजीरोटीसाठी धडपडत आहेत. अल्पशा मानधनावर शिक्षक आणि इतर कर्मचारी काम करत आहेत. शाळेतील काही विद्यार्थ्यांना आजही तात्पुरत्या कुडाच्या हलणाऱ्या चार भिंतीमध्ये शिकावे लागत आहे. जालना येथील ‘मैत्र मांदियाळी’ या संस्थेने शाळेच्या १० वर्गखोल्या बांधण्यासाठी मदत केली असली तरी हे पुरेसे नसून इतर संस्थांनीही ‘प्रश्नचिन्ह’ला मदत करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/