अलाहबाद : साधू-संतांची सर्वात मोठी संस्था असणाऱ्या अखिल भारतीय आखाडा परिषदेने शिवसेनेने अयोद्धेत राम मंदीराच्या भूमिपूजनाचे आमंत्रण धुडकावत राम मंदिर प्रकरणी शिवसेना राजकारण करत असल्याचाही आरोप केला आहे. दरम्यान २५ नोव्हेंबर रोजी विश्व हिंदू परिषद आयोजित करत असणाऱ्या कार्यक्रमातही अखिल भारतीय आखाडा परिषदेचे साधू-संत सहभागी होणार नसल्याची प्रतिक्रीया आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांनी स्पष्ट केली आहे.
महंत यांनी शिवसेनेवर टीका करताना केवळ राजकारणासाठी राम मंदिराच्या मुद्द्याचा वापर करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. ते म्हणाले, “या नेत्यांना राम मंदिरापेक्षा राजकारणात रस आहे. शिवसेना आणि विहीप प्रचार करण्यासाठी असे कार्यक्रम करत आहेत.’’ सर्वांना राम मंदीर बांधायचे आहे तर मग वेगवेगळे कार्यक्रम का घेतले जात आहे, असा सवालही त्यांनी केला.
दरम्यान आखाडा परिषद ४ आणि ५ डिसेंबर रोजी अयोद्धेत बैठक घेणार आहे. यावेळी अयोध्या प्रकरणातील पक्षकार इक्बाल अन्सारी यांच्यासह अन्य मुस्लिम धर्मगुरू आणि राम मंदिर समर्थकांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. ‘बैठकीत राम मंदीर प्रश्नावर तोडगा काढू, असा आम्हाला विश्वास आहे.’, असे महंत गिरी यांनी म्हटले आहे.