हिंदूंवरच आक्रमण का?
हिंदू समाजातल्या लोकांना धर्माबद्दल आस्था-प्रेम नाही, असे अजिबात नाही, पण निधर्मीपणा आणि खोटी सहिष्णुता यामध्ये हजारो वर्षांपासून हा समाज गुरफटून गेला. काही लोक म्हणतात, “शंकराचार्यही आपलेच आणि चार्वाकही आपलाच. तथागत गौतम बुद्धांनाही आपण ‘भगवान’ संबोधून विष्णूचा अवतार मानतोच ना? ईसाईंचा येशू आणि मुस्लिमांचा मोहम्मद ही आपलाच मानण्याइतके मन मोठे ठेवा. अल्ला तेरो नाम, ईश्वर तेरो नाम. सबको सन्मती दे भगवान...” ‘हं, अल्ला तेरो नाम, ईश्वर तेरो नाम’ हे म्हणण्याची सद्बुद्धी प्रत्येकालाच असती तर प्रश्नच नव्हता. ज्याला कोणाला काय मानायचे आहे, त्यांना हिंदू समाजात स्वातंत्र्य आहे. पण, अल्ला असो वा येशू यापैकी अमुक एकाला तुम्ही मानलेच पाहिजे, यासाठी चालवलेला अट्टाहास, कूटनीती, दहशतवाद याचा निषेध आहे. ‘सिटी ऑफ होप’च्या बालदिनाला जमलेले बालक होते. वयाने आणि समजुतीनेही. धर्म, राजकारण यांचा त्यांना गंधही नसेल. पण, या बालकांच्या मनात त्यांच्या स्वधर्माबद्दल ‘किंतु’ टाकून ख्रिश्चन धर्माबद्दल आस्था देण्याचे काम केले गेले. मुळात धर्म मनातून उमटायला हवा. त्याची प्रेरणा अंतःकरणात स्फुरायला हवी. लहान मुलांच्या निरागसतेचा क्रूरपणे वापर करून त्यांनाच धर्मांतराचे बळी ठरवू पाहणार्यांना काय सजा होईल ती होईलच. पण, यामध्ये या बालकांचे पालकही कमी गुन्हेगार नाहीत. रक्ताचं पाणी करून ज्या मुलांसाठी आपण जगतो, त्या मुलांना आपण कोणत्या संस्थेच्या कार्यक्रमात पाठवत आहोत याची दखलही या पालकांना घ्यावीशी वाटली नाही? या संस्थेने बालमहोत्सवाचे पत्रक तयार केले होते. त्यात लिहिले होते की, येशूने म्हटले, “बालकांना माझ्याकडे येऊ द्या. त्यांना मनाई करू नका.” या कार्यक्रम पत्रिकेमध्ये प्रमुख वक्ता म्हणून रेव्ह. भालचंद्र कांबळे आणि उपासक ब्र. जॉन नहेम्या तसेच विशेष शास्त्रीय भजन गाण्यासाठी ब्र. रज्जू काळे आणि पपेट शोसाठी सिस्टर साळवी यांचे नावही छापले होते. आता ही सर्व मंडळी कोणता बालदिन साजरा करणार हे कुणालाही कळण्यासारखे होते. तरीही कोणतीही शहानिशा न करता परिणामांची चिंता न करता पालकांनी आपल्या मुलांना या कार्यक्रमाला पाठवले होते? का? या ‘का’चे उत्तर जे काही आहे, ते उत्तरच हिंदू समाजावर होणाऱ्या हजारो वर्षांपासूनच्या आक्रमणाचे कारण आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/