भिवंडी : “कल्याण-नगर रस्त्यावरील माळशेज घाटातील बोगद्याचे काम तातडीने सुरू करावे. तसेच काटईनाका-बोराडपाडा-म्हसा-माळशेज घाट रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा द्यावा,” अशी मागणी भाजपचे खा. कपिल पाटील व आ. किसन कथोरे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. या मागणीवर प्राधान्याने निर्णय घेण्याचे आश्वासन मंत्री गडकरी यांनी दिले.
पावसाळ्याच्या काळात दरड कोसळल्यामुळे माळशेज घाटातील वाहतूक ठप्प होते. या काळात कल्याणहून नगरकडे वा नगरहून कल्याणकडे येणार्या हजारो नागरीक, व्यापारी आणि प्रवाशांना चाकण, तळेगावमार्गे वळसा घालावा लागतो. या काळात नाहक वेळ व पैसा खर्च होतो. या पार्श्वभूमीवर माळशेज घाटातून बोगदा काढल्यास पावसाळ्याच्या काळात वाहतूक बंद राहणार नाही. या बोगद्याला सरकारने मंजुरीही दिली आहे. मात्र, त्याचे काम अद्याप सुरू झालेले नाही. या पार्श्वभूमीवर खा. कपिल पाटील व आ. किसन कथोरे यांनी काल मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. या मागणीचा प्राधान्याने विचार करण्याचे आश्वासन मंत्री गडकरी यांनी दिले.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/