रायपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडमधील सभेत काँग्रेस आणि गांधी घराण्यावर पुन्हा एकदा हल्लाबोल केला. तत्कालिन मनमोहन सिंह यांचे सरकार हे रिमोट कंट्रोलवरील सरकार होते, असे म्हणत पंतप्रधानांनी काँग्रेसवर निशाणा साधला. छत्तीसगडमध्ये २० नोव्हेंबरला दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महासमुंद येखे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. काँग्रेसच्या चार पिढ्यांनी देशात सत्ता उपभोगली, पण सर्वसामान्य जनतेच्या कल्याणाचा कधी विचारच केला नाही. त्यांनी फक्त एकाच घराण्याचा विचार केला. त्यामुळे ते जनतेच्या अपेक्षा पूर्ण करतील या त्यांच्या शब्दावर विश्वास कसा ठेवायचा असा सवाल मोदी यांनी यावेळी केला.
दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी मोदींच्या आव्हानाला उत्तर देत गांधी कुटुंबाबाहेरील अध्यक्षांच्या नावांची माहिती दिली होती. यावरुनच पंतप्रधानांनी रविवारी पुन्हा काँग्रेसवर पलटवार केला. ते अशा काँग्रेसच्या नेत्यांची नावे सांगत आहेत, जे अध्यक्ष बनले होते. मी त्यांना म्हणालो होतो की, ५ वर्षे अध्यक्ष बनवून दाखवा. मागासवर्गीय नेते सीताराम केसरींना त्यांनी अध्यक्ष बनवले होते. त्यांना कशा पद्धतीने उचलून फेकून सोनिया गांधींना अध्यक्षपदी बसवले होते. त्यांना पाच वर्षांचा कार्यकाळही पूर्ण करून दिला नव्हता, हे देशाला माहित असल्याचेही मोदी म्हणाले. तसेच आम्ही साडेचार वर्षांत काय केले, अशी विचारणा काँग्रेसकडून केली जाते. पण तुमच्या घराण्याच्या चार पिढ्यांनी या देशासाठी काय केले, असा सवाल पंतप्रधानांनी यावेळी केला. तसेच भारतीय जनता पक्षाच्या सरकारला पुन्हा एकदा संधी देण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
निवडणुकीला सर्वसामान्य समजू नका
या निवडणुकीला सामान्य निवडणूक समजू नका. जे युवक पहिल्यांदा मतदान करत आहेत, त्यांना त्यांच्या वडिलांनी, आजोबांनी जगलेले आयुष्य आणि त्यांनी झेलले संकट पुन्हा अनुभवायचे आहे का, तुम्हालाही असेच आयुष्य व्यतीत करायचे आहे का, असा सवालही मोदी यांनी केला.
काँग्रेसकडून जनतेला संभ्रमात टाकण्याचे काम
काँग्रेसक़डून नेहमीच खोटे सांगितले जाते. तसेच जनतेला संभ्रमात टाकण्याचेही काम करण्यात येते, असा आरोप मोदी यांनी यावेळी केला. कर्नाटक निवडणुकीपूर्वी काँग्रेसने शेतकर्यांच्या कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. मात्र, एक वर्षानंतरही अद्याप कर्जमाफी देण्यात आले नसल्याचेही त्यांनी सांगितले.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/