समग्र स्वच्छता अभियान!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Nov-2018
Total Views |



देशाच्या बाह्य शत्रूंशी शस्त्रास्त्रांनिशी लढता येते पण, देशांतर्गत शत्रूंचा बीमोड करताना सरकारला घटनात्मक तरतुदींचे पालन करावे लागते. संबंधितांचे हितचिंतक सर्वत्र दबा धरून बसलेले असतात!


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हातात झाडू घेत, परिसर स्वच्छता अभियानातून सर्वच क्षेत्रांच्या अंतर्बाह्य साफसफाईचा संदेश दिला होता. तो संदेश ज्यांना वाचता आला नाही, ती मंडळी दिवसेंदिवस बिनकामाची होत असून त्यांच्या बुडाखालची घाण उजेडात येत आहे. २४ तास केवळ राष्ट्रहिताचाच ध्यास घेतलेले नरेंद्र मोदी-कुठलाही निर्णय घिसाडघाईने घेत नाहीत. सखोल चिंतनानंतर, गृहपाठ करून, दूरगामी परिणामांचा विचार करून निर्णय घेतात. निर्णय घेण्यापूर्वी संबंधितांना पुरेसा वेळ देतात, तसे संदेश देतात. ज्यांनी संदेश समजून घ्यायचा प्रयत्न केला नाही त्यांची मोदींनी निर्णय घेतल्यानंतर त्रेधातिरपीट उडते, त्यांचा तोल जातो आणि ते अधिकाधिक गाळात रुतत जातात. आपण निर्णय घेतल्यानंतर येणाऱ्या संभाव्य प्रतिक्रियांविषयी नरेंद्र मोदी यांचे पूर्वानुमान आजपर्यंत कधी चुकले नाही. प्रतिकूल प्रतिक्रियांमधून विरोधक कसे उघडे पडतील, याची चतुर आखणी त्यांनी आधीच करून ठेवलेली असते. त्यामुळे विरोधकांनी मोदींसाठी खड्डा खोदावा आणि त्यात पडून विरोधकच जायबंदी व्हावेत, असे आजपर्यंत घडत आले आहे. पूर्वी योजना फक्त जाहीर व्हायच्या, गरिबी हटाओ! मोदीजी योजना जाहीर करतात आणि मुदतीत पूर्ण करतात. आंतरराष्ट्रीय समीक्षकांनी या अविचल मोदी-व्यक्तिमत्त्वाला जेवढे समजून घेतले आहे, देशांतर्गत कावीळग्रस्त मोदीविरोधक त्याच्या शेकडो योजने मागे आहेत. मानवकल्याण आणि विश्वशांती योगदान यासाठी केलेल्या अतुलनीय कार्यासाठी दक्षिण कोरियाच्या ‘सेऊल शांती पुरस्कारा’साठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जगभरातल्या तब्बल १३०० स्पर्धकांमधून निवड झाली आहे!

 

एक कथा अशी आहे : एका विधर्मी विदेशी टोळीने भूमिपुत्रांचे राज्य बळकावले आणि वेळोवेळी वेगवेगळे मुखवटे धारण करत राजघराणे म्हणून स्थिरावले. भूमिपुत्र जागे होतील आणि आपल्या घराण्याकडून राजसत्ता हिसकावून घेतील, याची धास्ती असल्यामुळे त्यांना सतत रंग बदलावे लागत असत. भूमिपुत्र विस्कळीत असल्यामुळे त्यातल्याच काहींना हाताशी धरायचे आणि इतरांवर सोडायचे. जनतेला फसविणे सोपे असते पण, नियतीला कुणीही फसवू शकत नाही. एके दिवशी राजाला यमराजाचा निरोप आला. “परवा सकाळी येतोय मी, आपल्याला सन्मानाने न्यायला.” राजा गडबडला! राजसत्ता सोडवता सोडवत नाही. मी नाही तरी, माझा कुणीतरी गादीवर बसला पाहिजे. यमराजाला गंडवायची षड्यंत्रं आकार घेऊ लागली. राजाचे हुबेहूब चार पुतळे तयार करून घेण्यात आले. यमराजाची चाहूल लागताच राजा पुतळ्यांच्या रांगेत जाऊन उभा राहिला. यमराजही क्षणभर गोंधळले-“धन्य तो राजा! धन्य त्याची रंगशाळा! मूर्तिकाराचं कसब काय वर्णावं! पाच मूर्तींतली कुठली मूर्ती दुसरीपेक्षा कुठे भिन्न आहे, हे मीही सांगू शकणार नाही. मी राजाला एक आनंदाची वार्ता सांगायला आलो होतो पण, ती या निर्जीव पुतळ्यांना सांगून काय उपयोग! राजाची भेट झाली असती, तर बरे झाले असते.” यमराजाने केलेली स्तुती ऐकून राजा पाघळला आणि यमराजासाठी त्याने फेकलेल्या जाळ्यात तो स्वतःच अडकला. मोदी विरोधकांची अवस्था याहून वेगळी नाही! राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजधानीत नरेंद्र मोदी म्हणाले होते, “एनसीपी म्हणजे नॅच्युरली करप्ट पार्टी!” नरेंद्र मोदी दुसऱ्या एका प्रसंगी असेही म्हणाले होते की, “साहेबांचे बोट पकडून मी राजकारणात आलो!” भाजपची एनसीपी आणि मोदींचा पवार होऊ देणार नाही, असा सांकेतिक अर्थ होता त्यात. भारतीय जनता पक्षाने जम्मू-काश्मीरमध्ये पीडीपीसोबत युती करून सरकार स्थापन केले आणि त्या सरकारमधून भाजप स्वतःच बाहेर पडला. मोदीविरोधकांना या दोन्ही घटनांचे नीट आकलन कधी करताच आले नाही. त्यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया एकमेकींना छेद देणाऱ्या निघाल्या आणि विरोधकांचे हसे झाले.

 

गुजरातमध्ये सतत १२ वर्षे तोंडघशी पडणाऱ्या काँग्रेसला, मुख्यमंत्री नरेंद्र मोदी ही वल्ली कधी कळलीच नाही आणि गेली साडेचार वर्षे पंतप्रधान नरेंद्र मोदी या व्यक्तीचेही त्यांना नीट मूल्यांकन करता आले नाही. झापडबंद मोदीविरोधातून विरोधकांचीच अधिकाधिक अधोगती होत गेली, काँग्रेसमुक्त भारत दृष्टिपथात येत गेला! नोटाबंदी, जीएसटी, सर्जिकल स्ट्राईक, राफेल व्यवहार, अखंड भारताचे पहिले पंतप्रधान सुभाषचंद्र बोस यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून दिलेली मानवंदना आणि त्यातून जागृत झालेली राष्ट्रचेतना, सीबीआयची स्वच्छता मोहीम... प्रत्येक वेळी मोदींनी विरोधकांची बत्तीशी त्यांच्याच घशात घातली! देशाची सर्वोच्च तपास संस्था सीबीआयने दिल्लीतल्या स्वत:च्याच मुख्यालयावर धाड टाकून भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी दोन मजले सीलबंद केले. केंद्रीय अन्वेषण विभागप्रमुख आलोक वर्मा आणि विशेष संचालक राकेश अस्थाना हे गेले काही दिवस एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत होते. त्यांच्या तक्रारी केंद्रीय सतर्कता आयोगापर्यंत गेल्या होत्या. केंद्रीय सतर्कता आयोगाने त्याची दखल घेऊन संबंधितांकडे स्पष्टीकरणही मागितले होते. आलोक वर्मा यांनी त्याला दाद दिली नाही. आपल्याला हवे ते खटले सरन्यायाधीश देत नाहीत म्हणून सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ न्यायाधीशांनी वार्ताहर परिषद घेऊन जी अभूतपूर्व परिस्थिती निर्माण केली होती, अगदी तशीच परिस्थिती सीबीआयमध्ये निर्माण करण्यात आली होती. इथेही अनेकांचे हितसंबंध गुंतलेले असू शकतात. सर्वोच्च न्यायालयासमोर उद्भवलेल्या पेचप्रसंगात मोदी सरकारने हस्तक्षेप केला नव्हता आणि या पेचप्रसंगातही केला नाही. भ्रष्टाचार निपटून काढायचा दृढ निर्धार केलेले मोदी एकीकडे आणि भ्रष्टाचाऱ्यांविरुद्धची आरोपपत्रं न्यायालयात दाखल होऊ नयेत म्हणून शर्थीचे प्रयत्न करणारे सीबीआयचे झारीतले शुक्राचार्य, न्यायालयात दाखल झालेले खटले लांबणीवर टाकायचे हातखंडे वापरण्यात तरबेज असलेली वकीलमंडळी दुसरीकडे! प्रत्येक क्षेत्रात भ्रष्टाचारी लॉबी कार्यरत आहे. केंद्रीय सतर्कता आयोगाच्या शिफारशीवरून सीबीआयवर कारवाई होताच, सीबीआयसह प्रवर्तन निदेशालय खडबडून जागे झाले. पी. चिदम्बरम यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल झाले, अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलच्या कार्यालयांवर धाडी पडल्या. याचा अर्थ, भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढाईला आधी कुणीतरी कुणाच्यातरी सांगण्यावरून खो घालत होते.

 

देशाच्या बाह्य शत्रूंशी शस्त्रास्त्रांनिशी लढता येते पण, देशांतर्गत शत्रूंचा बीमोड करताना सरकारला घटनात्मक तरतुदींचे पालन करावे लागते. संबंधितांचे हितचिंतक सर्वत्र दबा धरून बसलेले असतात. शहरी नक्षल्यांना पोलिसांनी अटक करण्यापूर्वीच त्यांच्यावतीने त्यांचे सहानुभूतीदार सर्वोच्च न्यायालयात जातात. ज्याच्या फाशीच्या शिक्षेवर राष्ट्रपतींनी शिक्कामोर्तब केल्यानंतरही प्रशांत भूषण प्रभृती त्या याकुब मेमनसाठी मध्यरात्री सर्वोच्च न्यायालयाला धडका देतात, रोहिंग्या-बांग्लादेशी घुसखोरांसाठी आपले कसब पणाला लावतात. मोदी सरकारने सीबीआयवर मध्यरात्री कारवाई केली म्हणून हीच मंडळी आता बोंबा मारत आहेत. राकेश अस्थाना यांची विशेष संचालक म्हणून नेमणूक झाली होती, तेव्हा पंतप्रधान मोदी आपली माणसं सीबीआयमध्ये घुसवत असल्याचा आरोप करणारी मंडळी आज त्याच अस्थानाला त्याच मोदी सरकारने सक्तीच्या रजेवर पाठविले, तर आकाशपाताळ एक करत आहेत. प्रशांत भूषण वगैरेंसोबत खाजगी हॉटेलात वारंवार बैठका घेणारा आलोक वर्मा हा कुणाचा माणूस आहे, ते काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सांगून टाकले. सीबीआयप्रमुख आलोक वर्मा हेराफेलबंधी कागदपत्रं जमा करत होते, म्हणून मोदींनी त्यांच्यावर कारवाई केली, अशी पहिली प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी दिली. ही गोपनीय माहिती राहुल गांधी यांना कुणी दिली? आलोक वर्मा यांनी? राफेलसंबंधी कागदपत्रं जमा करण्याचा आदेश आलोक वर्मा यांना कुणी दिला होता? राहुल गांधी यांनी? मोदी सरकारने तसा कुठलाही आदेश दिलेला नसताना आलोक वर्मा कुणाच्या सांगण्यावरून आगाऊपणा करत होते? आलोक वर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याच्या निर्णयाविरुद्ध प्रशांत भूषण सर्वोच्च न्यायालयात गेले. सर्वोच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली आणि आलोक वर्मा यांच्याविरुद्ध चौकशीलाही स्थगिती दिली नाही, तरीही राहुल गांधी आणि त्यांच्या काँग्रेसने आलोक वर्मा यांची सीबीआयप्रमुखपदी पुनर्स्थापना करा, त्यांच्याविरुद्धची चौकशी थांबवा म्हणून देशभर निदर्शने केली. आलोक वर्मा यांची पाठराखण राहुल गांधी कशासाठी करत आहेत? आलोक वर्मा कुणाची पाठराखण करीत होते?

 

मोदी सरकार सत्तेवर असतानाही महाराष्ट्रासह देशभरातले प्रतिष्ठित भ्रष्टाचारी अजून गजाआड कसे गेले नाहीत? असा सात्त्विक संताप आपण व्यक्त करीत असतो. मोदीजींनी त्यांच्याशी तडजोड केली की काय? अशी अभद्र शंकाही आपल्या मनात येऊन जाते. भाजप सरकार सत्तेवर आहे म्हणजे सगळ्या गोष्टी जादूची कांडी फिरल्यागत फटाफट व्हाव्यात अशी आपली अपेक्षा असते पण, त्यासाठी आपणही योगदान दिले पाहिजे, याचा मात्र विसर पडतो. काळ्या पैशाचा हिशेब मांडताना मोदींनी १५ लाखाचा उल्लेख केला होता. भारतावर असलेल्या कर्जाचा दरडोई हिशेब जर मोदींनी मांडला, तर ते फेडण्यासाठी १५ लाख मागणाऱ्यांपैकी किती लोक पुढे येतील? इज्जत की रोटी शान से खानेवाले कभी किसी से भीक नही माँगते! भ्रष्टाचाऱ्यावर कारवाई होताच त्याला जनतेची सहानुभूती मिळते. तसे नसते, तर कलंकित व्यक्ती समाजात वर तोंड करून फिरल्या नसत्या, परत परत निवडून आल्या नसत्या. कलंकितांना, भ्रष्टाचाऱ्यांना समाजात प्रतिष्ठा मिळवून देणार आम्ही. ते जामिनावर सुटून आले की त्यांचे जंगी सत्कार करणार आम्ही! ज्याला दारातही उभं करू नये, त्याला डोक्यावर घेणार आम्ही! अशांना दंडित करायचा मताधिकार आमच्या हातात असताना आम्ही त्यांना कायदेमंडळात पाठविणार आणि त्यांच्यावर कारवाई का होत नाही म्हणून वांझोटा संताप व्यक्त करणारेही आम्हीच! समाजाचा, मतदारांचा धाक वाटला असता, तर भ्रष्टाचाराच्या खटल्यात जामीन मागण्यासाठी पतियाळा हाऊस कोर्टाकडे निघालेल्या सोनिया-राहुल यांची जंगी मिरवणूक निघाली नसती. यांना जेव्हा अटक होईल, तेव्हा काँग्रेसवाले देशभर हैदोस घालतील. म्हणूनच मतदार भ्रष्टाचाराविरुद्ध दंड थोपटून कार्यरत असलेल्या मोदींचा पराभव करतील आणि आपण परत सत्तेवर येऊ, अशी स्वप्नं विरोधक बघत आहेत. भूतकाळात असे अनेकदा घडले आहे. कांदे-बटाट्याच्या बदल्यात महाभ्रष्टाचारी बोकांडी घेतले आहेत आम्ही! पेट्रोल-डिझेल, सबसिडी-आरक्षण-कर्जमाफी यांच्या बदल्यात मोदी सरकारलाही हाकलून द्या, म्हणजे भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई होण्याचा प्रश्न कायमचा निकालात निघेल. भारतीय मतदारांना भ्रष्टाचाराविषयी खरोखरच चीड असती, तर जयललिता, मायावती, लालूप्रसाद यादव पुन्हा पुन्हा निवडून आलेच नसते. विदुषकी चाळे करणाऱ्या अरविंद केजरीवाल यांचे कुठले कर्तृत्व दिल्लीकरांनी बघितले होते म्हणून ७० पैकी ६७ आपी आमदार निवडून दिले? मर्यादा, नैतिकता, साधनशुचिता याचे काटेकोर पालन करणारे अटलजींचे सरकार आम्ही घालविले. स्वतःच पंतप्रधान व्हायला निघालेल्या सोनिया गांधी यांना घटनात्मक अडचणी आल्या, म्हणून त्यांनी कळसूत्री सरकार स्थापन करून देशाची वाट लावली. तरीही सोनिया गांधी त्यागाची मूर्ती? दररोज भ्रष्टाचाराचे नवनवे विक्रम करणाऱ्या सोनिया सरकारला आम्ही सलग दहा वर्षे तसे करायला संधी दिली. आज त्याच सोनियाजी आपल्या खुशालचेंडू लेकाला पंतप्रधान म्हणून भारतावर लादण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. आम्ही सोनिया गांधींना नीट ओळखलेले नाही पण, त्यांनी आम्हाला पुरते जोखले आहे. अटलजींचे सरकार घालविणारे फुकटे भारतीय मतदार मोदींना पुन्हा पंतप्रधान होऊ देणार नाहीत, याची त्यांना खात्री वाटते. जामिनावर असलेल्या सोनिया गांधी यांना वाटणारी खात्री हा आमचा नैतिक पराभव आहे.

 

इंदिरा गांधी यांचे दणक्यात पुनरागमन का झाले? चौधरी चरणसिंह यांनी इंदिरा गांधी यांना अटक केली. त्याचे भांडवल करीत इंदिरा गांधी यांनी रस्त्यावरच ठाण मांडले. त्याची छायाचित्रं तमाम वर्तमानपत्रांच्या मुखपृष्ठांवर झळकली. स्वत:च्यास्वार्थासाठी देशावर आणीबाणी लादून साऱ्या देशाचा तुरूंग बनविणाऱ्या इंदिरा गांधी रातोरात इंदिरा अम्मा झाल्या आणि भावनाप्रधान भारतीयांनी त्यांना पुन्हा पंतप्रधानपदी नेऊन बसविले. सोनिया-राहुलना तशी संधी मिळू नये, याची खबरदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी घेत आहेत. इंदिराहत्येनंतर काँग्रेसवाल्यांकडून देशभर हजारो शिखांचे शिरकाण करण्यात आले, राजीव गांधींनी त्याचे जाहीर समर्थन केले, तरीही सहानुभूती शिखांऐवजी राजीव गांधींना मिळाली आणि आम्ही काँग्रेसचे ४००हून अधिक खासदार निवडून दिले. राजीव गांधी थेट पंतप्रधान झाले. भारतीय मतदार फार लांबचा विचार करत नाहीत. क्षणिक भावनेच्या भरात वाहवत जातात. देशहिताचा दूरगामी विचार करणाऱ्या नरेंद्र मोदी यांना भारतीय मानसिकतेची पुरेपूर जाणीव आहे. भ्रष्टाचारी, देशद्रोही यांच्या मुसक्या तर आवळायच्या आहेत पण, त्यांना इमोशनल ड्रामा करून जनतेची सहानुभूती मिळवायची संधी उपलब्ध करून द्यायची नाही, ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कार्यशैली आहे. शस्त्र न वापरता शिकार करायची आणि युद्ध न करता शत्रूला लोळवायचे. आत्महत्या करायला निघालेल्या विरोधकांवर गोळीबार करायचा नसतो, हे नेपोलियन-सूत्र मोदींनी आत्मसात केले आहे. काँग्रेस, चीन, पाकिस्तान यांनी मोदींच्या याच कार्यशैलीचा धसका घेतला आहे. आपल्या शपथविधी सोहळ्यास पाकिस्तानला सन्मानाने बोलावून, काबुलहून मायदेशी परतताना अचानक लाहोरला भेट देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकारात्मक संदेश दिले होते पण, पाकिस्तानचे वाकडे शेपूट सरळ झाले नाही. जगातल्या वेगवेगळ्या देशांनाही तसे संदेश दिले होते. चीन, पाकिस्तान आणि काँग्रेसला ते नीट वाचता आले नाहीत. आज या तिघांना एकमेकांशिवाय जगात कुणीही मित्र उरला नाही. भारतातील मुसलमान, पाकिस्तान, अरब यांना काय वाटेल याचा सतत विचार करणाऱ्या काँग्रेसने सहिष्णू हिंदुंची, दिलदार इस्रायलची सतत अवहेलना केली. आज इस्रायल आणि अरब जगत यांची भारताशी प्रगाढ मैत्री आहे. शस्त्रास्त्र विक्रीकरार करण्यासाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन भारतात आले आणि अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्याचे स्वागत केले. मोदींनी द्विध्रुवीय जगाला भारताची दखल घेणे भाग पाडले. भारत जगाचा केंद्रबिंदू बनत चालला आहे! केवळ साडेचार वर्षांत मोदींनी ही किमया केली आहे. वंदे मातरम्!

 

- सोमनाथ देशमाने

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@