मायानगरी मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर हजारो मुले महाराष्ट्रातून तसेच परराज्यांतून विविध कारणांसाठी दाखल होतात. त्यांची न कुठे दखल, ना कुणाला चिंता... पण, स्वत: प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षण घेऊन समाजकार्यासाठी आयुष्य समर्पित केलेल्या विजय जाधव यांनी या मुलांना जीवनदानच दिले. या कुटुंबापासून दुरावलेल्या मुलांना त्यांच्या घरी सुखरुप पोहोचविण्याचा जाधव यांनी विडा उचलला. ‘समतोल फाऊंडेशन’च्या माध्यमातून आज या सामाजिक कार्याचा वटवृक्ष बहरला आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याची प्रेरणा, त्यासाठी करावा लागलेला संघर्ष याचा विजय जाधव यांनी त्यांच्या आत्मकथेच्या माध्यमातून घेतलेला हा विचारवेध...
शिक्षणाने माणूस मोठा होतो,’ असे अनेकदा लहानपणापासून ऐकत आलो. लहानपणी म्हणजे चौथीत असताना. घरी सोयीसुविधा नसल्यामुळे शिक्षिकेच्या घरी म्हणजे आमच्या डावखरे बाई यांच्या घरी राहायचो. हळूहळू शिक्षणाची व शिकण्याची गोडी लागली आणि चौथीत स्कॉलरशिपमध्ये पुणे जिल्ह्यातून मी प्रथम क्रमांक पटकावला. खरं तर घरची परिस्थिती चांगली नसल्यामुळे मी बाईंकडे राहायचो. पण, लहानपणी चांगले संस्कार झाले, म्हणून नवनवीन गोष्टी जाणून घेण्याची आवड निर्माण झाली. स्कॉलरशिप कुठून येते? कशी येते? ती कोण देते? हे प्रश्न लहानपणीच पडले होते. पुढे दहावी उत्तीर्ण झालो. बारावीनंतरही नोकरी लागेल की नाही म्हणून चिंता होती, म्हणून तांत्रिक-व्यावसायिक प्रशिक्षण घ्यायचे ठरवले. आय.टी.आय करताना पैसे भरावे लागणार नाही, असा कोर्स निवडला आणि पॉवर प्रेस मशीन ऑपरेटर बनलो. घरातील काही मंडळी मुंबईला होती. विक्रोळीला राहत असल्याने गोदरेज कंपनी घराजवळच होती. तेथील काही लोकांशी भावाने चर्चा केली आणि गोदरेजमध्ये १९९६ ला कामाला लागलो. पण, कामात मन रमेना म्हणून काहीतरी वेगळे करावे, असे वाटले. तेव्हा गोदरेजमध्ये दत्ता सामंत यांची कामगार युनियन होती व युनियनचे काम काही कारणाने बंद पडले होते. आता ही युनियन काय असते, तर पुन्हा प्रश्न पडले तेव्हा एका मित्राच्या मदतीने ’नर्मदा बचाव’ आंदोलनातील कार्यकर्त्यांची ओळख झाली. कामात मन रमेना म्हणून नर्मदा घाटीमध्ये आंदोलनात सहभागी झालो. काही दिवसांनंतर सामाजिक कार्याचे प्रशिक्षण असते, डिग्री असते असे समजले. तेथे मुलांना जमा करण्याचे व शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम माझ्याकडे होते. आमच्या ग्रुपमध्ये आम्ही नर्मदा घाटीत पाड्यावर जात असताना मुलांना विचारले की, ”पुढे काय करणार?” तर बरेच जण “शहरात जाणार” म्हणून सांगायचे. मनात विचार आला, कितीतरी मुले असे घरी न सांगता शहराकडे जात असतील म्हणून शोध घेऊ लागलो. पुन्हा मुंबईत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या वर्गाला गेलो. काहीतरी करायचे आहे, याची माहिती दिली. घरातून निघून येणार्या मुलांचे पुनर्वसन हा साधा सरळ विषय घेतला, परंतु हा प्रचंड मोठा विषय आहे, हे समजायला थोडा वेळ लागला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता याच दरम्यान बनलो. सोशल डिप्लोमा निर्मला निकेतनमधून केला आणि ‘युवा’सारख्या संस्थेत अनुभव घेण्यासाठी पाच वर्षे सातत्याने अनेक विषयांवर काम करत राहिलो. २००४ मध्ये पूर्णवेळ आपण एकच काम करावे, असे ठरवले. ‘संपूर्ण जीवन सेवा समर्पण,’ असा निश्चय मनाने केला व ‘समतोल फाऊंडेशन’ संस्थेची नोंदणी केली.
‘समतोल’च्या कार्याची सुरुवात २००६ पासून सुरू झाली. रेल्वे स्टेशनवर मुलांचा जाऊन शोध घ्यायचा, त्यांना प्रेमाने आपलेसे करायचे, त्यांना समस्या न विचारता आधार द्यायचा, मूलभूत सुविधा पूर्ण करायचा प्रयत्न करायचा, शासकीय यंत्रणांना माहिती द्यायची, मग ते पोलीस असो किंवा वैद्यकीय रुग्णालय असो अथवा बालगृह असो, मुलांच्या माहितीच्या आधारे शोध सुरू ठेवायचा, असे ठरले. प्रथम तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर म्हणजे पूर्वीच्या व्ही.टी स्टेशनपासून या कामाला सुरुवात झाली. २००६ मध्ये सात दिवसांत अशी ७०० मुले मिळाली. नवीन-जुनी मिळून एवढी मोठी संख्या झाली तेव्हा कळले, दिवसाला महाराष्ट्रातील फक्त एकट्या मुंबईत १०० ते १५० मुले येतात. यामध्ये दोन प्रकारची मुले असतात. एक तर नवीन येणारी व दुसरी स्टेशनवर म्हणजे जुनी राहणारी मुले. ही मुले मुंबईत का येत असावीत, याचा शोध घेतला आणि अंतत: चार प्रमुख कारणे समोर आली. कौटुंबिक समस्या, शहराचे आकर्षण, शैक्षणिक समस्या व फसवणूक; मग ती कामासाठी किंवा लैंगिक शोषणासाठी किंवा अजूनही इतर शरीराचे भाग काढून घेण्यासाठी. २००६ ते २०१८ या १२ वर्षांच्या कालखंडात या समस्येला घेऊन काहीही बदल झालेला दिसला नाही. तेव्हा जेवढी मुले आढळत होती, आजही तेवढीच मुले रेल्वे स्टेशनवर आढळतात. फक्त यंत्रणांमध्ये (G.R.P, R.P.F, Station Manager, Hospital) यांची रिपोर्टिंग पद्धत बदलली आहे. सुरुवातीला गरीब घरातील मुले घर सोडून बाहेर पडत होती, पण आता ज्यांच्याकडे सर्व सुविधा आहेत म्हणजेच श्रीमंत घरातील मुलेदेखील घर सोडून बाहेर पडतात. त्यामुळे गरीब-श्रीमंत असा भेद मुलांमध्ये करण्याचे कारण नाही. ‘समतोल’ने आतापर्यंत २५ हजारांपेक्षा अधिक मुलांना त्यांच्या कुटुंबाशी जोडून पुनर्वसन केले आहे. पण, हे सामाजिक कार्य करताना अनेकदा वाईट प्रसंगांनाही तोंड द्यावे लागले. मग ते गुंड असो किंवा शासकीय यंत्रणा, परंतु ‘समतोल’ने हार मानली नाही. १३ पोलीस केसेस तर काही संस्थांकडून माझ्यावरच टाकण्यात आल्या. कारण, सगळीच मुले घरी गेली, तर ना त्यांचे धर्मांतर करता येईल आणि ना त्या मुलांच्या नावाखाली सरकारकडून शासकीय अनुदान लाटता येईल. परंतु, बालक हे कुटुंबातच वाढले पाहिजे व संस्था हा शेवटचा पर्याय असला पाहिजे, हे कायदाही सांगतो, हे इथे प्रकर्षाने सांगावेसे वाटते.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/