माझी कन्या अमृताच्या घरी यंदा गणपतीला एक आगळीवेगळी सजावट मांडणी होती. विषय होता आठवणींचा खजिना. आमच्या कुटुंबातील सर्वांची जुनी छायाचित्रे, पत्रलेखन-कविता, काही रेखाचित्रे आणि जुन्या वस्तू यांची रचना मुदीत मनाने पाहाणे-वाचणे, ही आकर्षक बाब या प्रदर्शनात साध्य झाली होती. दीड दिवसाच्या गणपतीला दुसऱ्या दिवशी भोजनानंतर जमलेल्यांपैकी प्रत्येकाने आपली किंवा संबंधित व्यक्तीची गुणविशेषांसहित एखाद्या जुन्या प्रसंगाची आठवण सांगायची, असा एक कार्यक्रम झाला. त्यावेळी कधी आसू, तर कधी जोरात हसू अशा सर्व चवींच्या आठवणींची शिदोरी उलगडताना संपूर्ण कुटुंबाचे जणू आत्मकथन प्रकट होत गेले. खरेतर आत्मकथन हे एका व्यक्तीचे असले तरी ते एकट्याचे नसते. त्यात अनेकांचा सहभाग आणि साहचर्य गुंफलेले किंवा गुंतलेले असते, असेही म्हणू. मला स्वतःला माझेच बालपणीचे फोटो पाहताना त्या त्या वयातल्या हयात आणि गत व्यक्तींचे चेहरे आपसूक जाणवायचे. लहानपणाचा माझा निरागस भाव पाहताना त्यातल्या काही खुणा अजून उरल्या आहेत का? हे आरशाच्या प्रतिबिंबात शोधण्याचा प्रयत्न करीत होतो.
यावेळी गणपती बाप्पाची मूर्तीदेखील अशी होती की, बाप्पा आपल्याच गतवर्षांची रूपे असलेला चित्रांचा अल्बम सोंडेने एकेक पान उलगडत कुतूहलाने पाहात होता. मीदेखील अशाच माझ्या स्मरणिकेतील एकेक घटनांची पाने चाळू लागलो. आपल्या स्वभावाची अनेक वैशिष्ट्ये आणि प्राप्त प्रसंगांची अनुभूती वेगवेगळ्या अंगांनी गुंफलेली असली तरी आज एक चित्रकार म्हणून जे व्यक्तिमत्त्व मला रोजच्या आरशात दिसते आहे, त्याची जडणघडण कशी झाली ते मी पाहू लागलो. माझा जन्म कर्नाटकातला. कार्कल हे छोटेसे गाव. ‘करी कल्लु’ म्हणजे ‘काळा दगड’ किंवा ‘कर कला’ या दोन अर्थाने आमच्या गावाला ‘कर कला’ हे नाव पडले, असे माझे आजोबा सांगायचे. माझा जन्म ज्या घरात झाला ते घर आणि ती खोली आजही त्या गावात आहे, हे मी नुकतेच पाहून आलोय. जणू आपल्या कुलदेवतेच्या मंदिरात जाऊन यावे, तशी भावना मला जाणवली. लहानपणीच्या किती जुन्या आठवणी आठवतात, असे जर मला विचाराल, तर मला माझ्या आईच्या कडेवर बसलेलेही आठवते. (इतके जुने स्मरणात आहे. पण,”पाच मिनिटांपूर्वी गॅस बंद करा म्हणून सांगितलेले करपून वास आला तरी लक्षात कसं राहात नाही,” अशी तक्रार माझी बायको करते.) मी एक वर्षाचा असतानाच आम्ही मुंबईला बोरिवलीच्या काजूपाड्यात स्थलांतरित झालो. काही कारणास्तव मी जर रडलो, तर हातात गोळी-चॉकलेटचा खाऊ देण्याऐवजी खडूचा तुकडा दिला तर माझे रडणे थांबत असे, अशी आई सांगायची. घरातल्या भिंतींवर, अंगणातल्या ओट्यावर लांबच लांब रेषा ओढायच्या, त्या आडव्या रेषांना उभ्या रेषांनी छेदून खिडक्या-दारे दाखवायची आणि खाली गोल गोल चाके जोडून रेलगाडी चित्रातून धावायला लागे. ही माझी रेखाटने आजही मला अंधुकशी आठवतात. त्या गाडीच्या चित्रावर मी फतकल मारून बसायचो आणि तोंडाने धावणाऱ्या गाडीचे आवाज काढून जागीच डोलत बसायचो.
एक गोष्ट स्पष्ट होती, मला घरून आईवडिलांचा चित्रकलेसाठी भरपूर पाठिंबा मिळाला. “चित्र काढू नको, अभ्यास कर,” अशी टूम कधी माझ्यामागे त्यांनी लावली नाही. संध्याकाळी कामावरून आल्यावर आन्नांची चौकशी असे, “आज संघ शाखेत गेला होतास का? आणि आज काय चित्र काढले?” आन्ना कधी कधी चांगले छापील चित्र किंवा त्यांना आवडलेले कॅलेंडर आणून द्यायचे. त्यात मुळगावकर, दलाल, एस. एम. पंडित यांची देवादिकांची चित्रे असायची. मी त्यांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करी, पण माझ्या चित्रांना चांगले मार्गदर्शन मिळावे म्हणून शेजारचे जोगदादा मला नाना अभ्यंकरांकडे घेऊन गेले. त्यांच्याकडे दादांनी विनंती केली की, या हिऱ्याला तुम्ही पैलू पाडा. नाना ऊर्फ दि. य. अभ्यंकर हे वृत्तीने ज्योतिषी होते. शिवाय ते उत्तम मूर्तिकार आणि चित्रकार होते. त्यांच्या खोलीत काही व्यक्तिशिल्पे आणि चित्रकलेचे साहित्य, मोठमोठाले ब्रश मांडलेले दिसत होते. नानांनी मी काढलेली सारी चित्रे पाहिली आणि “उद्यापासून एक स्केचबुक आणि पेन्सिल घेऊन ये. ही खिडकी उघडी दिसली तर मी घरात आहे असे समज.”
शाळेत असतानाच गणपतीच्या मूर्ती मी बनवू लागलो होतो. जेव्हा प्रस्थापित कारखानदारांकडून प्रोत्साहन म्हणून मातीचा गोळाही मिळणे दुरापास्त होते, त्यावेळी पावसाळ्यात रस्त्यावरच्या ओल्या मातीची मूर्ती बनवून आमच्या चाळीतच आम्ही मिरवणूक काढत असू. आमच्या काजूपाड्यातील एक गिरणी कामगार असूनही प्रतिवर्षी ३०-४० गणपतीच्या मूर्ती काढणारे भाऊ जनार्दन बिरजे यांनी माझ्यावर पुत्रवत प्रेम केले आणि गणपती बनविण्याचे रीतसर मार्गदर्शन केले. एकदा बिरजेभाऊंबरोबर रस्त्याने चालत असताना रस्त्याच्या कडेला पडलेल्या गाईच्या शेणाकडे अंगुलीनिर्देश करून मला म्हणाले की, “या शेणाकडे पाहून लोक ‘शी’ म्हणून नाक धरतात, परंतु आपण कलाकारांनी विचार करायचा की, असं शेण जर चित्रात दाखवायचे असेल तर मी तो रंग कसा तयार करेन, अशी आपली दृष्टी असली पाहिजे. आपल्याकरिता नाक नव्हे तर नजर महत्त्वाची.” अशी अनेक वाक्ये मला चिरंतन प्रोत्साहन देणारी आहेत. नाना माझ्या चित्रात खूप चुका काढायचे. एकदा नानांच्या पत्नींना (काकू म्हणायचो आम्ही) माझी दया आली. त्या म्हणाल्या, “अहो, तो इतक्या लांबून येतो. किती चुका सांगता? कधीतरी त्याच्या चित्राला छान म्हणा की!” त्यावर नाना जोरात म्हणाले, “अगं, तो घरून निघतो ना, तेव्हा अनेकजण त्याच्या चित्राला छान छान म्हणतात, पण इथे आल्यावर मी दाखवलेल्या चुका चित्रातून कमी झाल्या की, त्याची चित्र खरोखरीच आणखी सुंदर होतील.” चित्रातले रेखांकन अचूक असले की, थोडेसे रंगकामदेखील चित्रात खुलून दिसते. परंतु, पाय तुटलेल्या खुर्चीला सोने-रत्न-जवाहीर जडवले तरी ती वाकडीच उभी राहणार. तशीच अचूक रेखांकनाने चित्राला बळकटी येते. रेखांकनाला निरीक्षणाबरोबर गतीदेखील असावी. नाना एकदा बोलले की, “समोर एक माणूस धोतर नेसतोय आणि समजा त्याच्या हातून निरी निसटली तर तो किती झटक्यात स्वतःला सावरेल? तेवढ्यात तुझे स्केच झाले पाहिजे.”
शाळेतले चित्रकलामास्तर प्रभाकर महाजन सर आणि नाना अभ्यंकरांनी माझ्या आन्नांना आवर्जून सांगितले की, “वासुदेवला जे.जे.त पेंटिंगला प्रवेश घेऊ द्या, कमर्शियलला नाही!” आणि आन्नांचा व माझा या दोन्ही गुरूंवर गाढा विश्वास. एसएससी अकरावी पास झाल्यावर मी जे.जे.त प्रवेश घेतला. तो पहिला प्रवेश अजूनही माझ्या मनात ताजा आहे. माझी एसएससीची मार्कलिस्ट, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आणि इंटरमीडिएट ग्रेड परीक्षेचे ‘इ’ ग्रेड मिळालेले प्रशस्तिपत्रक आणि प्रवेश फॉर्म घेऊन प्रा. सुखडवालांच्या केबिनमध्ये गेलो होतो. संघाची हाफ पँट घालूनच जे.जे.च्या आवारातला माझा तो पहिला प्रवेश होता. सर जमशेटजी जीजीभाय आर्ट स्कूलची ती दगडी इमारत, मोठमोठ्या खिडक्या, भिंतीवरची सुंदर पेंटिंग्ज आणि रोमन अँटिकच्या प्लास्टरमधल्या प्रतिकृती पाहून मी भारावून गेलो होतो. आपण ज्या आर्टस्कूलमध्ये प्रवेश घेत आहोत, त्याची स्थापना १८५७ साली झाली होती. अशा ऐतिहासिक कलाशाळेच्या विद्यार्थी मालिकेत आपण गुंफले जाणार, हे खरोखरी महद्भाग्य वाटत होते. शाळेतले एक कलाशिक्षक (नाव घेत नाही) मात्र मला सारखे “कमर्शियलला प्रवेश घे” म्हणून बजावत होते. तरी महाजन सर आणि नाना अभ्यंकर यांनी सांगितल्याप्रमाणे मी फाईन आर्टला प्रवेश घेतल्याचे कळताच “पुढे काय, भीक मागणार का?,” असे कुत्सित उद्गार माझ्या तोंडावर फेकलेले आठवतात. जे.जे. त शिकत असतानापासून पोट्रेट पेंटिंग हा माझा आवडता विषय आणि ती आवड माझी आजही टिकून आहे. जे.जे.चा पाच वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून डिप्लोमाची परीक्षा मी प्रथम श्रेणी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालो. असे असले तरी परीक्षेचा काय निकाल प्रशस्तिपत्रकावर आहे, त्यापेक्षा मी जे.जे.चा विद्यार्थी हीच ओळख आपल्याला विशेष दर्जा देते, असा या कलासंस्थेचा महिमा आहे. जे.जे.तल्या शिक्षकांनी आमच्यावर भरपूर प्रेम केले. तसेच इथल्या भिंतींनीदेखील तितकेच शिकवले. या इमारतीची शिकवण चिरंतन आहे. आमचे डीन शंकर पळशीकर, गोपाळ देऊस्कर अशा मातब्बर चित्रकारांची प्रात्यक्षिके आम्हाला पाहायला मिळाली.
शेवटच्या डिप्लोमाची परीक्षा देण्याअगोदर जे.जे.च्या लॉनवर आम्ही सर्व विद्यार्थी निरोप समारंभासाठी बसलो होतो. आमच्याबरोबर प्रा. मृगांक जोशी सर बसले होते. अनेकजण आपापले विचार मांडत होते. कुणी कवितावाचन करीत होते. अशावेळी मी सरांना एक प्रश्न विचारला, ‘‘सर, हा हा म्हणता ही पाच वर्षे या वास्तूत आम्ही अत्यंत आनंदाने काढली. आता यापुढे काय? घरच्यांची आमच्याकडे दृष्टी लागून राहिली आहे. आता पुढे आम्ही उपजीविका म्हणून काय करू शकतो?,” यावर सर म्हणाले, “तुम्ही आता पूर्ण चित्रकार झालात. तुम्ही पेंटिंग करत राहा. आनंदी राहा. उपजीविकेसाठी तुम्ही काहीही करू शकता. उदा. एक ट्रक ड्रायव्हर आहे. तो उपजीविकेसाठी ट्रक चालवतो. पण तो शायर आहे. कविता करतो, शायरी लिहितो. तेव्हा त्याला सर्वजण उत्तम कवी म्हणून ओळखतात.” मला मात्र हे उत्तर समाधान देत नव्हते. मनात आले की, शायरी करायला कोऱ्या पानाची एक वही आणि पेन मिळाले की झाले. पण एक पेंटिंग करायला रंग, कॅनव्हास आणि ब्रश हे डायरीच्या किमतीत मिळत नाहीत. असो. मी काही पुढे वाद घातला नाही. पण एक मोठ्ठा यक्षप्रश्न माझ्यापुढे भेसूर होऊन येत होता, हे मात्र मला जाणवू लागले होते.
शेवटी जे.जे.मध्येच कलेचा इतिहास मराठीतून शिकविण्यासाठी असिस्टंट लेक्चररची हंगामी नोकरी चालून आली. साधारणपणे दोन अधिवेशने मी काम केले. पुढे मित्र व्ही. एस. वागळे यांच्या कृपेने हॉकिन्स प्रेशर कुकर कंपनीत त्यांच्या होम मॅगझिनसाठी ‘इलस्ट्रेटर कम व्हिज्युलायझर’ची चांगली नोकरी लागली. १९८० ते १९८४ पर्यंत या नोकरीत रेखांकन ते पेंटिंग, इलस्ट्रेशन, फोटोग्राफी प्रिटिंग आणि एकंदरीत व्यावसायिक कलेचे पूर्णांश मी शिकून घेतले. फाईन आर्ट आणि कमर्शियल आर्ट यांच्यामधील दगडी भिंत गळून पडली आणि या दोन्ही विभागांतले काम एकमेकांस कसे पूरक ठरू शकते, यांची शिकवण मिळाली. १९७९ मध्येच लग्न झाल्याने सांसारिक जबाबदारी वाढली होती. सुप्रसिद्ध एस. एस. शेख यांच्यासाठी ‘पीस वर्क’ करू लागलो होते. शिवाय बॉम्बे आर्ट सोसायटी, स्टेट आर्ट, आर्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या वार्षिक प्रदर्शनात स्पर्धेतील पोर्ट्रेटला चांगली पारितोषिके मिळाली होती. घरी करत असलेला चित्रकामांना पत्नी भारतीची चांगली साथ मिळत होती. तिलादेखील फोटोग्राफी, डार्करूमचे काम शिकविले होते. विशेष म्हणजे, माझ्या सर्व कामाचा गोशवारा ती सांभाळू लागली होती. ते तिचे व्रत अजूनही अखंड चालू आहे. शिवाय तिची आणि माझी कन्या अमृताची मी अनेक पोर्ट्रेट केली. त्यांना चांगली बक्षिसे मिळाली आहेत.
इतके झाल्यावरही पूर्णवेळ स्वतंत्र चित्रकार म्हणून जगण्याची इच्छा वारंवार उचंबळून येई आणि ती वेळ आली. हॉकिन्समधील ‘फोर सीझन्स’ हे मासिक बंद पडले आणि पूर्ण आर्ट डिपार्टमेंट त्यांनी जाहिरातीसाठी वापरण्याचे ठरवले. इथे मात्र मी नाखूश झालो आणि नोकरी सोडण्याचा निर्धार केला. तरीदेखील तीन तीन मातब्बर ज्योतिषांचा सल्ला घेतला. प्रत्येकाने ही वेळ योग्य नाही, असे सांगितले. पण, या ज्योतिषांमुळे मन आणखी डळमळू लागले. फार पूर्वी कधीतरी आन्नांनी सांगितलेली एक गोष्ट आठवली, जगत्गुुरू आदि शंकराचार्य एकदा म्हणाले होते की, “प्रत्येक प्राणी आपले प्रारब्ध घेऊन जन्माला येतो, परंतु मनुष्य हा एकमेव जीव असा आहे की, तो आपले प्रारब्ध बदलू शकतो.” या विधानाने मला इतके बळ आले की, मी सरळ नोकरीचा राजीनामा दिला. १९८४ साली राजीनामा दिल्याबरोबर जहांगीर आर्ट गॅलरीत मी स्वतःच्या पेंटिंगचे पहिले एकल प्रदर्शन भरवले. कॉलेजमध्ये शिकत असल्यापासून ८४ पर्यंत केलेल्या अनेक पोर्ट्रेटसपैकी निवडक चित्रे आणि रेखाचित्रांचे प्रदर्शन होते. यात सर्व चित्रे मित्र आणि परिवारातल्या व्यक्तींची पोर्ट्रेटस असल्याने त्यातील एकही विकले जाणार नाही, याची खात्री होती. परंतु, आपल्या कामाची ताकद रसिक प्रेक्षकांना निश्चित कळेल, हा आत्मविश्वास होता. त्यामुळे यापूर्वी आपण आपला पोर्टफोलिओ १० ठिकाणी घेऊन फिरण्यापेक्षा या प्रदर्शनी रोज दीडदोनशे रसिक आपले काम पाहतील, तर काम निश्चित मिळेल, असा माझा तर्क होता आणि खरोखरीच या पहिल्या प्रदर्शनातूनच मला अनेक कामे मिळाली आणि त्याची लिंक नंतर अनेक वर्ष लागून राहात असे. माझ्या या प्रदर्शनाला प्रसिद्ध कलामहर्षी एस. एम. पंडित आणि चित्रकार रवि परांजपे सर आवर्जून आले होते. त्यानंतर १९८६ साली परत प्रदर्शन भरवले. त्यात काही पोर्ट्रेटस आणि निसर्गचित्रे होती. त्यावेळी आमच्या एका मित्राने सुचवले की, असं मिक्स प्रदर्शन नको करूस. एकतर पोर्ट्रेट्स लावा किंवा निसर्गचित्र. त्यावर मी त्याला उत्तर दिले की, “मला जे जे जमते, ते मी सर्व प्रदर्शनातून मांडणार.” तेव्हा तो मित्र म्हणाला, “जशी तुझी मर्जी, परंतु प्रदर्शन हे तुला काम जमते, ते दाखविण्यासाठी नाही, तर तू काय दाखवू इच्छितोस, काय सांगू इच्छितोस, त्यासाठी आहे. बघ विचार कर.” हा फार मौलिक सल्ला मला त्याने दिला आणि माझी प्रदर्शनामागची व्यावसायिक हेतूची भूमिका हळूहळू गळून पडली.
निसर्गचित्रण हा देखील पोर्ट्रेटसारखाच माझा आवडता विषय. जे. जे.च्या शेवटच्या वर्षात शिकत असताना वर्गात जायच्या अगोदर मुंबईतल्या वेगवेगळ्या जागी बसून रोज एक तर चित्र रंगवून जात असे. याकरिता मी स्वतः आणि माझे मित्र विनय सप्रे अशी आमची जोडी होती. खरेतर निसर्गचित्राचा रीतसर अभ्यासक्रम कुठल्याही आर्ट स्कूलमध्ये शिकविला जात नाही. तेव्हा विनय सप्रे हाच माझा गुरू. त्याने मला स्पॉटवर लॅण्डस्केप कसा रंगवायचा, याचे धडे दिले. कॉलेज संपल्यावर १९७७ ते १९८४ पर्यंत मात्र कधी निसर्गचित्रण प्रत्यक्ष जागी बसून रंगविण्याचा सराव झाला नव्हता. १९८८ साली मी आणि माझी पत्नी स्कूटरवरून रोज मुंबईत वेगवेगळ्या जागी बसून निसर्गचित्रे रंगवायला सुरुवात केली आणि अशा चित्रांचे प्रदर्शन मुंबईच्या कमलनयन बजाज आर्ट गॅलरीत भरवले. रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. काही चित्रे विकली गेली, तेव्हा ठरवले की आता आपण अशीच एकेका प्रांत प्रकाशाची निसर्गचित्रे रंगवायची. १९९० मध्ये आम्ही सरळ अंदमानला गेलो. आमचा मित्र गोरखनाथ बैले तिथल्या केंद्रीय शाळेत कलाशिक्षक होता. त्यांच्या मैत्रीमुळे इतक्या लांब गेल्यावरही एकाकीपणा वाटला नाही. १५ दिवसांच्या अंदमान वारीत ४० चित्रे रंगविली. त्याचेही प्रदर्शन बजाज आर्ट गॅलरीत भरवले. विक्रीतून आलेली रक्कम पुढच्या प्रवासासाठी राखून ठेवली. प्रदर्शनात आमच्या एका समीक्षक मित्राने विचारले की, “आणखी किती काळ लॅण्डस्केप रंगविणार?” म्हणजे मी हे थांबवून काही तरी क्रिएटिव्ह (अॅबस्ट्रॅक्ट) करावे, असे त्याला सुचवायचे होते. मी म्हटले, “मला अजूनही स्पॉटवर बसून काम करायला आवडते. ही आवड आहे तोपर्यंत मी करत राहणार.”
खरे तर फोटोवरून लॅण्डस्केप मी कधी करीत नाही. प्रत्यक्ष स्पॉटवर त्या वातावरणात जो अनुभव आपल्या रोमारोमात जाणवतो, त्याची मूर्त साक्ष म्हणजे ते तयार झालेले चित्र असते. अशा प्रकारे निसर्गचित्रणाकरिता मी लेह-लडाख, चारधाम, हेमकुंड, हिमालयातील वेगवेगळी शिखरे मी रंगविली. एकदा तर कर्नाटकातील मंगळूरपासून किनाऱ्या-किनाऱ्याने कन्याकुमारीपर्यंत व तेथून चेन्नईपर्यंत निसर्गचित्रे रंगवित प्रवास केला. तयार झालेला चित्रसंच म्हणजे प्रवासाची जणू डायरीच असे. या काही चित्रांची प्रदर्शने झाली किंवा अशीच विकलीदेखील गेली. नेपाळमधील काठमांडू - पोखराचा प्रवासदेखील असाच चित्रमय होता. खरं तर नोकरी सोडली म्हणून कधी निराशा किंवा उपजीविकेत खंड पडला नाही. जपानमधील नारा येथील त्सबोसाका डेरा टेंपलमध्ये भगवान बुद्धांच्या जीवनावर आधारित चित्रे रंगविण्याचे काम मिळाले. त्यानिमित्त तेथे चाळीस दिवसांचे वास्तव्यदेखील झाले. १९८८ साली मी पहिले विपश्यना शिबीर केले आणि माझ्या कलानिर्मितीला एक वेगळी कलाटणी मिळाली. दहा दिवसांच्या त्या शिबिरात मौन राहून आपल्या मनोव्यापाराचे तटस्थपणे निरीक्षण करताना जाणवले की, आपण बहिर्मुख राहून जे काही अनुभवतो, त्यापेक्षा आपल्या अंतर्मनात भलेमोठे विश्व सामावले आहे. त्याच्याकडे आपले कधीच लक्ष गेले नव्हते. त्यांना आपण आपल्या कलेच्या द्वारे दृश्य जगतात प्रकट करू शकतो. आतापर्यंत जे दिसते, त्यातून जाणवणारे चित्र रंगवित आलो आणि अजूनही करतोच आहे, तरी आता यापुढे आपल्या अंतर्मनातील संचित अनुभूतीचा विषय घ्यायचा आणि त्यांची मालिका रंगवायची. त्यानुसार ‘प्रतिभा’ हा विषय घेऊन मी प्रदर्शन भरविले. त्यानंतर अशा अनेक विषयांची मालिकाच साकार घेऊ लागली. ‘आई आणि मूल’, ‘बालपण’, ‘आपले सहजीवी’, ‘गजराजे’ ‘बुद्ध’, ‘कृष्ण’, ‘कालिदासानुरुपम’, ‘मोगरा फुलला’, ‘मर्यादा पुरुषोत्तम’, ‘उपनिषत्सु’, एकंदरीत आतापर्यंत २५-३० प्रदर्शने झाली असतील. जेव्हा निसर्गचित्रांचे प्रदर्शन भरवित असे, त्यावेळी रसिकांचा प्रश्न असे की, “आता यापुढे कुठे प्रवास?” पण, या संकल्पना चित्रप्रदर्शनानंतर रसिकांचा प्रश्न असतो की, “पुढला विषय कोणता?” मला खरोखरीच कृतकृतार्थ वाटते- प्रदर्शनातील चित्रांचा रसिक आस्वाद घेत असताना त्यांच्याशी संवाद साधण्यातदेखील एक वेगळाच आनंद असतो. ज्या विचाराने एखादे चित्र साकार होते, तेच चित्र रसिकांशी मूक संवाद करीत असताना त्याची अर्थ व्याप्ती आणखी रुंदावते, असा माझा अनुभव आहे. खरं तर सांगण्यासारखे, लिहिण्यासारखे खूप काही आहे. अशी वैचारिक चित्रे गेली काही वर्षी रंगवित असूनही माझ्यावर असलेला ‘पोर्ट्रेट पेंटर’ हा शिक्का काही पुसट झालेला नाही आणि मला त्याची अजिबात खंत नाही, कारण अजून मी पोट्रेट्स रंगवितो ते अगदी आवडीने. जशी मी माझ्या मित्रपरिवारांची पोर्ट्रेट रंगवितो, तशीच काही महनीय व्यक्तींची पोर्ट्रेट्स समोर बसवून रंगविली आहे. मा. बाळासाहेब ठाकरे, राम नाईक, विलासराव देशमुख, माजी राष्ट्रपती महोदया प्रतिभाताई पाटील, राज ठाकरे अशी अनेक नावे आहेत.
परंतु, आजच्या आधुनिक कलेच्या, नवकलेच्या झंझावातात पोर्ट्रेट पेंटिंगला आणि वास्तववादी कलेला जी सापत्न वागणूक दिली जाते, याची खंत आम्हा कलाकारांना आहे. अमेरिकेत ‘पोर्ट्रेट सोसायटी ऑफ अमेरिका’ ही संस्था या पोर्ट्रेट कलेला प्रोत्साहन देण्याकरिता जागतिक स्तरावर चार दिवसांची परिषद भरवते. त्यात प्रात्यक्षिके, लेक्चर्स आणि जागतिक स्पर्धादेखील असते, हे वाचून मला कुतूहल आणि जिज्ञासा उत्पन्न झाली की, आपणही यात सहभागी व्हावे. २००६ साली मी अमेरिकेत डलास येथे या कॉन्फरन्समध्ये सहभागी झालो आणि स्पर्धेत भागही घेतला. त्यात माझ्या पत्नीचे पोर्ट्रेट पाठविले होते.जगभरातून जवळजवळ १२०० प्रवेशिका आल्या होत्या. त्यातून १२ चित्रांची निवड झाली होती आणि त्या १२ चित्रांत मी एकटा पहिला भारतीय होतो. तिसऱ्या दिवसाच्या बँक्वेटमध्ये निकाल लागला, त्यावेळी सर्व बक्षीसे जाहीर होताना सर्वोच्च ‘ग्रॅण्ड प्राईस’ माझ्या पोर्ट्रेटला जाहीर झाले. टाळ्यांच्या कडकडाटात निर्णयाचे स्वागत झाले. क्षणभर मला काही सुचेचना, कारण माझे म्हणून तिथे कुणीच नव्हते. मी एकटाच असल्याची भावना उचंबळून मन सद्गदित झाले. हे बक्षीस घेणारा मी चित्रकार वासुदेव नसून मी भारतीय पोर्ट्रेट पेंटिंग करणाऱ्या चित्रकारांचा इथे जणू प्रतिनिधी असल्याची भावना मनात दाटून आली. आनंद, हर्ष असूनही मी माझ्या टेबलाजवळून मंचावर बक्षीस घेण्यास जाताना ओठांवर ‘जन-गण-मन’ राष्ट्रगीत गुणगुणू लागलो. तो रोमहर्षक दिवस आजही काल झाल्यासारखा मला भासतो. अशा कितीतरी घटनांची स्मृतिचित्रे आज चाळताना ‘गेले ते दिन गेले...’ असे अजिबात वाटत नाही. कारण, आजची वर्तमानातली आणि भविष्यातली प्रत्येक नवनिर्मिती या गत अनुभूतीच्या पायांवर भक्कम उभी आहे. हे ‘मी’ आणि ‘माझे’ म्हणून जे काही सांगितले, ते केवळ निमित्तमात्र. खरे तर हे सर्व जे काही सांगितले ते आमचं आणि तुमचं सर्वांचं आहे. शेवटी सर्व केल्यावर ‘इदं न मम’ म्हणण्याची सुसंस्कृत परंपरा आहे.