मुंबई: रेल्वेमध्ये प्रवास करत असताना पर्स आणि पाकीट चोरीला जाण्याचे आपण ऐकतो. पण आता एक वेगळीच बाब समोर आली आहे. २०१७-१८ या वर्षामध्ये देशभरात विविध ठिकाणी रेल्वेतील एसी डब्यातून तब्बल १४ कोटींचे सामान चोरीला गेले आहे. यामध्ये टॉवेल, चादरी, ब्लँकेट, उशांच्या खोळी, बेडरोल यासोबतच शौचालयमधील मग, नळ यांचाही समावेश आहे.
एसी डब्यांमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वे प्रशासन उत्तमोत्तम सुविधा पुरविण्याचे प्रयत्न करत असते. पण तरीही या छोट्या वस्तूंची चोरी प्रशासनाला महागात पडते आहे. यामध्ये २१,७२,००० हजार बेडरोल व तत्सम वस्तू गायब झाल्या आहेत. तर १२००० टॉवेल, ४,७१,०७७ चादरी आणि ३,१४,९५२ उशांच्या खोळी चोरीला गेल्या आहेत. रेल्वे प्रशासनाने चौकशी केली असता एसीतले प्रवासीच या गोष्टी चोरत असल्याची बाब समोर आली आहे. यामुळे अशाप्रकारे चोरीला जाणाऱ्या वस्तूंवर कसे लक्ष ठेवायचे हा मोठा प्रश्न रेल्वेला पडला आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/