आता उरलीसुरलीही घालवली..
प्रकाश आंबेडकर महोदयांची सध्याची वक्तव्यं पाहता त्यांना एमआयएमचा वाण आणि गुण दोन्ही लागला असल्याचं स्पष्ट दिसून येतं. कारंज्याचे फवारे निघावेत त्या वेगाने प्रकाश आंबेडकर सध्या एकेक वक्तव्यांची कारंजी उडवत आहेत. हे महाशय नुकतेच बोलून बसले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तर ऑक्टोबरपर्यंतच मुख्यमंत्री असणार आहेत. त्यामुळे त्यांना काय नाटके करायची आहेत ती करू द्या, पुढच्या वेळी आमचीच सत्ता येणार आहे!” असदुद्दिन वा अकबरूद्दीन ओवेसी संतापजनक आणि वादग्रस्त बोलतात, पण इतकी हास्यास्पद वक्तव्यं नक्कीच करत नाहीत. भारिप-बहुजन महासंघ २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात एकूण ७० जागा लढला आणि पैकी अवघी १ जागा जिंकू शकला. राज्यभरातून पक्षाला ०.८९ टक्के तर लढलेल्या मतदारसंघांतून ३.६४ टक्के मतं मिळाली. एमआयएम पक्ष २४ जागा लढून २ जागा जिंकू शकला. राज्यात ०.९३ टक्के मतं आणि लढवलेल्या मतदारसंघांतून १३.१६ टक्के मतं मिळवू शकला. या दोघांची आघाडी आता राज्यात सत्तेत येणार असून सत्तेत आल्यावर संभाजी भिडे यांना ‘आत’ करणार आहेत. इकडे हे असं सुरू असताना दुसरीकडे काँग्रेस पक्ष म्हणे रोज दहादहा वेळा प्रकाश आंबेडकरांना विनवतो आहे की, त्यांनी काँग्रेसच्या आघाडीत यावं. परंतु, प्रकाश आंबेडकर हे ‘सत्ता आल्यास रा. स्व. संघावर काय कारवाई करणार ते आधी सांगा,’ म्हणत अडून बसलेत असंही वृत्त आहे. आता काँग्रेस आणि एमआयएम-भारिपची जोडी सत्तेत येऊन संघावर कारवाई करणार. तिकडे मध्य प्रदेशात बिचारी काँग्रेस आपल्या जाहीरनाम्यात संघावर कारवाई करण्याबाबत दोन वाक्यं बोलली, तर आता चोहोबाजूंनी शिव्या खात आहे. ती काँग्रेस सत्तेत येणार आणि प्रकाश आंबेडकरांच्या सल्ल्याने संघावर कारवाई करणार, असं जर प्रकाश आंबेडकरांना वाटत असेल तर त्यांनी बहुधा उरलंसुरलं तारतम्यही सोडल्याचं समजायला हरकत नाही. याच वेगाने प्रकाश आंबेडकर आपली राजकीय वाटचाल करणार असतील, तर एकेकाळी अभ्यासू, संवेदनशील वगैरे भासणारे अॅड. प्रकाश आंबेडकर यांना राजकीय विजनवासात जाण्याचे वेध लागलेत, असं म्हणायला हरकत नाही.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/