ज्ञानदांची भाऊबीज मेहूण मुक्ताईचरणी अर्पण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Nov-2018
Total Views |

भुसावळ, 12 नोव्हेंबर
संपूर्ण जगाला मानवतावाद देणार्‍या लहानगी भगिनी आदिशक्ती मुक्ताईंचे बंधूप्रेम आजही जपले जात आहे. गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही भाऊबीजेच्या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज यांच्यातर्फे आपली भगिनी तापी तीरावरील संत आदिशक्ती मुक्ताई यांना भाऊबीज पाठविण्यात आली आहे.
 
आपल्या भारतीय संस्कृतीत सणांना मोठे महत्त्व आहे. त्यातील एक महत्त्वाचा सण म्हणजे भाऊबीज. बहीण-भाऊ यांचे नातेसंबंध अधिक दृढ करण्याचे काम हा सण करतो.
 
महाराष्ट्रात 12व्या शतकात अवतार घेतलेल्या चार भावंडांनी साहित्य व आध्यात्मिक क्षेत्रात क्रांती केली. संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर, संत सोपानदेव आणि आदिशक्ती संत मुक्ताई. या चारही भावंडांना तत्कालीन समाजाचा आतोनात त्रास सहन करावा लागला होता.
 
अशातही या भावंडांनी जगाचा उद्धार करण्याचे काम केले. समाजाच्या त्रासाला कंटाळून झोपडीत दार बंद करून बसलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज यांना लहानग्या मुक्ताईने ताटीचे अभंग रचून आळवणी केली. मोजके व अर्थपूर्ण शब्द आणि प्रत्येक अभंगाच्या शेवटी आग्रहपूर्वक केली जाणारी ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’ ही विनवणी.
 
यामुळे ज्ञानेश्वर महाराज ताटी उघडून बाहेर आले. त्यांनी मुक्ताईंच्या डोक्यावर हात फिरवून प्रेमाने कौतुक केले. त्यानंतर श्रीमद्भगवदगीतेवर टीका करून जगत्मान्य असा ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला.
 
ज्ञानेश्वरांसारखा ज्ञानी व योगी भाऊ आणि जगाच्या कल्याणासाठी तुम्ही विश्वतारा अशी हाक देणारी प्रेमळ बहीण यांचा असा उत्कृष्ट संवाद जगात कुठेही पाहायला मिळणार नाही. ही पार्श्वभूमी सांगण्याचा हेतू हाच की, मुक्ताईंचे बंधूप्रेम संपूर्ण जगभर प्रसिद्ध आहे.
 
 
हेच बंधूप्रेम सातशे वर्षानंतरही जपण्याचे काम श्रीक्षेत्र मेहूण तापी तीर येथील देवस्थानातर्फे केले जात आहे. श्रीक्षेत्र आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज यांच्याकडून आदिशक्ती संत मुक्ताई यांना भाऊबीज पाठविण्यात आली आहे. ही भाऊबीज संत मुक्ताई देवस्थानचे सचिव रामराव महाराज, विश्वस्त शारंगधर महाराज, सुधाकर महाराज, लक्ष्मण महाराज, दत्तू पाटील, डॉ. जगदीश पाटील भुसावळ आदींनी संत मुक्ताईंच्या चरणी ठेवली.
 
 
भाऊबीजच नव्हे तर रक्षाबंधन सणाला दरवर्षी श्रीक्षेत्र आळंदी येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज, श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे श्री संत निवृत्तीनाथ महाराज आणि श्रीक्षेत्र सासवड येथे श्री संत सोपानदेव महाराज यांच्याकडे राखी पाठविण्यात येते.
 
भाऊ-बहिणीचे नाते जगासाठी प्रेरक 
 
संत आदिशक्ती मुक्ताई व संत ज्ञानेश्वर यांचे भाऊ बहिणीचे नाते संपूर्ण जगासाठी प्रेरक व मार्गदर्शक आहे. भाऊबीजेच्या माध्यमातून भावा-बहिणीतील प्रेमाचे अतूट बंधन जोपासण्याचे काम नित्यनेमाने केले जात आहे.
 
ही परंपरा यापुढे निरंतर सुरू ठेवण्यात येणार असल्याचे शारंगधर महाराज यांनी सांगितले. आध्यात्माची परमोच्च पातळी गाठलेल्या बहीण-भावाच्या प्रेमाची आठवण आजही भाऊबीजेच्या माध्यमातून जोपासली जात आहे.
@@AUTHORINFO_V1@@