भोपाळ : मध्य प्रदेशमध्ये सलग १५ वर्षांपासून सत्तेबाहेर असलेल्या कॉंग्रेसने निवडणूकीसाठी कंबर कसली आहे. मात्र, त्यांचेच नेते राहुल गांधी यांना डोकेदुखी ठरत असल्याचे सध्या दिसून येत आहे. भोपाळमध्ये निवडणूक प्रचारासाठी राहुल गांधी शड्डू ठोकून बसले आहेत. बुधवारी रात्री विधानसभेच्या जागावाटपावरुन कॉंग्रेसचे नेते दिग्विजय सिंह आणि ज्योतिराज शिंदे यांच्यात ‘तू-तू मै-मै’ झाली.
राहुल गांधी यांनी मतदारांची अंतिम यादी निवडण्यासाठी बैठक बोलावली होती. यावेळी पक्षातील सर्वनेते मंडळी उपस्थित होती. यावेळी ज्योतिराज शिंदे आणि दिग्विजय सिंह यावेळी उपस्थित होते. आपापल्या गटातील नेत्यांना तिकिट मिळण्यासाठी दोन्ही नेते आघाडीवर होते. यामुळे दोघांमध्ये राहुल गांधी याच्यासमोरच वाद सुरू झाला. वाद निस्तारण्यासाठी शेवटी राहुल गांधींना त्रिसदस्यीय समिती नेमावी लागली. यात अशोक गलहोत, वीरप्पा मोईली, अहमद पटेल आदींचा सामावेश आहे. मात्र, अद्यापही या वादावर तोडगा निघालेला नाही.
मध्यप्रदेशमध्ये निवडणूकीसाठी नामांकन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शुक्रवारी दि. २ ऑक्टोबरपासून नामांकन दाखल करण्यासाठी सुरुवात होणार आहे. शेवटची तारीख ९ नोव्हेंबर असणार आहे. ५ नोव्हेंबरपर्यंत सर्व उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/