नवी दिल्ली : जागतिक आंतरराष्ट्रीय नाणेनिधी
(आयएमएफ) या संस्थेने भारताचा आर्थिक विकासात चीनपेक्षाही जास्त चांगली कामगिरी
करणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. आयएमएफने ‘वर्ल्ड
इकॉनॉमिक आऊटलूक’मध्ये हा अंदाज वर्तवला आहे. २०१८-१९ या
आर्थिक वर्षात भारताच्या आर्थिक विकास दराची वाढ ७.३ टक्के राहणार असल्याचेही
म्हटले असून २०१९–२० या आर्थिक वर्षात विकास दराची वाढ ७.४
टक्के राहणार असल्याचे सांगितले आहे. आयएमएफने २०१९–२० या आर्थिक वर्षात आर्थिक विकास दराची वाढ ७.५ टक्क्यांनी होईल, असा यापूर्वी अंदाज वर्तवला होता. त्यात सुधारणा करत नव्याने सादर
केलेल्या अहवालात २०१९-२० मध्ये आर्थिक वाढ काही प्रमाणात मंदावेल, अशी शक्यता आयएमएफने वर्तवली आहे.
कच्चा तेलातील दरवाढ आणि जागतिक स्तरावरील प्रतिकूल आर्थिक स्थिती याचा फटका काही प्रमाणात भारतीय अर्थव्यवस्थेला बसणार असल्याचेही त्यात म्हटले आहे. याचा परिणाम आयएमएफच्या या अहवालात दिसून आला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर चीनची पीछेहाट होत असल्याचेही त्यात म्हटले आहे. आयएमएफने २०१९–२० या आर्थिक वर्षासाठी चीनचा आर्थिक विकास दर ६.४ टक्क्यांवरुन घसरुन ६.२ टक्क्यांवर घसरणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. अमेरिकेसोबतच्या व्यापारी युद्धाचा परिणाम चीनच्या अर्थव्यवस्थेवर होणार असल्याचे यातून दिसते. अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापारयुद्धामुळे चीनची निर्यात मंदावली आहे. याचा थेट परिणाम चीनच्या अर्थव्यवस्थेवर होणार असल्याचे मत या अहवालात नोंदवले आहे.