मुंबई : शिर्डी साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आदेश हा विश्वस्त मंडळाच्या बरखास्तीचा नसून पुनर्निरीक्षणाचा आहे, असे शिर्डी संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी स्पष्ट केले. संस्थानाच्या विश्वस्त मंडळाबाबत मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर दै. ‘मुंबई तरूण भारत’शी बोलताना डॉ. हावरे यांनी ही माहिती दिली.
साईबाबा संस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त करून त्याजागी नवे विश्वस्त मंडळ नेमण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले असल्याचे वृत्त मंगळवारी सायंकाळी काही प्रसारमाध्यमांद्वारे प्रसिद्ध झाले. याबाबत संस्थानाचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, “सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार, विश्वस्त मंडळातील सदस्यांचे तज्ज्ञ समितीद्वारे सहा आठवड्यात पुनर्निरीक्षण करण्याचा आदेश देण्यात आला आहे.”
विश्वस्त मंडळ बरखास्त करण्यात आले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, विश्वस्त मंडळाला त्याचे काम करण्यापासून, संबंधित कोणतेही निर्णय घेण्यापासून मनाई करण्यात आली नसल्याचेही ते म्हणाले. हेच मंडळ पुढेही कार्यरत राहणार असून, तज्ज्ञांच्या समितीद्वारे या मंडळाचे पुनर्निरीक्षण झाल्यानंतर मंडळाचे पुनर्गठन करण्यात येईल, असे डॉ. हावरे यांनी स्पष्ट केले.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/