लैंगिकतेविषयीचे योग्य शिक्षण हे मानवी विकासातील फार महत्त्वाचे शिक्षण आहे. वास्तविक पाहता, या शिक्षणाची प्रक्रिया जन्मापासून प्रौढत्वापर्यंत आणि नंतरही निरंतरपणे चालत राहणारी आहे.
लैंगिकतेविषयीचे योग्य शिक्षण हे मानवी विकासातील फार महत्त्वाचे शिक्षण आहे. वास्तविक पाहता, या शिक्षणाची प्रक्रिया जन्मापासून प्रौढत्वापर्यंत आणि नंतरही निरंतरपणे चालत राहणारी आहे. या शिक्षणाची प्रक्रिया एक-दोन पुस्तके वाचायला देणे, काही व्हिडिओज दाखवणे आणि एखाद्या सत्राद्वारे केलेली चर्चा यापेक्षा खूप दीर्घकाळ चालणारी असायला हवी. लहान मुलाला स्वत:ची आंघोळ स्वत: करायला शिकवताना शरीराचे सर्व अवयव स्वच्छ करायला सांगणे यातही लैंगिकतेचे शिक्षण समाविष्ट नाही का? माझे शरीर सुदृढ ठेवण्याची जबाबदारी आणि माझ्या शरीराचा योग्य वापर करण्याचा हक्क या दोन्ही गोष्टी माझ्यावरच अवलंबून आहेत, ही जाणीव मुलांना लहानपणापासूनच हळूहळू देत राहायला हवी. या शिक्षणाच्या प्रक्रियेत गरज पडेल तिथे तज्ज्ञांची मदत घेणेही अत्यंत आवश्यक आहे.
‘मुलांशी लैंगिकतेच्या विषयावर नक्की कधी बोलायला सुरुवात करावी?’ असा प्रश्न उत्सुक आणि सज्ञान पालक विचारतात. गरजेपेक्षा जास्त माहिती कमी वयात देणे पालकांना प्रशस्त वाटत नाही. अर्थात, त्यांनी विचारलेल्या या प्रश्नाचे उत्तर म्हणून एक विशिष्ट वय सांगता येणार नाही. कारण, प्रत्येक मुलाची आकलनशक्ती, समज, प्रगल्भता, सारासारविवेकबुद्धी वेगवेगळ्या पातळीवर व वेगवेगळ्या वेगाने विकसित होत असते. परंतु, आपण घरात मुलांना, जे मनात येतील ते प्रश्न विचारण्यासाठी पोषक असे वातावरण निर्माण केलेले असेल, तर बहुतांश वेळा मुलांचे प्रश्नच त्यांची त्या प्रश्नांविषयीची माहिती ग्रहण करण्याची तयारी दर्शवणारे असतात. त्यामुळे असे प्रश्न पालक म्हणून आपण कसे हाताळतो हे फार महत्त्वाचे आहे. हे प्रश्न अनेकदा कात्रीत पकडणारे असले तरी, ते टाळून चालणार नाहीत. त्याचबरोबर प्रश्नाच्या फार पुढे जाऊन त्याक्षणी मुलांना ग्रहण करता येणार नाही, अशी माहिती पुरवण्याचीही आवश्यकता नाही. ‘मनमोकळा संवाद’ व ‘शास्त्रशुद्ध ज्ञान’ हे लैंगिकतेच्या शिक्षणाचे मूलभूत आधारस्तंभ आहेत. तेरा-चौदा वर्षानंतर मुला-मुलींना भिन्नलिंगी आकर्षण वाटणे ही अत्यंत नैसर्गिक बाब आहे, हे पालकांनी प्रथमतः मनापासून स्वीकारायला हवे. त्यानंतरच मग आपल्या भावनांवर, वर्तनावर नियंत्रण कसे ठेवायचे हे मुलांना शिकवणे शक्य होईल. या वयात भावनांच्या आहारी जाण्याची शक्यता मुलांच्या बाबतीत तशीही बरीच वाढलेली असते. त्यामुळे अशा संवेदनशील विषयांवर पालकांच्या जर तीव्र प्रतिक्रिया उमटत गेल्या, तर मात्र त्याचा दुष्परिणाम होण्याचीच शक्यता जास्त असते. इथे प्रामुख्याने पालकांच्या विचार, भावना व वर्तनातील संतुलन फार महत्त्वाचे आहे.
- गुंजन कुलकर्णी
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/