मृत्यू म्हणजे आपल्याबद्दल चिंतन म्हणजे विनोबा आठवतात. भगवद्गीतेचा पाठ डोळ्यांसमोर येतो. मृत्यू म्हणजे मोठी झोप. एरवी नेहमीची आठ तासांची ही निद्रा.
जातस्य हि ध्रुवो मृत्यूध्रुव जन्म मृतस्य च
तस्माद परिहार्येऽर्थे त्वं शोचितुमर्हसि ॥२७॥
(भ.गी. अध्याय २)
अर्थात, हे मृत्यो, तू आधी का, कसा कुठे केव्हा येणार? सॉरी! त्यातील का, हा प्रश्न नको विचारायला. तू यायलाच पाहिजे. निसर्ग नियम तो.
उपजे ते नाशे नायले पुनरपि दिसे।
हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमे गा ॥
(ज्ञानेरश्वरी दुसरा अध्याय)
जन्म व मृत्यू हे आयुष्याचे दोन किनारे धरले, तर गेलेलेआयुष्य हे खडक, रेताळ पाणी, संथ प्रवाह, खडकाळ प्रदेश, भोवरे यात अडकत सावकाश प्रवाहित केले तरी, मृत्यू हा किनारा लागणारच. जन्म-मृत्यू ठरलेले आहेत. त्याला पर्याय नाही. यातून गरीब-श्रीमंत, बुद्धिमान-अडाणी, सुंदर-कुरूप, लहान-थोर कुणीच सुटलेले नाहीत. समर्थांनी दासबोधात ३०-३५ ओव्याचा एक समासच फक्त मृत्यूवर लिहिला आहे.
माती सांगे कुंभाराला, पायी मज तुडविसी।
तुझाच आहे शेवट वेड्या, माझ्या पायाशी॥
शरीर खूप विकलांग झाल्यावर नको रे बाबा मृत्यू देऊ. आयुष्य बदलणारच, थकणारचं, परस्वाधीन थोडफार होणारचं, पण हालचाल स्वयंचलित असू दे. अर्थात, ही मागणी भगवंताजवळ बरं! यमराज, तुम्हाला घाबरण्याचं वय नाही माझं. जाणत झालं आहे. जो आला तो जाणार हे निश्चित आहे. या मोठ्या प्रवासाची दोन गाठोडी तयार आहेत.एक मोठं गाठोड व एक लहान. पुण्य असलेलं मोठं असेल गाठोड, असं मला वाटतं. अर्थात, ते ठरविण्याचा अधिकार आपला आहे भगवंत. आमचे आगाशे काका सांगत होते, एकदा असेच दुपारीयमराज दाराशी आले आणि म्हणाले, “येऊ का?” म्हटंल, “या बसा... पाणी घ्या. चहा सांगतो ठेवायला.” “मला वेळ नाही. आमची काळवेळ ठरलेली असते. मी यायला आलो आहे,“ यमराज म्हणाले. “मग, मी तयार आहे गाठोडे बांधून. चहा घ्या. मग निघू.” खरंच कल्पनेनेही चित्र किती छान वाटतं. प्रत्यक्ष यमाशी असं बोलता येईल का? सती सावित्री, नचिकेत यांची पुण्याई निराळी.
मृत्यू म्हणजे आपल्याबद्दल चिंतन म्हणजे विनोबा आठवतात. भगवद्गीतेचा पाठ डोळ्यांसमोर येतो. मृत्यू म्हणजे मोठी झोप. एरवी नेहमीची आठ तासांची ही निद्रा. आमच्या काकांनी कॅलेंडरवर १३ तारखेवर खूण केली होती व लिहिले होते, ‘मी नसेन तरी, सर्वजण मजेत राहा.’ त्यांना कळलं होतं दीर्घ झोपेचं तत्त्व. घरात मृत्यूबद्दल सहसा उगीच कुणी बोलत नाही. उलट निरवानिरवीचा विषय कुणी काढला, तर विषय बदल असं म्हणतात. ‘खरं तरं मरणाचे स्मरण असावे,’ हे वाक्य मला फार आवडते. बाबा आमटे म्हणतात, “असं जगावं, बोलावं. खूप आयुष्य आहे समजून बेत करावे मरून.” पण असंही जगावं जणू काही उद्याच मृत्यू येणार आहे म्हणून झोकून देऊन जिद्दीने हिंमतीने पूर्ण शक्ती लावून काम करावे, जसे उद्याचा दिवस आपल्यासाठी उगवणारंच नाही. संत नाथांनी एक गृहस्थाला “तुम्ही सात दिवसांनी मरणार आहात असे सांगितले.” तर त्या कंजुष रागीट माणसाचं वागणं बदललं. सौम्य, कुणाला दुखणार नाही अशी भाषा वापरू लागला. त्याचा स्वभाव बदलला. ‘नाथांनी मरणाचे स्मरण ठेव’ असाच उपदेश केला. खिल्लारीचा भूकंप उत्तराखंडाचा महापूर केवढे रौद्ररूप. भीती वाटते त्या प्रसंगाची. होत्याचे नव्हते झाले तेव्हा. पितृपंधरवडा आला की कोणतेही शुभ कार्य करत नाहीत.
कालः कलयतामहम। किंवा मृत्युः सर्व हरश्चाहमुद्भवश्च भविष्यताम्।
असं भगवंतानी सांगितलं आहे. खरं आहे. सॉरी खूप बोलले. नम्रपणे आदरपूर्वक शरणागत होऊन नतमस्तक होते. प्रत्यक्ष नाही करता येणार म्हणून!
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/