‘ए टीम’ ठरवलेलीच आहे!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Oct-2018   
Total Views |


 


एक दुसऱ्याला आपल्याशिवाय तुझे चालणार नसल्याचे पटवून देण्यासाठीचे खेळ चालवित आहेत. मात्र, त्यात त्यांचेच नाकर्तेपण जनतेसमोर उघडे पडत चालले आहेत. अशा ‘भाजपची बी टीम’ आरोपातून ते जनतेला समजावून देत आहेत की, आम्ही सगळे विरोधकच राजकारणातली ‘बी टीम’ आहोत आणि उत्तम टीम हवी असेल, तर मतदाराने ‘भाजपची ए टीम’ म्हणजे मोदींकडे जावे.

 

चार-पाच महिन्यांपूर्वी कर्नाटकातल्या निवडणूका ऐन रंगात आलेल्या होत्या आणि सगळेच प्रमुख पक्ष आवेशात प्रचाराला लागलेले होते. त्यात मग एकमेकांवर आरोप आणि चिखलफेक, ही नित्याची बाब झालेली आहे. पण, एक आरोप गेल्या चार-पाच वर्षांत सातत्याने सगळे बिगरभाजप पक्ष सातत्याने करीत असतात, त्याची गंमत वाटते. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत तो आरोप झाला होता आणि अलीकडल्या काळात तोच आरोप तेलंगणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्यावरही झालेला आहे. गेल्या बुधवारी तोच आरोप बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावतींनी काँग्रेसवर केला आणि गंमत वाटली. त्यांनी मध्यप्रदेशात आपल्या पक्षातर्फे सर्व जागा लढवण्याची घोषणा करतानाच, महागठबंधन व काँग्रेसशी आघाडीची शक्यता संपवतानाच काँग्रेसलाच ‘भाजपचा एजंट’ म्हणण्यापर्यंत मजल मारली. तिथले माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे तोंडाळ नेते दिग्विजयसिंग, यांना ‘भाजपचे एजंट’ म्हटले. नेमका हाच आरोप कर्नाटकात पाच महिन्यांपूर्वी काँग्रेसचे तत्कालीन मुख्यमंत्री सिद्धरामय्या देवेगौडांच्या पक्षावर करीत होते. आज काँग्रेसशी युती करून सत्तेत बसलेले कुमारस्वामी व त्याचा जनता दल सेक्युलर, हा पक्ष भाजपची ‘बी टीम’ असल्याचा तो आरोप होता. मात्र, मजेची गोष्ट अशी की, मतदान संपून निकाल लागल्यावर काँग्रेसने सर्वप्रथम याच भाजप ‘बी टीम’शी सत्तेसाठी हातमिळवणी करून टाकली होती. थोडक्यात, ‘भाजपची बी टीम’ हा आता एक राजकीय विनोद होऊन गेला आहे. ज्याला कोणाला शिव्या घालायच्या असतील, त्याच्यावर ‘भाजपची बी टीम’ असा शिक्का मारायचा, ही पुरोगमी फॅशन बनलेली आहे. पण, त्यातून एक निष्कर्ष नक्की काढता येतो. सगळा मोदी विरोधातला शोध हा भाजपच्या ‘बी टीम’साठी चालू असून, ‘ए टीम’ कुठली ती प्रत्येकाने मान्य केलेली आहे. तिचे नाव मुद्दाम सांगण्याची गरज आहे काय?

 

कुठल्याही खेळात उत्तम खेळाडूंचा संघ असतो, त्याला ‘ए टीम’ असे नाव गृहीत असते. साहजिकच जे कोणी तितकेच चांगले, पण उत्तम खेळू शकत नसतील, त्यांचीही एक टीम तयार ठेवली जात असते. विचित्र प्रसंग आला मग ही ‘बी टीम’ बाहेर काढली जाते. कुठल्याही जटील गुंतागुंतीच्या कामात व योजनेत ‘ए प्लान’ असतो, तसाच ‘बी-सी’ असे आणखी प्लान तयार असतात. त्याचा अर्थ मुख्य योजना असफल झाली तर इतर पर्याय बघायचे असतात. विचारात घ्यायचे असतात. पण पहिलाच प्लान वा योजना चांगली असेल, तर इतर योजनांना कोणी किंमत देत नाही, विचारातही घेत नाही. ‘बी टीम’ हा तसाच प्रकार आहे. हा संदर्भ लक्षात घेतला, तर ‘भाजपची बी टीम’ म्हणजे काय ते लक्षात येऊ शकेल. कुठल्याही क्षणी भाजपला अडचण आली, तर त्याच्या मदतीला धावून जाईल अशा पक्षाला वा नेत्याला ‘बी टीम’ संबोधले जायला हवे. पण, प्रत्यक्षात बघितले तर या सगळ्या ‘भाजपच्या बी टीम’, नेहमी भाजप विरोधकांनाच मदतीला धावून जात असतात. ते शरद पवार, मायावती वा देवेगौडा असोत वा ममता असोत. याच मायावतींनी उत्तराखंडात कोसळणारे काँग्रेस सरकार वाचवण्यासाठी आपले दोन आमदार कोणाच्या मदतीला पाठवले होते? एफडीआय विरोधात मोठे भाषण संसदेत दिल्यानंतरही प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी मायावती कोणाच्या बाजूने गेल्या होत्या? हा सगळा इतिहास उकरून काढला तर ‘भाजपच्या बी टीम’ या प्रत्यक्ष व्यवहारात काँग्रेसच्याच ‘बी टीम’ म्हणून कायम राबत राहिल्या आहेत. त्यात बंगालच्या मार्क्सवादी पक्षाची गणना होते, तशीच महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी पक्षाचीही गणती होते. मात्र, त्यांचे एकमेकांशी सौदे साधले नाहीत, मग परस्परांवर चिखलफेक करताना त्यापैकी कोणावर तरी ‘भाजपची बी टीम’ अशा शिक्का मारला जात असतो. पण, अशा कुठल्याही ‘बी टीम’ची भाजपाला निदान मागल्या चार-पाच वर्षात गरजही भासलेली नाही ना?

 

त्यातला विनोद बाजूला ठेवला तर एक गोष्ट लक्षात येते की, ही विरोधकांची पराभूत मानसिकता आहे. त्यांच्यात परस्परांचा विश्वास नाही आणि स्वत:च्या बळाविषयी आत्मविश्वासही नाही. एकमेकांच्या आधाराशिवाय चालणे-उभे राहाणेही अशक्य असल्याचा आत्मविश्वास जबरदस्त आहे. मात्र, एकमेकांना आधार देताना आपले ओझे कुणा दुसऱ्याने निमूटपणे उचलावे आणि आपण पालखीत बसून सैर करावी; अशी प्रत्येकाची महत्त्वाकांक्षा आहे. तिथेच सगळी गडबड होऊन जाते. तसे झाले, मग बाकी गोष्टी सोडून देत एकमेकांना ‘भाजपची बी टीम’ ठरवण्याची स्पर्धा सुरू होत असते. पण, यातला कोणीही ‘भाजपची ए टीम’ कोण त्याचा खुलासा कशाला करत नाही? की त्यांना ती टीम ठाऊक आहे आणि त्या ‘भाजपच्या ए टीम’चे नावही घेण्याची भीती वाटत असते? की त्या ‘ए टीम’ला कुठल्याही ‘बी टीम’ची गरजही नसल्याची भीती अशा लोकांना सतावत असते? मायावती वा काँग्रेसला आपल्या शक्तीचा इतकाच आत्मविश्वास असेल, तर त्यांनी मुळात जागावाटप किंवा तडजोडीची भाषा करवीच कशाला? आपल्याच बळावर भाजपला एकहाती पराभूत करायचा मनसुबा कशाला नसावा? कारण स्पष्ट आणि उघड आहे. आपला नाकर्तेपणा प्रत्येकाला साफ माहिती आहे. मात्र, ते मान्य करून तडजोड करायची नाही, की एकहाती लढायची क्षमता आत्मसात करायचे कष्ट घ्यायचे नाहीत. साध्या शब्दात भीक हवी आहे, पण हक्काचे दावेही जोरात आहेत. एक दुसऱ्याला आपल्याशिवाय तुझे चालणार नसल्याचे पटवून देण्यासाठीचे खेळ चालवित आहेत. मात्र, त्यात त्यांचेच नाकर्तेपण जनतेसमोर उघडे पडत चालले आहेत. अशा ‘भाजपची बी टीम’ आरोपातून ते जनतेला समजावून देत आहेत की, आम्ही सगळे विरोधकच राजकारणातली ‘बी टीम’ आहोत आणि उत्तम टीम हवी असेल, तर मतदाराने ‘भाजपची ए टीम’ म्हणजे मोदींकडे जावे.

 

आघाडीत आपल्याला मित्रपक्ष काय देणार, यापेक्षा आपण मित्राला काय अधिक देऊ शकतो, याला प्राधान्य असते. मोदींची घोडदौड रोखण्यासाठी बिहारमध्ये नितीश हट्टाला पेटले. त्यांनी ११२ आमदार असतानाही शंभर जागांवर समाधान मानले होते आणि २८ आमदार असलेल्या लालूंना शंभर जागा दिल्या होत्या. काँग्रेसचे अवघे ४ आमदार असतानाही त्यांना ४० जागा देऊ केल्या होत्या. त्याला खरी ‘आघाडी’ म्हणतात. जिथे ‘ए टीम’ किंवा ‘बी टीम’ असले आरोप करावे लागत नाहीत. आताही तिथे बिहारमध्ये लोकसभेच्या २२ जागा भाजपकडे आहेत. पण, नितीशना सोबत घेण्यासाठी भाजप २० जागांपर्यंत खाली यायला राजी झालेला आहे. लढायला अधिक जागा मागण्यापेक्षा जिंकायच्या जागा अधिक जुळवण्याला ‘आघाडी’ वा ‘गठबंधन’ असे नाव आहे. पण, ते काँग्रेसच्या स्वभावातच नाही. म्हणून त्यांनी बंगालमध्ये मार्क्सवादी पक्षाशी आघाडी करून त्याला बुडवले आणि उत्तरप्रदेशात शंभर जागा घेऊन समाजवादी पक्षाचा बोऱ्या वाजवून दिला. मायावतींना त्यासाठीच काँग्रेसच्या सोबत जाण्याची भीती सतावते आहे. लाभ होण्यापेक्षा आपला तोटा झाला तर? काँग्रेस सोबत युती-आघाडी करून कुठल्याही पक्षाचा स्थानिक वा सार्वत्रिक निवडणुकीत फायदा झाल्याची आकडेवारी उपलब्ध नाही. मात्र, अशा आघाड्यातून ‘बी टीम’ झालेल्यांचा अवतार संपुष्टात आल्याचे दाखले पैशाला पासरी आहेत. मायावती त्यालाच घाबरलेल्या असाव्या. म्हणून त्यांनी छत्तीसगढमध्ये अजित जोगींच्या नवख्या पक्षाची ‘बी टीम’ होणे पसंत केले, कर्नाटकात देवेगौडांची ‘बी टीम’ होण्याला मान्यता दिली. पण, काँग्रेस पक्षाची ‘बी टीम’ व्हायला मायावती तयार नाहीत. त्याच कशाला? दिवस जवळ येत जातील, तसे इतरही लहानमोठे पक्ष असेच काँग्रेसला हुलकावणी देऊन अन्य पर्याय स्विकारत जातील. कारण, ‘भाजपची बी टीम’ म्हणून बदनाम होण्यापेक्षा ‘काँग्रेसी बी टीम’ होण्यातला धोका अधिक आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@