ठाणे : जिल्ह्यातील शाळांमध्ये तब्बल सात ते आठ वर्षांपासून बिनपगारी अध्यापनाचे कार्य करणाऱ्या 168 शिक्षकांच्या मान्यतेचा तिढा सुटला असून, जिल्हा परिषदेने शालार्थ आयडी मिळण्यासाठी प्रस्ताव आयुक्तांकडे पाठविले आहेत. कोकण पदवीधर मतदारसंघाचे आ. निरंजन डावखरे यांच्या प्रयत्नानंतर रखडलेले मान्यतेचे प्रस्ताव मार्गी लागत आहेत.
राज्य सरकारने दि. 2 मे 2012 रोजी शिक्षक भरतीवर घातलेली बंदी दि. 20 जून, 2014 रोजी उठविली होती. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. या समितीकडून शिक्षकांच्या पदांना मान्यता देण्यात येणार होती. मात्र, या समितीची बैठक झाली नाही.