मुंबई : एबीपी आणि सी-व्होटरने केलेल्या सर्वेक्षणानुसार भाजपच पुन्हा सत्तेत येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भाजपाला सर्वाधिक जागा मिळतील मात्र २०१४ च्या तुलनेत त्यांच्या जागा कमी होणार असल्याचे या सर्वेक्षणात दिसून आले. आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर देशाचा मूड काय आहे? हे एबीपी आणि सी-व्होटरने जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यानुसार २०१९ च्या लोकसभेत भाजपाला २७४ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर दुसरीकडे पंतप्रधान पदाचा योग्य उमेदवार कोण? या प्रश्नावर ५७ टक्के नागरिकांनी नरेंद्र मोदी यांना पसंती दिली आहे. एबीपी आणि सी-व्होटरच्या सर्वेक्षणानुसार ६० टक्के जनता मोदी सरकारवर समाधानी आहेत.
महाराष्ट्राचा विचार केल्यास राज्य सरकारवर ६४ टक्के जनता समाधानी आहे. तर ६२ टक्के जनता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामावर खुश आहे. दरम्यान, महाराष्टातील ४८ जागांवर सर्व पक्ष स्वतंत्र निवडणूक लढल्यास भाजपाला २२ मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे राज्य सरकारला व मोदी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरोधकांना या सर्व्हमुळे घाम फुटण्याची शक्यता आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/