राजकोट: भारत विरुद्ध वेस्ट इंडिजच्या पहिल्या कसोटी सामन्यात पहिले दोन दिवस हे 'शतकी' दिवस होते असे म्हणायला काही हरकत नाही. पहिल्या दिवशी पृथ्वी शॉच्या शतकाने गाजला होता तर दुसरा दिवस हा कर्णधार विराट कोहली आणि त्यानंतर रवींद्र जडेजाच्या शतकाने गाजला. याशिवाय रिषभ पंतचे शतक ८ धावांनी तर पुजाराचे शतक १४ धावांनी हुकले. या सामन्यात आतापर्यंत अनेक विक्रम रचले गेले.
१८ वर्षाच्या मुंबईकर पृथ्वी शॉने पदार्पणातच शतक ठोकले. पदार्पणात शतक ठोकणारा शॉ हा १५वा भारतीय फलंदाज ठरला आहे. तर कमी वयात शतक ठोकणारा तो जगातला सातवा तर भारतातील दुसरा फलंदाज ठरला आहे. शॉ आणि पुजाऱ्याने दुसऱ्या विकेटसाठी २०६ धावांची भागीदारी केली. पुजाराचे शतक अवघ्या १४ धावांनी हुकले. ८६ धावांवर असताना त्याला लेवीसने झेलबाद केले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दिवस गाजवला तो कर्णधार विराट कोहलीच्या शतकाने आणि नंतर जडेजाने ही आपल्या कसोटीमध्ये पहिले शतक साजरे केले.
कोहलीने सलग तिसऱ्या कॅलेंडर वर्षात १००० धावांचा टप्पा ओलांडला. ही कामगिरी करणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला. त्याने राजकोट कसोटीत १३९ धावांची खेळी केली. त्यानंतर सर रवींद्र जडेजाने कसोटी कारकिर्दीतले पहिले कसोटी शतक साजरे केले. दरम्यान, कोहलीसोबतच्या १३३ धावांच्या भागीदारीमध्ये रिषभ पंत याने ९२ धावांचे योगदान दिले. त्याचे शतक केवळ ८ धावांनी हुकले. वेस्ट इंडिज गोलंदाजाचा मात्र भारतीय फलंदाजांनी घाम काढला. बिशूला सर्वाधिक ४ बळी टिपले.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/