कोरेगाव भीमा लढाईवेळी महार रेजिमेंटच नव्हती !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Oct-2018
Total Views |



पुणे : पेशवे किंवा इंग्रज यांच्यापैकी कुणीही कोरेगाव-भिमा लढाई जिंकलं अथवा हरलंच नाही, असा गौप्यस्फोट इतिहास संशोधक चंद्रकांत शामराव पाटील यांनी कोरेगाव भीमा चौकशी समितीपुढे नुकताच केला आहे. १ जानेवारी १८१८ रोजी कोरेगाव भीमा लढाईच्यावेळी महार रेजिमेंटच नव्हती, असा दावाही त्यांनी केला आहे. पाटील यांनी पुरावा म्हणून शेकडो पानांसह प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश जे. एन. पटेल यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीपुढे सुनावणी सुरू आहे. कोरेगाव भीमाची लढाई बडोद्याच्या गायकवाडांचे मंत्री गंगाधर शास्त्री पटवर्धन यांची हत्या दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचे विश्वासू त्रिंबकजी डेंगळे यांनी घडवल्यावरून झाल्याचा दावा पाटील यांनी केला. ही लढाई कुठल्याही जाती वा धर्माशी संबंधित नव्हती, असे सांगतानाच पाटील यांनी प्रसारमाध्यमांमध्ये आलेली पाचशे महार व पेशव्यांचे २८ हजार सैनिक यांच्यात झाल्याची माहिती संशयास्पद असल्याचे त्यांनी म्हटले. महार रेजिमेंटची स्थापना १९४१ मध्ये झाली, त्यामुळे त्यांचा १८१८च्या लढाईत सहभाग असण्याचा प्रश्नच येत नाही असा दावा पाटील यांनी केला आहे.

 
 

गेले पाच महिने पाटील जयस्तंभाशी संबंधित इतिहासाचा अभ्यास करत असून खरा इतिहास व छापून आलेला इतिहास यात प्रचंड तफावत असल्याचे ते म्हणाले आहेत. कोरेगाव भीमाच्या लढाईची दोनशे वर्षे साजरी करताना इतिहासाकडे दुर्लक्ष झाल्याचेही ते म्हणाले. ब्रिटिशांनी लिहिलेले ग्रंथ तसेच मुंबई व पुण्याची नोंद व अन्य स्त्रोतांचा अभ्यास आपण केल्याची साक्ष पाटील यांनी दिली आहे. महसुलाच्या वसुलीवरून पेशव्यांशी असलेले वाद मिटवण्यासाठी ब्रिटिशांच्या मध्यस्थीनंतर बडोद्याच्या गायकवाडांनी गंगाधर शास्त्री यांना पुण्याला पाठवले होते. परंतु, १४ जुलै १८१५ रोजी त्रिंबकजी डेंगळे व त्यांच्या माणसांनी शास्त्रींची हत्या केली, असा दावा पाटील यांनी केला. ब्रिटिशांच्या चौकशीत डेंगळे व त्यांचे दोन सहकारी दोषी आढळले. ब्रिटिशांच्या मागणीवरून पेशव्यांनी डेंगळ्यांना त्यांच्या हवाली केले. डेंगळ्यांना ठाण्याच्या तुरूंगात ठेवण्यात आले, परंतु तिथून सुटका करून घेत डेंगळ्यांनी साताऱ्याजवळच्या फलटणमध्ये ब्रिटिशविरोधी फौज उभी केली. पेशव्यांकडून मिळालेल्या निधीच्या बळावर जमा केलेल्या या सैन्यामध्ये भिल्ल, मांग, रामोशी, मराठा व अन्यांचा समावेश होता असा दाखला पाटील यांनी दिला आहे.

 
 

दरम्यान, पेशव्यांनी ब्रिटिशांच्या एलफिन्स्टन यांना ताब्यात घेण्याची कारवाई केली परंतु, एलफिन्स्टन निसटला. ब्रिटिशांच्या ऐतिहासिक कागदपत्रांनुसार ५ नोव्हेंबर १८१७ च्या या घटनेनंतर ब्रिटिश सैन्याने पेशव्यांचा पाठलाग केला. ३१ डिसेंबर २०१७ रोजी कोरेगावजवळ ब्रिटिशांचे सैन्य व मुख्यत: अरबांचा समावेश असलेले पैशव्यांचे सैन्य यांच्यात लढाई झाली. पेशव्यांचे पाचशे तर ब्रिटिशांचे १११ सैनिक ठार झाले. एक जानेवारीला पेशवे सैन्यासह साताऱ्याला गेले तर ब्रिटिश शिरूरच्या छावणीत गेले व कुठलंही सैन्य जिंकलं अथवा हरलं नाही, असा दावा पाटील यांनी केला आहे. त्यानंतर अनेक महिन्यांनी जून १८१८ मध्ये पेशव्यांनी ब्रिटिशांपुढे शरणागती पत्करल्याचे पाटील यांनी म्हटले आहे. भीमा कोरेगाव येथील हिंसाचारप्रकरणी नियुक्त करण्यात आलेल्या चौकशी आयोगाकडून बुधवारपासून साक्षी नोंदविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. जुन्या जिल्हा परिषदेत आयोगाला कार्यालय उपलब्ध करून देण्यात आले असून सहा ऑक्टोबपर्यंत सतरा प्रतिज्ञापत्रांवर सुनावणी होणार आहे. भीमा कोरेगाव हिंसाचारप्रकरणी कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश जे. एन. पटेल आणि राज्याचे माजी मुख्य सचिव सुमित मलिक यांचा द्विसदस्यीय आयोग स्थापन करण्यात आला आहे. या आयोगाने मे महिन्यात भीमा कोरेगाव, पेरणेफाटा, वढू-बुद्रुक, सणसवाडी येथे भेट देऊन स्थानिकांशी संवाद साधला होता. चौकशी आयोगाकडे हिंसाचार प्रकरणी विहित मुदतीमध्ये दाखल प्रतिज्ञापत्रांपैकी १७ अर्जांवर ६ ऑक्टोबपर्यंत सुनावणी घेण्यात येणार आहे. प्राप्त अर्जावर १० ऑक्टोबपर्यंत सुनावणी घेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. परंतु, तोपर्यंत साक्षी नोंदवणे, तसेच सुनावणी पूर्ण न झाल्यास शासनाकडून आयोगाला मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे.

 
 

   माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@