अल्प कार्यकाळांची परंपरा
रंजन गोगोई यांना सरन्यायाधीश म्हणून जेमतेम १३ महिन्यांचा कार्यकाळ मिळू शकणार आहे. पुढील वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या सुमारास हा कार्यकाळ संपेल. न्यायव्यवस्था, प्रशासन आदी सर्वच यंत्रणांमध्ये संबंधित पदाधिकार्यांना बहुतांश वेळा असाच थोडाथोडका कार्यकाळ मिळताना दिसतो. त्या त्या संस्थांमधील वरिष्ठ किंवा सर्वोच्च पदांवर जेव्हा ही मंडळी पोहोचतात, तेव्हा त्यांचा निवृत्तीचा काळदेखील जवळ आलेला असतो. प्रशासनातही विविध विभागांचे मुख्य सचिव इ. जेव्हा पदभार स्वीकारतात, तेव्हा त्यांना फारतर सात-आठ महिन्यांचा किंवा वर्षभराचा कार्यकाळ मिळतो. अर्थात, याला काही अपवाद जरूर असतात, परंतु बहुतेकांचं हे असंच होतं. कित्येकांना तर दोन-तीन महिन्यांतच गाशा गुंडाळावा लागतो. आता सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांचंच घ्या. मुळात सरन्यायाधीशांच्या सेवानिवृत्तीचं वय आहे ६५. तथापि गोगोई यांच्यापूर्वी सरन्यायाधीश झालेल्या ४५ पैकी जेमतेम २४ जणांनाच १ वर्षाहून किंवा ३६५ दिवसांहून अधिक कार्यकाळ मिळाला. पैकी ७ सरन्यायाधीश एक हजार दिवसांहून अधिक म्हणजे साधारण पावणेतीन-तीन वर्षांचा कार्यकाळ मिळवू शकले. वाय. व्ही. चंद्रचूड हे सर्वोच्च न्यायालयाच्या आतापर्यंतच्या इतिहासात सर्वाधिक काळ पदावर राहिलेले सरन्यायाधीश. फेब्रुवारी, १९७८ ते जुलै १९८५ या काळात सरन्यायाधीशपदी राहिलेले चंद्रचूड यांना या पदावर २६९६ दिवस मिळाले. दुसरीकडे ४५ पैकी ८ सरन्यायाधीशांना वर्ष तर सोडाच, १८० दिवस म्हणजे जेमतेम सहा महिनेदेखील मिळू शकले नाहीत. एकविसावं शतक उजाडल्यावर म्हणजे २००० नंतर देशात १६ सरन्यायाधीश झाले, पैकी निम्म्या म्हणजे ८ सरन्यायाधीशांना ५६५ दिवसांहून अधिक म्हणजे एक वर्षाहून अधिक कार्यकाळ मिळाला. दुसरीकडे, एकविसाव्या शतकाच्या प्रारंभी जे पहिले ३ सरन्यायाधीश झाले, त्यांच्या कार्यकाळाचे दिवस होते, अनुक्रमे १८५, १८५ आणि ४०! सेवानिवृत्तीचे वय ६५ असूनही या पदावर पोहोचेपर्यंत बहुतेकांची साठी पूर्ण झालेली असते. त्यामुळे मिळणाऱ्या जेमतेम कार्यकाळात आधी स्थिरस्थावर होणं आणि मग स्वतःचा ठसा उमटवणं, भरीव कामगिरी करणं तसं आव्हानात्मकच असतं. आता १२-१३ महिन्यांचा कार्यकाळ मिळालेले सरन्यायाधीश रंजन गोगोई हे आव्हान कसं पेलतात, हे येत्या काळात स्पष्ट होईलच.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/