क्रिकेटच्या ‘धाकड गर्ल्स’
भारतीय पुरुष संघाने सुरू केलेली विजयाची घोडदौड पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी सध्या महिला संघावर आहे. नोव्हेंबरपासून वेस्ट इंडिजमध्ये सुरू होणाऱ्या महिला ‘टी-२०’ विश्वचषकासाठी फलंदाजांची क्रमवारी, जोड्या याबाबत विविध पर्याय पडताळून महिला संघाकडे तयार आहेत. यावरून पूर्वतयारी झाली असून आता नजर फक्त विश्वचषकाकडेच. सध्याच्या यंग महिला संघाची खासियत या सगळ्या मुली निर्भीड आहेत, सरावात आपला सगळा जोर लावतात, फिटनेसही कटाक्षाने चोख पाळतायत. कर्णधार हरमनप्रीत कौरने आपल्या अप्रतिम खेळाचे प्रदर्शन याआधीच दाखवले आहे. त्यामुळे स्मृती मंदाना, पूनम राऊत यांसारख्या तरुण खेळाडूंनी न डगमगता किंवा कोलमडता या विश्वचषकात खेळण्यासाठी तयार असल्याचे चित्र ऑस्टे्रलियासोबत झालेल्या रंगीत तालमीत दिसून आले. भारतीय महिला संघाचा रंगीत तालमीतील खेळ पाहता, विश्वचषकाच्या खेळातही त्यांचा खेळ तेवढ्याच ताकदीचा असेल, यात काही वाद नाही. कारण, भारताच्या या महिला संघाला रमेश पोवार हे मुख्य प्रशिक्षक म्हणून रुजू झाले. त्यांच्यावर ही जबाबदारी टाकल्यानंतरही बरेच वादविवाद झाले खरे, पण भारतीय संघाचा ऑफस्पिनर आणि मुंबईचा ‘खडूस’ क्रिकेटपटू एक चांगला प्रशिक्षक बनेल, हे सराव सामन्यात दिसलेच. या विश्वचषकात जर भारतीय महिला संघाला जिंकायचे असेल तर, दडपणाच्या स्थितीत सरस खेळ करण्यावर भर देण्याची खरी गरज आहे, कारण, गेल्यावर्षी २३ जुलै २०१७ ला पार पडलेल्या महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दडपणामुळेच भारताचे जगज्जेतेपद हुकले. त्यामुळे आता जर विजयाला गवसणी घालायची असेल, तर २०१७ मध्ये केलेल्या चुकांची पुनरावृत्ती होणार नाही, याची काळजी महिला संघाला घ्यावी लागेल. त्याचबरोबर फलंदाजीच्या क्रमवारीतही लवचिकता असणे गरजेचे आहे. सध्या कर्णधार हरमनप्रीत, आघाडीची फलंदाज स्मृती आणि पूनम या आपला उत्तम खेळ करण्यास तयार असल्या तरी विजयासाठी गोलंदाजीवरही तेवढीच मदार असेल. एकूणच या धाकड गर्ल्स यावेळी विश्वचषक घरी आणतीलच...
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/