मुंबई : राज्यभर प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीसाठीची मोहीम अधिक तीव्र केली असून आतापर्यंत ८०० टन प्लास्टिक जप्त करुन ३ कोटी रुपये दंड वसूल केला गेला असल्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी सांगितले. प्लास्टिकबंदीसंदर्भात मंत्रालयात शक्ती प्रदक्त समितीची बैठक झाली त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी प्लास्टिक पिशव्यांचा वापर आढळल्यास देवस्थान समितीच्या प्रमुखावर कारवाई करण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना ते म्हणाले, "प्लास्टिक बंदीची मोहीम केवळ शहरी भागापुरती मर्यादित न राहता ती खेड्यापाड्यांपर्यंत राबविली पाहिजे. जिल्हा परिषद व ग्रामपंचायतीने यात पुढाकार घेऊन जनजागृती करण्याची गरज आहे." तसेच दुकानात वापरले जाणारे पॅकेजिंग मटेरियल एकत्रपणे गोळा करुन त्याचे रिसायकलिंग करण्याची जबाबदारी उत्पादक कंपन्यांची आहे. कंपनीने या प्लास्टिकची योग्य ती विल्हेवाट लावली नाही तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा पर्यावरणमंत्री कदम यांनी दिला.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/