नवी दिल्ली : टेलिकॉम क्षेत्रातील आघाडीची कंपनी ‘जिओ’ आता ‘फाईव्ह जी’ क्षेत्रात पदार्पण करत असल्याचे संकेत मुकेश अंबानी यांनी दिले आहेत. २०२०मध्ये देशातील सर्व मोबाईल ग्राहक ‘फोरजी’ वापरकर्ते असतील. त्यामुळे आता नव्या ‘फाईव्हजी’ तंत्रज्ञानासाठी सज्ज राहा, असे संकेत ‘रिलायन्स’ समूहाचे अध्यक्ष यांनी दिले आहेत. ‘इंडिया मोबाईल कॉंग्रेस’मध्ये ते बोलत होते. यावेळी केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री रविशंकर प्रसाद, ‘भारती एअरटेल’चे सुनील मित्तल, केंद्रीय टेलिकॉम विभागीय सचिव अरुणा सुंदरराजन आदी मान्यवर उपस्थित होते.
ब्रोडबॅण्ड सेवेत भारताचा १५५वा क्रमांक आहे, मोबाईल डेटाच्या वापरकत्यांमध्ये देश येत्या दोन वर्षात पहिल्या क्रमांकावर येईल. ‘टूजी’, ‘थ्रीजी’ आणि ‘फोरजी’पर्यंतचा प्रवास अद्भभूत आहे. २०१६मध्ये सुरू झालेली ‘रिलायन्स जिओ’ कंपनीही याकाळात देशभर विस्तारत गेली. २०२०पर्यंत याच गतीने आम्ही देशात ‘फोरजी’ सेवेचा विस्तार करणार असून त्यानंतर ‘फाईव्हजी’ क्षेत्रात शिरकाव करु अशी घोषण अंबानी यांनी गुरुवारी केली आहे. ‘जिओ’ आणि ‘गिगाफायबर’च्या विस्ताराबाबत आणि सेवेबाबत सांगताना ते म्हणाले, कि “’जिओ’च्या ग्राहकांनी मागणी केल्यानुसार ‘गिगाफायबर’च्या नेटवर्कचे जाळे आम्हाला भारतभर विस्तारायचे आहे. ‘गिगाफाय’बर बाजारात आल्यानंतर देशात मजबूत नेटवर्कचे जाळे तयार होईल, असा दावाही त्यांनी केला. १३५ देशांतून मोबाईल वापरकर्त्यांमध्ये देशाचा पहिल्या तीनमध्ये क्रमांक येतो. ‘गिगा फायबर’चा विस्तार पाहता बाजारात उतरल्यानंतर त्यावर यात आणखी वाढ होईल, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे.
देशातील टेलिकॉम क्षेत्रात जिओने पाऊल ठेवल्यानंतर ज्या प्रमाणे स्पर्धा निर्माण होईल, सेवा स्वस्त झाली त्याचप्रमाणे गिगाफायबरच्या आगमनानंतर केबल, इंटरनेट सेवाही स्वस्त होण्याची शक्यता सध्या व्यक्त केली जात आहे. ग्रामीण भागात झालेल्या डिजिटल क्रांतीमुळे देश जोडला जात आहे. भारतातील खेड्यांचा कायापालट होण्यात डिजिटल इंडियाचा मोठा वाटा असेल. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात भारत झपाट्याने विकास करत आहे. भारतात जगातील दुसरी सर्वात मोठी डिजिटल अर्थव्यवस्था असून ती झपाट्याने विकसित होत आहे, असे मुकेश अंबानी यावेळी म्हणाले.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/