पक...पक... पकाक्!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Oct-2018
Total Views |
 
 

असदुद्दीन ओवेसीरूपी असंगाच्या संगाने मन कळकटलेल्या प्रकाश आंबेडकरांच्या अंगात एकाचवेळी ब्रिटिशांच्या बरोबरीने क्रूरकर्मा निजामाचे रझाकारही शिरले. अंगात शिरलेल्या पिलावळीच्या तालावर नाचत प्रकाश आंबेडकरांनी आपल्या पोखरलेल्या मेंदूतून देशविरोधी शब्दांची जुळवाजुळव करत थेट ‘वंदे मातरम’लाच विरोध केला.

 

वंचित बहुजन विकास आघाडीच्या मांडवाखाली असदुद्दीन ओवेसींशी पाट लावल्यापासून भारिप-बहुजन महासंघाचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर भलतेच फॉर्मात आल्याचे दिसते. म्हणूनच आपली जोडी सलीम-जावेदसारखी अभेद्य असल्याचे सिद्ध करण्याच्या नादात त्यांनी कोट्यवधी भारतीयांचा श्वास-‘वंदे मातरम’लाच नाकारण्याचा कृतघ्नपणा केला. ‘तेरी मेरी यारी, उडत गेली दुनियादारी,’ हा डायलॉग जसाच्या तसा उचलत प्रकाश आंबेडकरांनी असदुद्दीन ओवेसींच्या ‘वंदे मातरम’ विरोधाला स्वतःच्या दमडीभर पक्षाचा टेकू दिला. “एमआयएमप्रमाणे आमचाही ‘वंदे मातरम’ला विरोधच असेल,” असे फुटपाडू वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी केले. स्वातंत्र्यपूर्व काळात असंख्य भारतीयांना ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीविरोधात झुंजण्यासाठी बारा हत्तींचे बळ देणारी पवित्र अन् तेजस्वी घोषणा म्हणजे ‘वंदे मातरम’. ‘वंदे मातरम’च्या जयघोषाने ज्यांच्या साम्राज्यावरचा सूर्य कधी मावळत नाही, असे म्हटले जाई, त्या ब्रिटिशांची इथल्या मातीतल्या सुपुत्रांनी पाचावर धारण बसवली. परिणामी ब्रिटिशांनी ‘वंदे मातरम’चा नारा देणार्‍यांच्या अंगाखांद्यावर चाबकाचे फटकारे हाणण्याचे काम केले. स्वातंत्र्योत्तर काळातही भारतीयांनी ‘वंदे मातरम’वर मनापासून प्रेम करत मातृभूमीप्रतीचा आदर अन् सन्मान जागता ठेवला. पण, असदुद्दीन ओवेसीरूपी असंगाच्या संगाने मन कळकटलेल्या प्रकाश आंबेडकरांच्या अंगात एकाचवेळी ब्रिटिशांच्या बरोबरीने क्रूरकर्मा निजामाचे रझाकारही शिरले. अंगात शिरलेल्या पिलावळीच्या तालावर नाचत प्रकाश आंबेडकरांनी आपल्या पोखरलेल्या मेंदूतून देशविरोधी शब्दांची जुळवाजुळव करत थेटवंदे मातरम’लाच विरोध केला. दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात ‘भारत तेरे तुकडे होंगे’ची घोषणा देणार्‍या बेशरम प्रवृत्तीत आणि प्रकाश आंबेडकरांच्या आताच्या विधानात नेमका फरक तो काय, हा सवाल त्यामुळेच उपस्थित होतो. दोघांचीही जातकुळी एकच- ‘समाज व राष्ट्राची मोडतोड करून त्या छिन्नविछिन्न झालेल्या तुकड्यांवर स्वतःचे मतलबी स्वार्थ पोसण्याची!’ पण प्रकाश आंबेडकरांचा भारतभूमीचा अभ्यास कच्चा असावा; अभ्यास असता तर त्यांना समजले असते की, भारतमातेच्या मान-सन्मानासाठी प्राणांची बाजी लावणारे ‘माय के लाल’ इथे वेळोवेळी जन्माला येतात आणि मातृभूमीचा अवमान-अपमान करणार्‍यांना योग्य वेळी धुळीस मिळवतात. देशात मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून देशविरोधी कारवाया करणार्‍यांची मती चांगलीच तंतरल्याचे आपण पाहिले. देशाच्या मुळावर उठणार्‍या घोषणा देण्यापासून ते अलीगढ मुस्लीम विद्यापीठासारख्या शैक्षणिक संस्थेत देशाची फाळणी करणार्‍या बॅ. जीनांना डोक्यावर घेण्यापर्यंत या लोकांची मजल गेली. आता तोच तमाशा महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकरांनी असदुद्दीन ओवेसींच्या बरोबरीने सुरू केला. कुराणाच्या आदेशानुसार मुसलमान अल्लाशिवाय अन्य कोणालाही पूजनीय मानत नाहीत. जगभरातल्या मुसलमानांची हीच धारणा असते आणि असदुद्दीन ओवेसी स्वतःला इस्लामचा सच्चा अनुयायी म्हणवतात. परिणामी ‘वंदे मातरम’ला विरोध करण्याचे धर्मकार्य ते इमानेइतबारे करत असतात. ज्या भूमीत जन्माला आलो, जिच्यामुळे जगण्याला अर्थ प्राप्त झाला, त्या भूमीपुढे नतमस्तक न होण्याचे चाळे असदुद्दीन ओवेसींना या धर्मांधपणामुळेच सुचतात. पण, मूठभर पाठीराखे सोबत असले म्हणून ओवेसी समस्त मुसलमानांचे प्रतिनिधी ठरत नाहीत. कारण भारतमातेवर निस्सीम प्रेम करणारे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलामांसारखे राष्ट्रवादी मुसलमानही त्याच समाजातून येतात. प्रकाश आंबेडकरांचे मात्र तसे नाही. वर्षानुवर्षांपासून इथल्या अनुसूचित जाती-जमातीच्या समाजाने परकीयांचा प्रतिकार केला. लहूजी वस्ताद, उमाजी नाईक, बिरसा मुंडा ही त्यापैकीच काही नावे. मातृभूमीच्या रक्षणार्थ सुरू असलेल्या यज्ञात या सर्वांनीच आपल्या जीवाच्या आहुती दिल्या परंतु, ढवळ्याशेजारी बांधला पवळा, वाण नाही पण गुण लागला, ही म्हण तंतोतंत सार्थ ठरवत प्रकाश आंबेडकरांनी आपल्या पूर्वजांच्या देशभक्तीला तिलांजली देत नव्या याराच्या देशविरोधी भूमिकेला कवटाळले. मी प्रथमही भारतीय आणि शेवटीही भारतीयच असेन, असे ठणकावणार्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या प्रखर राष्ट्रभक्ताच्या वंशजांनीच हे कृत्य करणे म्हणजे बाबासाहेबांच्याच मतांचा अपमान.

 

प्रकाश आंबेडकर सध्या ज्या दोस्ती आणि मैत्रीचा हवाला देत आपल्या अभद्र युती आणि नीतीचे समर्थन करतायत, त्याच पक्षाच्या विचारांशी साधर्म्य सांगणार्‍या मुस्लिम लीग आणि तत्सम पक्ष व त्यांच्या भूमिकांबाबतची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची मते त्यांनी जाणून घ्यायला हवी होती. शिवाय ‘थॉट्स ऑन पाकिस्तान’ या आपल्या ग्रंथातही डॉ. बाबासाहेब आंंबेडकरांनी धर्मांधांवर कठोर शब्दांत टीका केलीच आहे. पण ते लक्षात न घेता आपल्या क्षुल्लक स्वार्थापायी प्रकाश आंबेडकरांना आपल्या आजोबांचे विचार कृतीत न उतरवता त्यांना पायदळी तुडवण्याची दुर्बुद्धी झाली. मात्र, आधीच कणभर पाठीराखे असलेल्या प्रकाश आंबेडकरांना ‘वंदे मातरम’चा विरोध केल्यानंतर राष्ट्रभक्त आंबेडकरी अनुयायांच्या रोषाला सामोरे जावे लागेलच. कारण आजचा आंबेडकरी समाज कालही बाबासाहेबांच्याच विचारांवर चालणारा होता आणि उद्याही त्यांच्याच विचारांवर चालणारा आहे, प्रकाश आंबेडकरांच्या नव्हे. दुसरीकडे असदुद्दीन ओवेसींचा ‘वंदे मातरम’ला असणारा विरोध हा भाजप व संघद्वेषातून आल्याचे दिसते. प्रकाश आंबेडकरांवरही भाजप व संघाविरोधात बोलण्यासाठी अन्य काही मुद्दे नसल्याने ओवेसींच्या मागे फरफटण्याची वेळ आली व त्यांनी ओवेसींच्या सुरात सूर मिसळला. मात्र, भाजप व संघद्वेष करता करता आपण कधी भारतमातेचा द्वेष, विरोध करू लागलो, हे त्यांचे त्यांनाही समजले नाही. कारण ‘वंदे मातरम’ हे गीत किंवा घोषणा भाजप अन् संघाच्याही आधीपासून भारतीयांच्या मना-मनांवर कोरलेली होती व आहे. याच घोषणेच्या विरोधाची फळे गेल्या काही काळात काँग्रेसने भोगली, आता ती वेळ प्रकाश आंबेडकर अन् असदुद्दीन ओवेसींवर येईल, इतकेच.

 
 

तरीही आपल्याकडे भारतमातेवर थुंकणारे करंटे नेहमी नेहमी का आणि कसे निपजतात, याचा विचार समाजाने केलाच पाहिजे. जगभरातला कोणताही समाज, देश वा राष्ट्र अस्मितेच्या-अभिमानाच्या-स्वाभिमानाच्या बळकट पायावरच उभारलेले असते. या अस्मिताच त्यांच्या अस्तित्वाची ओळख झालेल्या असतात. कालांतराने हीच ओळख प्रतिकांमध्ये बदलते आणि ज्या कोणाला असा समाज, देश वा राष्ट्र उद्ध्वस्त करण्याचे डोहाळे लागतात, ती शक्ती या प्रतिकांनाच सुरुंग लावण्याचे काम वेळोवेळी करत असते. ‘भारतमाता की जय’ असो की ‘वंदे मातरम’ ही घोषणा, आज भारताची अन भारतीयांची प्रतिके होऊन गेली आहेत. त्याचवेळी दहशतवादी, माओवादी, नक्षलवादी या देश तोडणार्‍या शक्तीही देशात सक्रिय झाल्याचे दिसते. शिवाय आपापला अजेंडा राबविण्यासाठी समाजात दुफळी निर्माण करावी लागेल आणि ती अशा प्रतिकांवर प्रश्नचिन्हे उपस्थित करूनच निर्माण करता येईल, याचीही जाणीव त्यांना आहे. म्हणूनच जेएनयु, जाधवपूर वा अलीगढ मुस्लीम विद्यापीठातील देशविरोधी कृत्यासारख्या घटना घडतात. असदुद्दीन ओवेसींचा ‘वंदे मातरम’ला असणारा विरोध त्याच पठडीतला. आता प्रकाश आंबेडकरही ओवसींच्या दावणीला बांधले गेले म्हटल्यावर त्यांनी ‘हाईक, हाईक’ केले की, यांना माना डोलावणे भागच पडणार, मग तो देशविरोध असो की भारतद्वेष! पण हा द्वेषाच्या वणव्याचा भडका याच लोकांना जमीनदोस्त करेल, याची खुणगाठही त्यांनी मनाशी बांधावी!

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@