मुंबई : कमी पाऊसमान आणि अन्य कारणांमुळे राज्यातील शेतकरी हवालदील असून सरकार त्याबाबत गंभीर असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. मंगळवारी झलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दृष्काळ सदृश परिस्थितीची घोषणा केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या ३१ ऑक्टोबरपूर्वी दुष्काळाबाबत आढावा घेऊन त्याबाबत आवश्यक त्या तरतुदी करण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी याबाबत घोषणा केली. २०१८ च्या खरीप हंगामामध्ये राज्यातील सर्व तालुक्यांचे महामदत संगणक प्रणालीद्वारे दुष्काळी परिस्थितीचे मूल्यांकन करण्यात आले. या मूल्यांकनानुसार राज्यातील २०१ तालुक्यांमध्ये ‘ट्रिगर १’ लागू झाले होते. या तालुक्यांचे प्रभावदर्शक निर्देशांकांचे मूल्यांकन करून ‘ट्रिगर २’ मध्ये समाविष्ट झालेले २१ जिल्ह्यांतील १८० तालुके आज जाहीर करण्यात करण्यात आले. या तालुक्यांमधील १० टक्के गावांमध्ये प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल पाठविण्याच्या सूचना सर्व विभागीय आयुक्त, कृषी आयुक्त व संबंधित जिल्हाधिकार्यांना देण्यात आले आहेत. दुष्काळसदृश्य तालुक्यांमध्ये मराठवाड्यातील औरंगाबाद, अहमदनगर, बीड, जालना, विदर्भातील बुलडाणा, चंद्रपूर, यवतमाळ, उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, नाशिक तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांतील तालुक्यांचे प्रमाण लक्षणीयरित्या जास्त आहे. विशेष म्हणजे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील प्रत्येकी १ आणि रायगडमधील ३ तालुक्यांमध्येही दुष्काळजन्य परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/