खोपोली: “हिंदू संस्कृतीत विजयादशमीला पारंपरिक शस्त्रपूजन केले जाते. शब्द हेदेखील शस्त्रासारखे असतात, त्याचप्रमाणे सोशल मीडिया हे आजच्या युगातील तेवढेच प्रभावी शस्त्र आहे. पण त्याचा वापर हा विधायक कामासाठी होणे गरजेचे आहे,” असे प्रतिपादन वनवासी कल्याण आश्रमाचे जिल्हा सचिव रवींद्र पाटील यांनी केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव लोहाणा सभागृहात संपन्न झाला. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून पाटील बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर तालुका संघचालक राकेशकुमार पाठक होते. प्रारंभी संघ परंपरेनुसार ध्वजारोहण झाल्यानंतर गौरव तटकरे यांनी सांघिक पद्य सादर केले, तर पाहुण्यांचा परिचय अविनाश मोरे यांनी केला. “या देशाला परमवैभवाला नेण्यासाठी गेले ९३ वर्षे संघ कार्य करीत आहेत. तेच संघाचे ध्येय व धोरण आहे,” असे त्यांनी सांगितले.
“रा. स्व. संघाची १९२५ साली स्थापना डॉ. हेडगेवार यांनी केली. समाज संघाकडे आशेने पाहत आहे,” असे सांगून पाटील यांनी संघ स्थापनेपासून आतापर्यंतच्या इतिहासाचा आढावा घेतला. “संघ व समाज वेगळा नाही. समाजाला जे प्रेरित आहे ते कार्य संघ करीत असतो. म्हणूनच संघ समाजात मिसळलेला आहे,” असेही पाटील यांनी सांगितले. उत्सवाचे सूत्रसंचलन तृशांत वाळकर यांनी केले. संघ प्रार्थनेनंतर उत्सवाची समाप्ती झाली. त्यानंतर स्वयंसेवकांचे शहरातून पारंपरिक पथसंचलन झाले. ते पाहण्यासाठी नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/