हिंदू समाजाला सावरायचे, तर त्यांच्यासमवेत हिंदू आदर्श ठेवणे आवश्यक होते. रामनवमी उत्सव साजरा करण्यामागे रामदासांचा हाच उद्देश होता की, लोकांना आपल्या आदर्श पराक्रमी पुरुषांची जाणीव होईल. रामराज्य यावे असे त्यांना वाटू लागेल आणि तसा प्रयत्न करणाऱ्या राजाला ते साहाय्यभूत होतील.
आपल्या नियोजित कार्यासाठी कृष्णानदीच्या खोऱ्यातील मसूरला आल्यानंतर समर्थांनी अनुग्रह देऊन उत्सवाच्या निमित्ताने हिंदुंना धार्मिक पातळीवर एकत्र आणायला सुरुवात केली. हे आपण मागील भागात पाहिले. मसूर परगणा आदिलशहाच्या ताब्यात होता तरी, आदिलशहाने कराड व मसूर भागाची देशमुखी शहाजीराजांना दिली होती. शहाजीराजांकडे सैन्यही मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे आदिलशहा शहाजीराजांना वचकून असे. तीर्थाटनाच्या काळात समर्थांची कर्नाटकात शहाजीराजांची भेट घेतली असावी. शिवरायांच्या कार्याला अजून सुरुवात झालेली नव्हती. समर्थांना अंदाज होता की, मसूरला त्यांच्या धार्मिक कार्याला सरळसरळ विरोध करणारे कोणी असणार नाही. समर्थ जालना, बीड, अहमदनगर, पुणे, महाबळेश्वर, वाई, सातारा, कराड असा प्रवास करत मसूरला आले होते. मसूर हे सातारा जिल्ह्यात आहे. भौगोलिकदृष्ट्या पाहिले, तर तेथून जवळच असलेला सांगली जिल्हा ओलांडला की कर्नाटकची हद्द चालू होते. कर्नाटकात शहाजीराजांचे पूर्ण वर्चस्व होते. तेव्हा सर्वदृष्टींनी मसूर हे स्थान सुरक्षित होते. इ. स. १६४४च्या वैशाख मासात समर्थ कृष्णातीरी येथून पोहोचले. मसूरला ब्राह्मणवस्ती बऱ्यापैकी होती. तेथील अनेकांना स्वामींनी अनुग्रह दिला. इ. स. १६४५ला अवघ्या एका वर्षाच्या आत स्वामींनी तेथील अनुयायांना हाताशी धरून पहिला रामनवमीचा उत्सव मसूरला पार पाडला. स्थानिक अधिकारी मुसलमान असले तरी, उत्सवात मिरवणुकांना परवानगी मिळवणे तितकेसे कठीण नव्हते. कारण, त्या भागात शहाजीराजे, दिनायतराव व बाजी घोरपडे अशा मातब्बर मराठी सरदारांचे वर्चस्व होते. रामदासांनी इ. स. १६४५चा रामनवमीचा उत्सव नऊ दिवस साजरा केला. स्थानिक लोकही खूश झाले. समर्थांच्या रुपाने त्यांना एक सात्विक भक्कम धार्मिक नेतृत्व मिळाले. समर्थांनी वेगवेगळी कामे सर्वांना वाटून सर्वांना उत्सवात सामिल करून घेतले. त्याचा अनुकूल परिणाम झाला.
कोदंडधारी राम आणि वीर हनुमान यांच्यावर समर्थांचे अतोनात प्रेम होते, भक्ती होती. रामाने त्याच्या आयुष्यात वानरांच्या मदतीने रावणासारख्या बलाढ्य शत्रूंचा नाश केला होता. सत्याचा असत्यावर विजय झाला होता. रामाने स्वपराक्रमाने सीतेला सोडवून आणले होते. रावणाच्या बंदिवासातील देवांची सुटका केली होती. रामाच्या या पराक्रमाचा रामदासांच्या मनावर मोठा प्रभाव होता. रामदासांना वाटत होते की, तत्कालीन राजकीय परिस्थिती रामायणातील रामाच्या वनवास काळासारखी होती. रावण आणि त्याचे हस्तक रामायण काळात निरपराध लोकांना सतत त्रास देत असत. पुराण सांगते की, रावणाने सर्व देवांना तेथे बंदिवासात ठेवले होते. समर्थकालीन राजकीय स्थिती व रामायणकालीन रामाच्या वनवासाची स्थिती यातील साम्य रामदासांसारख्या प्रतिभावंतांच्या लक्षात आले. रामायण काळात रावण अत्याचार करीत होता. त्याने सीतेला कपटाने पळवून नेले होते, तर येथे औरंगजेबसारखा कपटी बादशहा व त्याचे सैनिक हिंदुंवर अत्याचार करीत होते. हिंदू स्त्रियांना पळवून नेत होते. रावण हिंदुस्तानच्या दक्षिण टोकाकडील श्रीलंका बेटावर राहून सारी कामे बिनबोभाट करीत होता, तर इकडे औरंगजेब उत्तरेकडील दिल्ली, आग्रा येथे राहून देवळे पाडणे, मूर्ती फोडणे अशी विध्वंसक कामे करून हिंदुंना त्रास देत होता. रामाने स्वपराक्रमाने रावणाला संपवले. सीतेची सुटका केली. देवांना बंदिवासातून सोडवले. असंच काहीतरी आता घडावे, असे रामदासांना वाटत होते. रामदास अशा हिंदू राजांच्या शोधात सारा हिंदुस्तान पायी फिरले. त्यांना वाटत होते की, कोणीतरी रामसदृश पराक्रमी हिंदू राजाने औरंगजेबाला संपवावे आणि ही हिंदूभूमीरुपी सीता त्याच्या तावडीतून सोडवावी. औरंगजेबाला संपवल्यावर येथील तीर्थक्षेत्रांतील उदंड पाण्याचा येथील लोकांना धार्मिक विचारांचा आनंद घेण्यासाठी उपयोग होईल. तीर्थक्षेत्रे म्लेच्छांच्या तावडीतून मुक्त होतील. रामदासांनी त्यांच्या ‘आनंदवनभुवनी’ या काव्यात हेच स्वप्न पाहिले होते.
बुडाला औरंग्या पापी ।
म्लेच्छ संहार जाहला ।
उदंड जाहले पाणी ।
स्नानसंध्या करावया॥
- सुरेश जाखडी
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/