संबोधन सरसंघचालकांचे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Oct-2018
Total Views |

 

 

रा. स्व. संघाच्या परंपरेप्रमाणे यंदाही नागपूरच्या रेशीमबाग मैदानावरुन सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी विविध विषयांवर प्रकाश टाकत स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. सरसंघचालकांनी यंदाच्या विजयदशमी उत्सवाच्या आपल्या संबोधनात देशाची सुरक्षा, अंतर्गत सुरक्षा, माओवाद-नक्षलवाद, समाजातील दुष्प्रवृत्ती, परिवारातील संस्काराची आवश्यकता, श्रीराम जन्मभूमी व आगामी काळातील निवडणूका आदी विविध मुद्द्यांवर उपस्थितांना मार्गदर्शन केले. तेव्हा, विजयादशमीनिमित्त सरसंघचालकांचे भाषण विस्ताराने देत आहोत...
 

यावर्षीचा विजयादशमीचा पवित्र उत्सव संपन्न करण्यासाठी आपण येथे जमलो आहोत. हे वर्ष श्री गुरुनानक देव यांच्या प्रकटनाचे ५५० वे वर्ष आहे. आपल्या भारताच्या प्राचीन परंपरांनी प्राप्त झालेले सत्य विसरून, आत्मविस्मृत होऊन जेव्हा आपला सारा समाज दांभिकता, स्वार्थ तसेच भेदाच्या दलदलीत आकंठ फसला होता, दुर्बल, पराजित आणि विघटित होऊन सीमेपलीकडून सतत क्रूर आक्रमकांकडून होणाऱ्या छळामुळे हैराण झाला होता, तेव्हा श्री गुरुनानक देव यांनी आपली जीवनज्योत प्रज्वलित करून समाजात अध्यात्माचा, युगानुकूल आचरणातून आत्मोद्धाराचा नवा मार्ग दाखवला. भरकटलेल्या परंपरांचा शोध घेऊन समाजाला एकात्मता व नवचैतन्याची संजीवनी दिली. त्यांच्याच परंपरांनी आपल्याला देशातील हीनदीन अवस्था दूर करणाऱ्या दहा गुरूंची मालिका दिली आहे.

 

याच सत्य व प्रेमावर स्थापित झालेल्या सर्वसमावेशी संस्कृतीचा, विविध महापुरुषांनी वेळोवेळी देश काल परिस्थितीनुसार पुरस्कृत आणि प्रवर्तित केलेल्या प्रबोधनाच्या सातत्याचा ज्यांच्या जीवनावर परिणाम झाला, ज्यांचे १५० वे जयंती वर्ष सुरू आहे, अशा महात्मा गांधी यांनी सत्य व अहिंसेवर आधारित राजकीय अधिष्ठानावर देशाची स्वातंत्र्य चळवळ उभी केली. अशा सर्व प्रयत्नांमुळेच देशातील सामान्य जनता स्वराज्यासाठी घराबाहेर पडून, पुढे येऊन नैतिक बळासह इंग्रजांच्या दमनचक्रासमोर उभी ठाकली होती. शंभर वर्षांपूर्वी, जालियानवाला बागेत स्वराज्याकरिता आणि अन्यायकारक रौलेट कायद्याचा, दमनाचा विरोध करण्याकरिता उभे राहणाऱ्यांना जनरल डायरच्या नेतृत्वाखाली चारही बाजूंनी घेरून गोळ्यांची शिकार केले गेले. त्या आपल्या शेकडो निःशस्त्र देशबांधवांच्या त्याग, बलिदान आणि समर्पणाचे स्मरणही आपल्यात हे नैतिक बल जागृत करते.

 

या वर्षी अशा औचित्यपूर्ण संस्मरणांचा उल्लेख आवश्यक आहे. कारण, स्वातंत्र्याच्या ७१ वर्षांत देशाने उन्नतीच्या अनेक आयामांमध्ये चांगला पल्ला गाठला आहे, परंतु, सर्वांग परिपूर्ण राष्ट्रीय जीवनाच्या अन्यही अनेक आयामांत आपल्याला अजूनही पुढे जायचे आहे. विश्वात आपला देश सुसंघटित, समर्थ व वैभवसंपन्न होऊन पुढे गेल्याने ज्या शक्तींच्या स्वार्थप्राप्तीचा खेळ समाप्त होतो, त्या शक्ती विविध क्लृप्त्या करून देशाच्या मार्गात अडथळे आणणे थांबवणार नाहीत. अशी अनेक आव्हाने आपल्याला अजून पार करायची आहेत. आपल्या पूर्वज महापुरुषांनी स्वतःच्या जीवनाच्या उदाहरणातून, उपदेशांतून सत्यनिष्ठा, प्रेम, त्याग, पावित्र्य आणि तपस्येचे आदर्श समाजात स्थापन केले, आचरणात प्रवर्तित केले. त्या आदर्शांवर वाटचाल करूनच आपण हे कार्य करू शकणार आहोत. देशाच्या परिस्थितीचा विचार केला तर येथे सुरू असणाऱ्या ऊनसावलीच्या खेळाचा हा बोध दिसून येतो.

 

देशाची सुरक्षा

 

कोणत्याही देशाला प्रथम स्वतःच्या सीमांची सुरक्षा तसेच अंतर्गत सुरक्षेची परिस्थिती यांचा विचार करावा लागतो. कारण या सुरक्षा व्यवस्थित असतील तरच देश समृद्ध होतो आणि विकासासाठी प्रयत्न करण्यासाठी अवकाश व संधी प्राप्त होतात. आंतरराष्ट्रीय संबंधांतील ताणेबाणे नीट समजून घेऊन, आपल्या देशाच्या सुरक्षेच्या चिंतांशी त्यांना जोडणे आणि त्यांचा सहयोग, समर्थन प्राप्त करण्याचे आपले सफल प्रयत्न झाले आहेत. शेजारी देशांसह सर्वांशीच शांतीपूर्ण व सौहार्दपूर्ण संबंध वाढवण्याची आपली इच्छा, वाणी आणि कृती कायम ठेवत देशाच्या सुरक्षेसाठी आवश्यक असेल तेव्हा ठामपणे उभे राहून तसेच प्रसंगी धाडसी कारवाया करून आपल्या सामर्थ्याचा आपले सैन्य, शासन-प्रशासनाने विवेकी उपयोग केला आहे. या दृष्टीने आपली सेना तसेच सुरक्षा बलांचे नीतीधैर्य वाढवणे, त्यांना साधनसंपन्न करणे, नवे तंत्रज्ञान उपलब्ध करणे आदी बाबी सुरू झाल्या असून त्यांची गतीही वाढत आहे. जगभरात भारताची प्रतिष्ठा वाढण्याचे हेही एक कारण आहे.

 

यासोबतच सुरक्षा बल, रक्षक बल तसेच त्यांच्या परिवाराच्या योगक्षेमाच्या व्यवस्थेकडे लक्ष देणे आवश्यक आहे. शासनाद्वारे या दिशेने काही चांगले प्रयत्न झाले आहेत. ते लागू करण्याची गती कशी वाढवावी यावर विचार करणे मात्र आवश्यक आहे. सैन्याधिकारी व नागरिक, प्रशासकीय अधिकारी, गृहमंत्रालय, सुरक्षा मंत्रालय, अर्थ मंत्रालय इत्यादी अनेक विभागांतून या योजनांचा विचार व अंमलबजावणी होणे प्रशासकीयदृष्ट्या आवश्यक आहे. या बलांचे कार्य तथा त्या कार्यासाठी प्राणांची बाजी लावण्याची तयारी यावरून या विभागांच्या सर्व व्यक्तींच्या मनात एकसारखा सन्मान व संवेदना असल्याची स्वाभाविक चर्चा ऐकू येते. ही अपेक्षा शासन-प्रशासन यांच्याकडून आहे, तशीच ती समाजाकडूनही आहे, हे प्रत्येक देशवासीयाने लक्षात ठेवले पाहिजे. सीमेपलीकडे तसेच आवश्यकता असल्यास देशाच्या आतही सुरक्षेसाठी झटणाऱ्या आपल्या या बंधूंना आपल्या परिवाराची सुव्यवस्था आणि सुरक्षितता याबाबत निश्चिंत होऊन आपले कर्तव्य बजावता येणे आवश्यक आहे. पश्चिम सीमेपलीकडील देशात झालेल्या सत्तापरिवर्तनामुळे आपल्या सीमेवर तसेच पंजाब, जम्मू-काश्मीरसारख्या राज्यांत उघड आणि छुप्या प्रक्षोभक कारवाया कमी होण्याची अपेक्षा नव्हती, तसे झालेही नाही.

 

आंतरराष्ट्रीय घटनाचक्राच्या परिप्रेक्ष्यात सागरी सीमांची सुरक्षा हा सध्या महत्त्वपूर्ण विषय झाला आहे. भारताच्या मुख्य भूमीला लागून असणाऱ्या सागरी क्षेत्रांमध्ये कमीअधिक प्रमाणात अनेक बेटे अंतर्भूत आहेत. अंदमान-निकोबार बेटांसह ही सर्व बेटे सामरिक दृष्टीने महत्त्वपूर्ण ठिकाणी स्थित आहेत. त्यांची निगराणीची व्यवस्था आणि सुरक्षेच्या दृष्टीने व्यवस्था शीघ्रगतीने लक्ष देऊन सबळ करण्याची आवश्यकता आहे. सागरी सीमा आणि बेटांवर लक्ष देणारी नौसेना तसेच अन्य बल यांमधील परस्पर ताळमेळ, सहयोग आणि साधनसंपन्नता यावरही शीघ्रगतीने ध्यान देण्याची आवश्यकता आहे. भू तसेच सागरी सीमावर्ती क्षेत्रात राहणारे आपले बंधू अनेक सीमाविशिष्ट परिस्थितींचा सामना करूनही धैर्यपूर्वक उभे आहेत. त्यांची व्यवस्था ठीक असेल तर दहशतवाद्यांची घुसखोरी, तस्करी आदी समस्या कमी करण्यासाठी ते लोक मदत करू शकतात. त्यांना वेळोवेळी योग्य मदत मिळावी, रोजगार, शिक्षण, आरोग्य इत्यादी व्यवस्था त्यांच्यापर्यंत पोहोचावी, त्यांच्यात साहस, संस्कार व उत्कट देशभक्ती कायम राहावी यासाठी शासन व समाज या दोघांनीही प्रयत्न वाढवणे आवश्यक आहेअन्य देशांसोबत योग्य प्रमाणात परस्पर आदान-प्रदानासह, सुरक्षा उत्पादनांबाबत देशाच्या स्वयंपूर्णता साध्य केल्याशिवाय सुरक्षेप्रती आश्वस्त होता येणार नाही. या दिशेने देशाच्या प्रयत्नांची अधिक गती असायला हवी.

 

आंतरिक सुरक्षा

 

देशाच्या सीमासुरक्षेसह देशांतर्गत सुरक्षेचा विषयही तेवढाच महत्त्वपूर्ण आहे. केंद्र व राज्य शासन तसेच प्रशासन यांच्या उपायांचा एक महत्त्वाचा पैलू आहे तो म्हणजे कायदा, संविधान तसेच देशाच्या सार्वभौमत्वाला आव्हान देणाऱ्या हिंसक कारवाया करणारी, देशातून तसेच बाहेरून प्रेरित वा प्रेषित असणारी मंडळी यांचा बंदोबस्त करणे. यात केंद्र तसेच राज्य सरकार व पोलीस, अर्धसैनिक बलांकडून सफलतापूर्वक कारवाई झाली आहे. कायम सजगतेसह त्यांना हे कार्य सुरू ठेवावे लागेल. परंतु, अशा हिंसक तसेच खऱ्या अर्थाने बेकायदेशीर कारवायांमध्ये भाग घेणारे लोक आपल्या समाजात सापडतात, ही वस्तुस्थिती आहे. समाजातील व्यापक अज्ञान, विकासाचा व सुविधांचा अभाव, बेरोजगारी, अन्याय, शोषण, विषमतेचा व्यवहार तसेच स्वतंत्र देशात आवश्यक असणारा विवेक याचा समाजात मोठ्या प्रमाणात असणारा अभाव त्याच्या मुळाशी आहे. हे दूर करण्यास शासन-प्रशासनाची भूमिका आवश्यक आहे परंतु, त्यापेक्षा महत्त्वाची भूमिका समाजाची आहे. या सर्व त्रुटी दूर करून, त्याला बळी पडलेल्या समाजातील आपल्या बंधूंना स्नेह आणि सन्मानपूर्वक आलिंगन देऊन समाजात सद्भावपूर्ण व आपुलकीचा व्यवहार वाढवावा लागेल. समाजातील सर्व वर्गांनी आत्मीयतेने नित्य संपर्क स्थापित करून त्यांच्या सुखदुःखात सहभागी व्हावे लागेलअनुसूचित जाती व जनजाती वर्गांसाठी आखल्या गेलेल्या योजना, उपयोजना व अनेक प्रकारच्या तरतुदी वेळेवर आणि योग्यप्रकारे लागू करणे याबाबत केंद्र व राज्य शासनाने अधिक तत्पर, संवेदनाशील आणि पारदर्शक होण्याची आवश्यकता आहे असे वाटते. देशाच्या अंतर्गत सुरक्षेची पहिली जबाबदारी पोलिसांवर असते. त्यांच्या व्यवस्थांमध्ये सुधारणेची शिफारसही पोलीस आयोगाने केली आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या या शिफारसींवर विचार आणि सुधारणेचे प्रयत्न आवश्यक आहेत.

 

चिंताजनक प्रवृत्ती

 

देश चालविणाऱ्या व्यवस्थेच्या तंत्राने देश-समाजातील दुर्बल घटकांच्या उन्नतीच्या प्रयत्नांत तत्पर असणे, संवेदनशील आत्मीयता तसेच पारदर्शकता व आदरपूर्वक व्यवहार यांत त्रुटी राहतात. अशावेळी अभाव, उपेक्षा व अन्यायाच्या मार्गाने जर्जर वर्गांच्या मनात संशय, फुटीरता, विवेकाचा अभाव, विद्रोह व द्वेष वाढतो तसेच हिंसेचे बीजारोपण सहजपणे शक्य होते. याचाच फायदा घेऊन आपल्या स्वार्थप्रेरित उद्देशासाठी, देशविघातक कृत्यांसाठी, गुन्हेगारी कारवायांसाठी दारूगोळ्याच्या रूपात वावरणाऱ्या शक्ती कट कारस्थानांचा खेळ खेळतात. गेल्या चार वर्षांत समाजात घडलेल्या काही अनैच्छिक घटना, समाजातील विभिन्न वर्गांत पसरलेल्या जुन्या नव्या समस्या, विविध नव्या-जुन्या मागण्या यांचा वापर करून आंदोलनांना एक विशिष्ट रूप देण्याचा जो वारंवार प्रयत्न झाला, त्यातून ही गोष्ट सगळ्यांच्या लक्षात येईल. येणाऱ्या निवडणुकांमधील मतांकडे लक्ष ठेवून सामाजिक एकात्मता, कायदा, संविधानाचे अनुशासन यांची नितांत उपेक्षा करत स्वार्थीपणे सुरू असलेले सत्तालोलूप राजकारण या सगळ्या घटनांमागे स्पष्ट दिसते, परंतु आत्ता या सर्व निमित्तांचा वापर करून समाजात भरकटवण्याचे, फुटीरतेचे, हिंसेचे, अत्यंत विषप्राय द्वेषाचे तथा देशविरोधाचे वातावरण उभे करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ‘भारत तेरे टुकडे होंगे’ अशा घोषणा ज्या समूहातून दिल्या गेल्या, त्या समूहातील काही मुख्य चेहरे अशा घटनांमध्ये प्रामुख्याने भडकावू भाषण करताना दिसून आले. मुख्यत्वे वनप्रदेशांत अथवा अन्य सुदूर क्षेत्रांत होणाऱ्या हिंसात्मक कारवायांचे कर्तेधर्ते व पाठराखण करणारे आता शहरी माओवादाचे पुरस्कर्ते होऊन अशा आंदोलनांत अग्रक्रमाने दिसून आले. सुरुवातीला छोट्याछोट्या अनेक संघटनांचे जाळे पसरवून तसेच विद्यार्थी वसतिगृहात सतत संपर्कातून एक वैचारिक अनुयायी वर्ग उभा केला जातो. नंतर उग्र व हिंसक कारवायांच्या छोट्या-मोठ्या आंदोलनांमध्ये घुसून, अराजकतेचा अनुभव देऊन, त्या अनुयायांमधील प्रशासन-कायद्याविषयीची भीती तसेच नागरी शिस्तीची भीती दूर केली जाते. दुसऱ्या बाजूला समाजात आपापसांत व समाजातील स्थापित व्यवस्था आणि नेतृत्वाबाबत तिरस्कार व द्वेष उत्पन्न केला जातो. अशा उग्र रूप घेणाऱ्या घटनांच्या माध्यमातून समाजाच्या सर्व अंगांमध्ये प्रस्थापित सर्व विचारांचे नेतृत्व- जे समाजव्यवस्था, कमी अधिक प्रमाणात नागरिक व्यवहारातील सौम्यतेच्या शिस्तीने बांधलेले असते- ते अचानक उद्ध्वस्त केले जाते. नवीन अपरिचित, अनियंत्रित, केवळ नक्षली नेतृत्वाशी जोडले गेलेले अंधानुयायी आणि खुले पक्षपाती नेतृत्व स्थापन करणे ही शहरी माओवाद्यांची डावी कार्यपद्धती आहे. समाजमाध्यमे, अन्य माध्यमे तसेच बुद्धिजीवींमध्ये व अन्य संस्थांमध्ये सुरुवातीपासून किंवा नंतर आलेले डाव्यांचे हस्तक अशा घटनांच्यावेळी कार्यान्वित असतात. भ्रामक प्रचार, बौद्धिक तसेच अन्य सर्व प्रकारचे समर्थन याबाबत सुरक्षित अंतरावरून आणि तथाकथित कृत्रिम प्रतिष्ठेच्या कवचात राहून संलग्न राहतात. प्रचाराचा विखार अधिक प्रभावी करण्यासाठी असत्य आणि विषारी, प्रक्षोभक भाषेचा स्वच्छंदपूर्वक वापर करणेही त्यांना व्यवस्थित जमते. देशाच्या शत्रूपक्षाकडून मदत घेऊन स्वदेशद्रोह करणे हे तर अतिरिक्त कौशल्य मानले जाते. समाजमाध्यमांवरील आशय आणि वर्णन याचा उद्गम शोधण्यासाठी शोध घेतला तर ही गोष्ट स्पष्ट होते. जिहादी आणि कट्टरपंथी व्यक्तींची काही ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थिती अशा घटनांमध्ये समान दिसून येते. हा सारा घटनाक्रम केवळ प्रतिपक्षाचे सत्ताप्राप्तीचे राजकारण न राहता देशी-विदेशी भारतविरोधी शक्तींच्या साट्यालोट्यातून धूर्तपण चालवले जाणारे षड्यंत्र असल्याचे दिसून येते. यात कळत-नकळत राजकीय महत्त्वाकांक्षा असणारी व्यक्ती अथवा समूह तसेच अभाव आणि उपेक्षेने भरडला गेलेला समाजातील दुर्बल वर्ग दारूगोळ्यासारखा वापरला जात आहे, या निष्कर्षावर यावे लागते. सारे विषयुक्त आणि विद्वेषी वातावरण तयार करून अंतर्गत सुरक्षेचा आधार असणाऱ्या समाजाच्या समरसतेलाच जर्जर करून नष्ट करणारे मानसशास्त्रीय युद्ध - ज्याला आपल्या राज्यशास्त्राच्या परंपरेत मंत्रयुद्ध म्हटले जाते, खेळले जात आहे.

 

हे नष्ट करण्यासाठी शासन प्रशासनाला समाजात याचा फायदा उपद्रवी शक्ती घेतील, अशा घटना होऊ नयेत यासाठी सजग रहावे लागेल, तर दुसरीकडे अशा उपद्रवी शक्ती व व्यक्तींवर कडक नजर ठेवून ते अशा कारवाया करणार नाहीत हेही पाहावे लागेल. हळूहळू समाजात अजिबात थारा न मिळाल्याने या उपद्रवी शक्ती विझून जातील. प्रशासनाला आपले सूचना तंत्र व्यापक व सजग करावे लागेल. जनहिताच्या योजनांचे तत्पर क्रियान्वयन करून समाजाच्या अंतिम स्तरापर्यंत या योजना पोहोचवाव्या लागतील. कायदा-सुव्यवस्थेचे पालन करण्यासाठी दक्ष आणि कुशल होऊन काम करावे लागेलपरंतु, या परिस्थितीवर संपूर्ण आणि अचूक उपाययोजना होईल, जेव्हा समाजाच्या सर्व वर्गांत बुद्धी व भावनांसह आचरणात परस्पर सद्भावना आणि आपुलकीचा व्यवहार असेल. पंथ-संप्रदाय, जाती-उपजाती, भाषा, प्रांत इत्यादी विविधतांकडे आपण एकतेच्या दृष्टीने पाहू. वर्गविशेषांच्या समस्या व परिस्थितीला आपले दायित्व मानून सारा समाज मिळून मिसळून त्याचा न्याय करेल व सद्भावनापूर्वक उत्तर शोधेल. त्यामुळे परस्परांत आत्मीय संवाद होईल, असे वातावरण संपर्क व संबंध वाढवून तयार केले पाहिजे. आपल्या जीवनव्यवहारात नागरी शिस्तीचे व कायदाव्यवस्थेच्या मर्यादेचे पालन केले पाहिजे. याबाबतील आपल्या राजकीय नेत्यांसह समाजातील प्रत्येक व्यक्तीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे (दि. २५ नोव्हेंबर १९४९चे) ते प्रसिद्ध भाषण नित्य स्मरणात ठेवले पाहिजे. ज्यात ते परामर्श देतात की, न्याय, समता व स्वातंत्र्याच्या दिशेने देशाची वाटचाल, राजकीय व आर्थिक प्रजासत्ताकासह सामाजिक प्रजासत्ताकाकडे वाटचाल ही समाजात बंधुभावाच्या व्यापक प्रसाराशिवाय संभव नाही. याच्याशिवाय या लोकशाही मूल्यांची आणि आपल्या स्वातंत्र्याची सुरक्षाही धोक्यात येऊ शकते. पारतंत्र्यात आपण आपल्या मागण्यांसाठी आवाज उठवावा म्हणून आपण ज्या पद्धती स्वीकारल्या, त्या स्वातंत्र्याच्या स्थितीतच सोडून द्याव्या लागतील. आपण लोकशाहीच्या शिस्तीत बसतील अशा पूर्णतः संविधानिक पद्धतींचाच अवलंब करावा लागेल. भगिनी निवेदिता यांनीही नागरिकत्वाच्या जाणीवेला स्वतंत्र देशातील दैनंदिन देशभक्तीचे अभिव्यक्त रूप मानले आहे.

 

परिवारात संस्काराची आवश्यकता

 

देशातील राजकारण, कार्यपालिका, न्यायपालिका, स्थानिक प्रशासन, संघटन, संस्था, विशेष व्यक्ती आणि नागरिक या सगळ्यांची या बाबतीतील निश्चित अशी सहमती आणि समाजाची आत्मीय एकात्मतेची भावना हीच देशातील स्थैर्य, विकास व सुरक्षेची हमी आहे. हे संस्कार नवीन पिढीला शैशवकाळापासूनच घरातून, शिक्षणातून तसेच समाजातील घडामोडींमधून प्राप्त व्हायला हवेत. घरातील नवीन पिढीला मनुष्यातील मनुष्यत्व आणि सत्चारित्र्याच्या सुसंस्कारांचा पाया मिळणे आजच्या काळात खूप महत्त्वाचे आहे. समाजातील वातावरण तसेच शिक्षणामधील पाठ्यक्रमांमध्ये हल्ली या गोष्टींचा अभाव आढळतो. शिक्षणाची नवीन धोरणे प्रत्यक्ष लागू होण्याच्या प्रतिक्षेत हातातून वेळ निसटत चालली आहे. या दोन्ही परिवर्तनांकरिता अनेक व्यक्ती आणि संघटनांचे शासकीय व सामाजिक अशा दोन्ही स्तरांवर प्रयत्न वाढत आहेत. तथापि, आपले घर आणि आपले परिवार सर्वथा आपल्या हातात आहेत. आपली स्वाभाविक आत्मीयता, कौटुंबिक व सामाजिक दायित्वबोध, स्वविवेकाची निर्मिती आदी संस्कारांना अंकित करणारे अनौपचारिक शुचितामय प्रसन्न वातावरण स्वतःच्या उदाहरणातून देण्याची, नवीन पिढीबाबत आपली जबाबदारी व्यवस्थितरित्या पार पाडत आहोत याकडे सजगतेने पाहण्याची आवश्यकता आहे. बदललेला काळ, त्यात प्रसारमाध्यमांचा झालेला व्यापक प्रसार आणि वाढलेला प्रभाव, नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून व्यक्तीला अधिक आत्मकेंद्रित बनवणारी आणि व्यक्तीच्या विवेकबुद्धीला समजून न घेता जगातील योग्य-अयोग्य सूचना आणि ज्ञान देणारी साधने याबाबत सावध राहण्याची आवश्यकता जगात सगळ्यांना जाणवत आहे. अशावेळी परिवाराच्या स्वपरंपरेतून सुसंस्कार मिळायला हवेत. नवीन जगात जे भद्र आहे त्याला खुल्या मनाने आत्मसात करत आपल्या मूल्यबोधाच्या आधारावर अभद्रापासून वाचले पाहिजे. यासाठी नीरक्षीरविवेक, उदाहरण आणि आत्मीयता नवीन पिढीला मिळायला हवीदेशात कौटुंबिक क्लेश, ऋणग्रस्तता, जवळच्या व्यक्तींकडून होणारे बलात्कार-व्यभिचार, आत्महत्या तसेच जातीय संघर्ष आणि भेदभाव यासारख्या घटनांच्या बातम्या निश्चितच क्लेशदायक आणि चिंताजनक आहेत. स्नेह आणि आत्मीयपूर्ण पारिवारिक वातावरण तसेच सामाजिक सद्भाव निर्माण करण्यातच या समस्यांचे निराकरण आहे. या दृष्टीने समाजातील सुधारित वर्ग तसेच प्रमुख बुद्धीजीवींसह संपूर्ण समाजाला या दिशेने कर्तव्यरत व्हावे लागेल.

 

चिंतनात समग्रता

 

आपली प्रत्येक कृती, उक्ती आणि मनाने व्यक्तीचे, परिवार, समाज, मानवता आणि सृष्टीचे, सगळ्यांचे सुपोषण व्हावे, हे विविध अंगांनी समाजाला दिशा देणाऱ्या सगळ्यांनी मुख्यत्वे लक्षात ठेवायला हवे. जगात कुठेही समाजाचे स्वास्थ आणि शांतिपूर्ण जीवन हे केवळ विधीव्यवस्था आणि दंडाच्या भयाने चालत नाही, कधी चालणारही नाही. समाजात कायद्याचे होणारे पालन समाजाच्या नीतिबोधाचा परिणाम आहे, कारण नाही. आणि समाजाचे नीतिबोध त्याच्या परंपरांगत मूल्यबोधातून बनतात. मूल्यांच्या आधारावर ठाम राहूनच समयानुकूल आचारधर्म स्वीकारण्याकरिता नीतिकल्पना आणि नियम बदलायला हवेत. समाजाच्या आचरणामुळे तयार होणारी प्राकृतिक कामे आणि आर्थिक प्रवृत्ती, हे सर्व मर्यादित करून उपयोगी ठरणारी आणि सुखासह समाधान आणि आनंद देणारी बनणारी धोरणे, नीतिबंधनाच्या अनुशासनातून समाज आणि परिवार एकत्रित होऊन वाटचाल करतील हे बघणारे धोरण तसेच या सगळ्याचा निर्णायक मूल्यबोध हे सगळे जिथे परस्परानुकुल सुसंगतितून चालतात तिथे वास्तविक आणि संपूर्ण न्याय होतो. समग्रतापूर्वक विचार तसेच धैर्यपूर्वक मन तयार केल्याशिवाय निर्णयांचा समाजाच्या आचरणात स्वीकार तसेच देशकाल परिस्थितीनुरूप समाजाच्या नवरचनेची निर्मिती होणार नाही. नुकताच देण्यात आलेला शबरीमला देवस्थान संबंधीच्या निर्णयातून निर्माण झालेली स्थिती हेच दर्शवते. समाजाने अंगिकारलेली शेकडो वर्षांपासून चालत आलेली परंपरा, तिचे स्वरूप आणि कारणांचा मूळ विचार केला गेला नाही. धार्मिक परंपरांच्या प्रमुखांची बाजू, कोट्यवधी भक्तांची श्रद्धा विचारात घेतली गेली नाही. महिलांमधील एक खूप मोठा वर्ग या नियमांचा समर्थक आहे, त्यांचे म्हणणे ऐकले गेले नाही. कायदेशीर निर्णयाने समाजात शांती, सुस्थिरता आणि समानता येण्याऐवजी त्या स्थानावर अशांती, अस्थिरता आणि भेदांची निर्मिती झाली. हिंदू समाजाच्या श्रद्धांवरच असे वारंवार आणि विनासंकोच आघात का केले जातात, असे प्रश्न समाजमनात उठतात आणि असंतोषाची स्थिती तयार होत जाते. ही स्थिती समाजजीवनाचे स्वास्थ्य आणि शांतीसाठी अजिबात चांगली नाही.

 

स्वतंत्र देशाचे ‘स्व’ आधारित तंत्र

 

भारतीय जीवनाचे सर्व अंगाने नवनिर्माण करताना भारताच्या मूल्यबोधाच्या शाश्वत आधारावर ठाम राहूनच प्रगती करावी लागेल. आपल्या देशात जे आहे त्यात देश-काल-परिस्थितीनुसार सुधारणा करून, परिवर्तन करून किंवा मग आवश्यक असेल तर काही गोष्टींचा पूर्णत: त्याग करूनही युगानुकूल बनवणे तसेच जगात जे भद्र आहे, चांगले आहे त्याला देशानुकूल बनवणे या दोन्ही निर्णयांचा आधार हाच मूल्यबोध आहे. हाच आपल्या देशाचा प्रकृतीस्वभाव आहे. हेच हिंदुत्व आहे. आपल्या प्रकृतीस्वभावावर ठाम आणि स्थिर राहूनच कुठलाही देश प्रगत होतो, अंधानुकरणातून नाही. शासनाच्या चांगल्या धोरणांचा परिणाम समाजात शेवटच्या रांगेत उभे असलेल्या व्यक्तीपर्यंत दिसला पाहिजे याकरिता प्रशासनाकडून तत्परता, पारदर्शकता आणि संपूर्णतेसह जी कार्यवाही व्हायला हवी, त्या प्रमाणात आजही होत नाही. इंग्रजांचे परकीय राज्य आणि प्रशासन आपल्या भूमीवर, राज्यांवर केवळ सत्ता चालविण्याचे काम करत होते. आता स्वतंत्र भारतात आपल्या शासकांनी आपल्या प्रशासनाला प्रजापालक प्रशासन बनवावे, ही अपेक्षा आहे. राजकीय स्वातंत्र्य आपोआप पूर्ण होत नाही. राष्ट्राच्या जीवन व्यवहाराच्या सर्व पैलूंची पुनर्रचना त्याच ‘स्व’च्या तसेच स्वगौरवाच्या आधारावर उभी करावी लागते, ज्यात आपल्याला स्वातंत्र्याच्या संघर्षकरिता जन या नात्याने प्राणवान बनवून प्रेरित केले. स्वतंत्र भारताची जनाकांक्षा ही आपल्या संविधानाची प्रस्तावना, मूळ अधिकार, मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत कर्तव्य या चारही प्रकरणांत परिभाषित आहे. यांच्या प्रकाशात आपल्याला राष्ट्राच्या जीवन व्यवहारातील, राष्ट्राच्या विकासाची लक्ष्यदृष्टी, दिशा आणि तद्नुरूप जीवनाच्या अर्थासहित सर्व अंगांच्या विकासाचा आपला विशिष्ट भारतीय प्रतिमान उभा करावा लागेल. तेव्हा आपले सगळे प्रयत्न, सर्व धोरणे पूर्णत: क्रियान्वित व फलित होत असलेली दिसतील. जगभरातील चांगल्या गोष्टी घेऊनदेखील आपण आपल्या तत्त्वदृष्टीच्या पायावर आपल्या विशिष्ट विकासाचे प्रतिमान आणि त्यानुसार त्याची व्यवस्था उभी करावी लागेल. हे आपल्या देशाच्या विकासासाठी अनिवार्य आहे.

 

श्रीराम जन्मभूमी

 

राष्ट्राच्या ‘स्व’ च्या गौरवासंदर्भात आपल्या कोट्यवधी देशबांधवांसोबतच श्रीराम जन्मभूमीवर राष्ट्राच्या प्राणस्वरूप धर्ममर्यादांचे विग्रहरूप श्रीरामचंद्राचे भव्य राम मंदिर तयार करण्याच्या प्रयत्नांत संघ सहयोगी आहे. सर्व प्रकारच्या साक्षी तेथे कधी तरी मंदिर होते, हेच सांगत आहेत. तरीही मंदिर निर्माण करण्याकरिता जन्मभूमीचे स्थान उपलब्ध होणे बाकी आहे. न्यायप्रक्रियेत वेगवेगळ्या नवनवीन बाबी उपस्थित करून निर्णय होऊ न देण्याचा खेळ काही शक्ती खेळ खेळत आहेत. समाजाच्या धैर्याची विनाकारण परीक्षा घेणे हे कोणाच्याही हिताचे नाही. मंदिर बनणे स्वगौरवाच्या दृष्टीने आवश्यकच आहे, मंदिर तयार झाल्यामुळे देशात सद्भावना आणि एकात्मतेचे वातावरण तयार होण्यास प्रारंभ होईल. काही कट्टरपंथीय देशहिताच्या या बाबतीत सांप्रदायिक राजकारण करून आपला स्वार्थ साधण्यासाठी शक्ती अडथळा आणत आहेत. असे कट होऊनही लवकरात लवकर त्या भूमीच्या मालकी हक्कांसंबंधी निर्णय व्हावा आणि शासनाद्वारे योग्य आणि आवश्यक कायदा तयार करून भव्य मंदिराच्या निर्मितीचा मार्ग प्रशस्त व्हायला हवा.

 

निवडणूक

 

देशाचे नेतृत्व कोण करते? जी धोरणे लागू आहेत ती योग्य आहेत अथवा अयोग्य? या सर्व बाबींचा निर्णय देशातील लोकशाही व्यवस्थेत पाच वर्षांतून एकदा सामान्य मतदाराने करावा, हे त्याचेच कर्तव्य मानले जाते. ती पंचवार्षिक निवडणूक आपल्यासमोर आहे. या अधिकारातून एकप्रकारे आपण भारताचे लोक, सामान्य जनता भारताच्या परिस्थितीचा निर्णय आणि नियंत्रण करणारे होत असते. परंतु आपल्याला हेही माहीत आहे की, त्या एका दिवसाच्या मतदानातून आपण जो निर्णय घेतो, त्याचे चांगले-वाईट तात्कालिक परिणाम भोगणे, आणि दीर्घकालीन नफा-तोटा झेलण्याचे काम पुढे पुष्कळ वर्षांपर्यंत अथवा जीवनभर करत राहणे, बस! त्या एका दिवसानंतर आपल्या हातात यापेक्षा अधिक काही राहत नाही. पश्चात्ताप होऊ नये असा निर्णय मतदारांच्याद्वारे प्राप्त करायचा असेल तर मतदारांना राष्ट्रहिताला सर्वोपरी मानून; स्वार्थ, संकुचित भावना आणि आपल्या भाषा, प्रांत, जात आदी छोट्या चौकटीतील अहंकारातून बाहेर पडून विचार करावा लागेल. उमेदवाराची प्रामाणिकता आणि क्षमता, पक्षाच्या धोरणाचे राष्ट्रहित व राष्ट्राच्या एकात्मतेसोबत प्रतिबद्धता तसेच या दोन्हींच्या भूतकाळातील तसेच वर्तमानातील कार्यांचा अनुभव; याचा स्वतंत्र बुद्धीने मतदारांना विचार करावा लागेल. लोकशाहीतील राजकारणाचे चरित्र आजतागायत असे आहे की, कोणालाही संपूर्णत: योग्य अथवा संपूर्णत: अयोग्य असे मानता येत नाही. अशा स्थितीत मतदान न करणे किंवा ‘नोटा’च्या अधिकाराचा उपयोग करणे, मतदाराच्या दृष्टीने जे अयोग्य आहे त्याच्याच बाजूने जाते. याकरिता सर्व प्रकारच्या प्रचारांना ऐकून, त्याच्या जाळ्यात न अडकता राष्ट्रहित सर्वोपरी ठेवून १०० टक्के मतदान होणे आवश्यक आहे. भारताचा निवडणूक आयोगदेखील याच प्रकारच्या १०० टक्के मतदान व विचारपूर्वक मतदानाचा आग्रह करतात. या नागरी कर्तव्याचे अनुपालन संघाचे स्वयंसेवकसुद्धा करत आले आहेत आणि नेहमीप्रमाणे ते यावेळीही करतील. पक्षांतर्गत राजकारण, जातीसंप्रदायांच्या प्रभावातील राजकारण यापासून संघ आपल्या जन्मापासूनच विचारपूर्वक वेगळा राहत आला आहे आणि राहील. परंतु संपूर्ण देशात व्याप्त स्वयंसेवकांनी, नागरिक या नात्याने आपली कर्तव्ये पार पाडावीत तसेच समग्र आणि सम्यक राष्ट्रहिताच्या बाजूने आपली शक्ती उभी करावी, हे देशहितासाठी आवश्यक कार्य आहे.

 

आवाहन

 

देशहिताकरिता मूलभूत अनिवार्य आवश्यकता आहे की, भारताच्या ‘स्व’च्या ओळखीच्या सुस्पष्ट अधिष्ठानावर उभा राहिलेला सामर्थ्यसंपन्न व गुणवत्तावान संघटित समाज या देशात व्हावा. ही आपली हिंदू ओळख ओळख आहे. जी आपल्याला सगळ्यांचा आदर, सगळ्यांचा स्वीकार, सगळ्यांची एकजूट आणि सगळ्यांचेभले करण्यास शिकवते. याकरिता संघाला हिंदू समाजाला संघटित व अजेय सामर्थ्यसंपन्न बनवायचे आहे आणि तो हे कार्य संपूर्ण संपन्न करेलच. आपापले संप्रदाय, परंपरा आणि राहणीमानाने आपल्याला वेगळे मानणाऱ्या अथवा ‘हिंदू’ शब्दाने भयभीत होणाऱ्या समाजातील वर्गाला हे समजून घेण्याची आवश्यकता आहे की, या देशाच्या सनातन मूल्यबोधालाच हिंदुत्व तर म्हटले जाते. त्याच्या या सत्य आणि शाश्वत अंतरंगाला कायम ठेवूनच त्यात देश-काल-परिस्थितीअनुसार व व्यवहारातील परिवर्तने आली आहेत आणि भविष्यातही आवश्यकतानुरूप होऊ शकतील. हिमालयापासून समुद्रापर्यंत अखंड भारतभूमीबरोबर हिंदुत्वाचा ऐक्यभाव आहे. या मूल्यबोधातून अनुप्रणित भारताच्या एक संस्कृतीच्या रंगात सर्व भारतीय रंगले पाहिजे, ही संघाची इच्छा आहे. भारताच्या सर्व पंथ-संप्रदायांचा आचार धर्म त्याचाच आधार बनून चालत असतो. या हिंदू संस्कृती व समाजाची सुरक्षा तसेच संवर्धनाकरिता प्रखर परिश्रम करणारे, प्राणोत्सर्ग करणारे महापुरुष आपले सगळ्यांचे पूर्वज, आपल्या सगळ्यांचे गौरव आहेत. संपूर्ण विश्वाचे त्याच्या विशिष्ट विविधतांसह स्वागत आणि स्वीकार करतानाच हृदयापासून स्वीकारण्याची क्षमता भारतात या हिंदुत्वाच्या कारणामुळे आहे. यामुळेच भारत हिंदूराष्ट्र आहे. संघटित हिंदू समाजच देशाची अखंडता, एकात्मता आणि निरंतर प्रगतीचा आधार आहे. संपूर्ण जगात कट्टरपणा, संकुचित स्वार्थ आणि आत्यंतिक जडवादामुळे मर्यादारहित उपभोग वृत्ती तसेच संवेदनहीनता समाप्त करण्याचा एकमात्र उपाय हिंदुत्वाच्या शाश्वत मूल्यबोधांचे स्वीकार हेच आहे. हिंदू संघटनांचे कार्य याचकरिता विश्वहितैषी, भारतकल्याणकारी आणि लोकमंगलाचे कार्य आहे.

 

आपल्या सगळ्यांना आवाहन आहे की, संघ स्वयंसेवकांसोबत या पवित्र ईश्वरीय कार्यात सहयोगी आणि सहभागी होऊन आपण सगळे मिळून भारतमातेला विश्वरूप पदावर स्थापन करण्याकरिता भारताचा भाग्यरथ अग्रेसर करावा.

 

नहीं है अब समय कोई, गहन निद्रा में सोने का,

समय है एक होने का, न मतभेदों में खोने का।

बढे बल राष्ट्र का जिससे, वो करना मेल है अपना,

स्वयं अब जागकर हमको, जगाना देश है अपना॥

॥ भारत माता की जय॥

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@