नवी मुंबई: नवी मुंबईमधील वाहनांची वाढती संख्या व त्यामुळे मुख्य रस्त्यांवरील चौकात होत असलेली वाहतुक कोंडी बघता वाहतुक सुरळीत होण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या मार्गदर्शनानुसार शहरातील ७ वर्दळीच्या मध्यवर्ती चौकात वाहतुक सिग्नल बसविण्यात आले आहेत. याविषयी वाहतुक पोलीस विभागाच्या वतीने सातत्याने आढावा घेतला जात होता, त्या सर्वेक्षणानुसार शहरात असलेल्या सिग्नल यंत्रणेमध्ये आणखी काही ठिकाणी भर घालणे गरजेचे असल्याचे सूचित करण्यात आले होते. त्यास अनुसरून वाहतुकीच्या सुनियोजितपणाच्या दृष्टीने आणखी ७ स्थळांवर सिग्नल बसविण्यास आयुक्तांची मंजूरी प्राप्त होऊन विद्युत विभागामार्फत ते काम तातडीने पूर्ण करण्यात आल्याने त्याठिकाणी होणारी वाहतुक कोंडी टाळण्यास मोलाची मदत होणार आहे.
एम.आय.डी.सी. भागात महापे येथे सरोवर पोर्टीगो जंक्शन, महापे शिळ रोडवर महापे सर्कल, इंदिरानगरजवळ एव्हरेस्ट सर्कल, महापे रोडवर नेल्को जंक्शन, सविता केमिकल्स जंक्शन, हनुमान नगर, महापे इंदिरानगर रोडवरील शालीमार चौक अशा ७ ठिकाणी सिग्नल यंत्रणा बसविण्यात आलेली आहेत. यामुळे येथील वाहतुक कोंडीचा प्रश्न निकाली निघणार आहे. नवी मुंबई महानगरपालिका अभियांत्रिकी विभाग आणि नवी मुंबई वाहतुक पोलीस विभाग यांनी सर्वेक्षण करून सूचित केल्याप्रमाणे या ७ महत्वाच्या ठिकाणी अद्ययावत सिग्नल यंत्रणा बसविण्यासाठी साधारणत: ६० लक्ष इतकी रक्कम खर्च करण्यात आली आहे. ही सिग्नल यंत्रणा बसविल्यामुळे तेथील वाहतुक कोंडी टळणार आहे तसेच ध्वनी व वायू प्रदूषणात घट होऊन पर्यायाने पर्यावरणाचे हित साधले जाणार आहे. त्याचप्रमाणे सिग्नल यंत्रणा बसविल्यामुळे नागरिकांच्या इंधन खर्चात बचत होऊन त्यांचा वेळही वाचणार आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/