‘पर्यावरणस्नेही आहे हो सायकल’ हे आपण कायमच ऐकलं असेल. पण, बदलत्या काळानुसार आपल्याला याचा विसर पडला. वेळेची बचत तसेच आधुनिकीकरणाच्या जगात मानवाच्या गरजाही बदलल्या. राहणीमान बदलले आणि अखेर ‘पर्यावरणस्नेही सायकल’चा आपल्याला विसर पडला. या सायकलला भूतकाळ न होऊ देता तिच्या आधुनिकीकरणासह तिला जोपासण्याचे काम करणार्या डोंबिवलीतील ‘डोंबिवली सायकल क्लब’च्या कार्याचा घेतलेला हा आढावा...
पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन ही खरं तर आपल्या सगळ्यांची नैतिक जबाबदारी. त्यासाठीची माध्यमे अनेक आहेत, पण शेवटी संगोपन महत्त्वाचे. हाच ध्यास घेऊन दि. ५ फेब्रुवारी, २०१२ पासून ‘डोंबिवली सायकल क्लब’ ही संस्था सायकलप्रेमींना एकत्र आणण्यासाठी, तसेच सायकलची मोहीम जनसमाजात रूजविण्यासाठी प्रयत्नशील आहे. या संस्थेची स्थापना डॉ. सुनील पुणतांबेकर तसेच दीपक देशपांडे यांनी केली. २०११ साली ‘युथ हॉस्टेल असोसिएशन’च्या महाराष्ट्र शाखेच्यावतीने मुंबई ते गोवा या सायकल प्रवासाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. पुणतांबेकरांनी सायकलने हा प्रवास पूर्ण केला. त्यांच्या या प्रवासाचे कौतुक करीत देशपांडे यांनी दर रविवारी ‘सायकल फेरी’ करण्याची कल्पना डॉ. पुणतांबेकरांकडे मांडली आणि तिथूनच मग ‘डोंबिवली सायकल क्लब’च्या प्रवासाचे चक्र फिरले.
डोंबिवलीत दर रविवारी ही ‘सायकल फेरी’ आयोजित करण्यात येते. मागील नऊ वर्षे सातत्याने ही अनोखी ‘सायकल फेरी’ सुरूच आहे. या क्लबचा सदस्य होण्यासाठीची एक अट मात्र कायम ठेवण्यात आली ती म्हणजे, ‘स्वत:ची सायकल, स्वत:चा सायकल प्रवास.’ आणि आजही ही अट कायम असल्याने कोणत्याही पद्धतीचा आर्थिक ताण या क्लबवर येत नसल्याचे डॉ. पुणतांबेकर सांगतात. सुरुवातीच्या काळात केवळ नऊजणांचा मिळून झालेला हा ग्रुप आता तब्बल अडीचशे जणांचा आहे. या ग्रुपमध्ये अगदी नऊ वर्षांपासून ते ६९ वर्षांपर्यंतचे ज्येष्ठ नागरिकही सायकलचे पेडलिंग करताना दिसतात. ‘सायकल चालवा प्रदूषण रोखा’, ‘सायकल चालवा इंधन वाचवा’ , ‘सायकल चालवा आरोग्य राखा’ असा संदेश या क्लबमार्फत देण्यात येतो आणि सायकलीच्या वापरासंदर्भात प्रचार-प्रसार करण्यात येतो. दर रविवारी निघणारी ही ‘सायकल रॅली’ ही डोंबिवली पूर्वेतील फडके रोड ते मिलाफ नगर, गणेश मंदिरापर्यंत काढली जाते. यानंतर पुढे २० किलोमीटरपर्यंतचे ठिकाण ठरवण्यात येते. या सायकल रॅलीचे वैशिष्ट्यम्हणजे, सुरुवातीच्या रायडरपासून शेवटच्या रायडरपर्यंत सर्वांनी एकत्र प्रवास करणे. यात सुमारे ५० रायडर्स एकत्र प्रवास करतात. उन्हाळा असो वा पावसाळा, वर्षाच्या कुठल्याही रविवारी ही रॅली काही चुकत नाही. दरम्यान, ‘डोंबिवली सायकल क्लब’च्या टी-शर्ट्सच्या माध्यमातून जनजागृतीचा संदेशही दिला जातो. ‘सायकल चालवा, निरोगी राहा व पर्यावरण जपा’ असा संदेशही देण्यात येतो. या संदेशातही बदल केला जातो. फक्त पुरुष सायकलस्वार नाही, तर २० ते २५ महिलांचाही या क्लबमध्ये आणि रॅलीमध्ये अगदी सक्रीय सहभाग असतो.
बिजारोपण मोहीम
याच बरोबर दरवर्षी पावसाळ्यात बीजारोपण मोहिमेचे आयोजन केले जाते. या माध्यमातून सदस्यांना बियाणे जपण्याचे तसेच वृक्षारोपणाचे महत्त्व समजावले जाते.
गणेश दर्शन
गणेशोत्सवात तसेच नवरात्रोत्सवात सायकल चालवत गणपतीचे तसेच देवीचे दर्शन घेतले जाते. या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत सायकल मोहीम पोहोचविण्याचा या क्लबचा संकल्प आहे.
तसेच गेली दोन वर्षे ‘वाहतूक सुरक्षा सप्ताहा’च्या निमित्ताने वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने ‘वाहतूक सुरक्षा सप्ताहा’चे डोंबिवलीत आयोजन करण्यात येते. यासाठी कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ इ. परिसरातील सायकलस्वार सहभागी होतात. यात पश्चिमेतील रेतीबंदर चौक, अग्निशमन केंद्र, पूर्वेतील मिलाफ नगर, गणेश मंदिर, स्वामी समर्थ मठ, नांदिवली व फडके रोड, गणेश मंदिर या ठिकाणांहून ही सायकल रॅली काढण्यात येते. यात सुमारे २०० सायकलस्वार या सायकलस्वार सहभागी होतात.
तसेच महाराष्ट्रात होणार्या व देशविदेशात होणार्या विविध सायकल स्पर्धांमध्ये येथील सायकलस्वार सहभागी होऊन बक्षिसे घेत असतात. तसेच हिवाळ्यात व पावसाळ्यात ‘बिग सायकल रॅली’चेही आयोजन केले जाते. यात कल्याण-डोंबिवली भागात सायकल रॅली काढून तेथील निसर्गविविधतेचा अभ्यास केला जातो. ‘डोंबिवली सायकल क्लब’ हा ‘ताडोबा ते गेट वे इंडिया’ या महत्त्वपूर्ण चळवळीत सहभागी झाला होता. तसेच तलावाचे शहर म्हणून ओळख असलेल्या ठाणे शहराच्या ‘तलाव स्वच्छता मोहिमे’तही सहभागी झाला होता.
सायकल संमेलन
सायकल ही आरोग्याची गुरूकिल्ली आहे. कारण, सायकलच्या माध्यमातून पर्यावरणही उत्तम राखता येते. या अनुषंगाने यावर्षी महाराष्ट्रातील पहिले सायकल संमेलन भरविण्यात आले होते. याचे उद्घाटन राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. क्रीडाभारती, नॅशनल युथ ऑर्गनायझेशन आणि ‘डोंबिवली सायकल क्लब’ यांनी या संमेलनाचे आयोजन केले होते. डोंबिवली पूर्वेतीलसावित्रीबाई फुले कलामंदिरात हे संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनात महाराष्ट्रातील सायकलप्रेमींनी उपस्थिती दर्शवली होती. या सायकल फेरीत ८० वर्षांचे ज्येष्ठ सायकलस्वार गोविंद परांजपे हे सांगलीहून सामील झाले, तर ७६ वर्षांचे श्यामसुंदर केसरकर आणि ९० वर्षांचे डी. व्ही. भाटे यांनी या सायकल फेरीचे उद्घाटन केले होते. या वेळी विविध सायकलींचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. तसेच सायकलस्वारांच्या चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. या संस्थेच्यावतीने येत्या फेब्रुवारी २०१९ मध्ये ठाणे येथे या संमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे. संस्थेच्यावतीने कल्याण-डोंबिवली महापलिकेकडे रिंगरूट मार्गावर सायकल ट्रॅक बसविणे, तसेच स्थानक परिसरातील वाहनतळावर सायकलसाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. तसेच स्थानक परिसरापासून लांब राहणार्यांसाठी पुणे व नाशिकच्या धर्तीवर ‘रेंट सायकल’ ही पद्धत राबविण्याची मागणी केली आहे.
‘डोंबिवली सायकल क्लब’चे सदस्य
दीपक देशपांडे, प्रदीप अडडूर, शशांक वैद्य, अजित अभ्यंकर, सारंग मुळे, बिराजदार, पुष्कर जोशी, मेघेश कुलकर्णी, रितेश सावला, रुधिर मोघे, उमेश महाजन, नैना आघारकर, रुचा कोचरेकर, आकांशा सोनाळकर, अमृता पडले, अंजली भोजवानी, जिया छेडा, प्राची बोरा.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/