पुणे : छत्रपती संभाजी महाराजांविषयी बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध केल्याप्रकरणी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने कठोर पाऊले उचलली आहेत. डॉ. शुभा साठे लिखित 'समर्थ श्री रामदास स्वामी' हे पुस्तक विद्यार्थ्यांना न देण्याचा आदेश परिषदेने दिले आहेत. सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत 'समर्थ श्री रामदास स्वामी' या पुस्तकाचा समावेश करण्यात आला होता. यात छत्रपती संभाजी महाराजांविषयी बदनामी केल्याचा आरोप विवेक विचार मंच व विविध संस्थांनी केला होता. यावर हे पुस्तक विद्यार्थ्यांपर्यंत न पोहचू देण्याचे आदेश परिषदेने दिले आहेत.
संभाजी महाराजांची बदनामी प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची मागणी विवेक विचार मंचातर्फे केली होती. यावर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने कठोर पाऊले उचलत या संपूर्ण प्रकारावर इतिहासतज्ज्ञांची समिती नेमण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच शासन स्तरावरून पुढील आदेश होईपर्यंत हे पुस्तक विद्यार्थ्यांपर्यंत पोहचणार नसल्याची काळजी घेण्याची सूचना मुख्याध्यापकांना दिली आहे. परिषदेचे उपसंचालक विकास गरड यांनी याबाबत माहिती दिली.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/