मागे उभे राहणाऱ्यांना अद्दल घडवा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Oct-2018
Total Views |

 


 
 
 
आपण केलेल्या देशविरोधी कृत्यांना अभिव्यक्तिस्वातंत्र्य वा तत्सम भंपकपणामुळे मिळणारा पाठिंबा व ‘कोणीतरी आपल्यामागे उभे राहणारे’ असल्याचे पाहून विद्यार्थ्यांच्या मनात काहीही केले तरी काही बिघडणार नसल्याची हिंमत निर्माण झाली. यातूनच देश, राष्ट्र व राष्ट्रीय अस्मिता-प्रतिकांनाच सुरुंग लावण्याचे डाव आखले गेले. आताचे अलीगड मुस्लीम विद्यापीठातील प्रकरणही त्यातलेच.
 

सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत मारला गेलेला दहशतवादी आणि अलीगड मुस्लीम विद्यापीठातील पी. एचडी.चा माजी विद्यार्थी मन्नान वानीच्या समर्थनार्थ देशविरोधी घोषणा दिल्याचे चित्रण नुकतेच चव्हाट्यावर आले. गुरुवारी काश्मीर खोऱ्यात दहशतवादी मन्नान वानीला कंठस्नान घातल्यानंतर अलीगड मुस्लीम विद्यापीठाच्या केनेडी हॉलमध्ये काही विद्यार्थ्यांनी शोकसभेचे आयोजन केले व वानीसाठी नमाज पढल्याचेही सदर चित्रणातून उघड झाले. धक्कादायक म्हणजे ज्या स्वतंत्र भारतात हे विद्यार्थी राहतात, त्याच देशाविरोधात ‘मुर्दाबाद... मुर्दाबाद’ सारख्या बोंबाही या लोकांनी ठोकल्या. सध्या देशातले वातावरण पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका आणि त्यानंतर होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या पृष्ठभूमीवर राजकीय प्रचाराने तापलेले आहे. निवडणुकीच्या काळात देशात गडबड-गोंधळ माजावा, लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास उडून जावा, अशी कुटील इच्छा मनी बाळगून डावपेच आखणाऱ्या अनेक शक्ती कार्यरत असतात. मन्नान वानी या दहशतवाद्याला पाठिंबा देत, त्याने जणू काही देशासाठी हौतात्म्य पत्करल्याचे ठसवत, त्याच्या स्मरणार्थ कार्यक्रम करणाऱ्यांचाही तसाच काही हेतू असू शकतो. परिणामी देशातल्या एका प्रतिष्ठित विद्यापीठात दहशतवाद्याच्या गौरवीकरणाचा, उदात्तीकरणाचा डाव कोणी रचला असेल, तर तो उधळून लावणे पोलीस व प्रशासकीय यंत्रणेसह सर्वांचेच कर्तव्य ठरते. पोलीस व उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने दहशतवाद्यांचे शब्द ओठांवर खेळवणाऱ्यांची गंभीर दखल घेत तीन विद्यार्थ्यांना तुरुंगातही डांबले, पण त्यानंतर प्रथेप्रमाणे बुद्धीजीवी, डाव्या-पुरोगामी वर्तुळातून विद्यार्थ्यांच्या अटकेला विरोधही सुरू झाला. देशात स्वातंत्र्यापासून ज्यांनी सत्ता गाजवली, त्यांनी ‘राजकारण आमचे व विद्यापीठे, संशोधन संस्था तुमच्या,’ अशी वाटणी करत सर्वत्र आपल्याच विचारांवर नाचणाऱ्या कठपुतळ्या कशा उभ्या राहतील, हे पाहिले. अलीगड मुस्लीम विद्यापीठातील ही देशविरोधी घटना आणि त्याला बुद्धीजीवी व अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या कथित लढवय्यांनी दिलेला पाठिंबा याच वाटणीचे निदर्शक. गेल्या साडेचार वर्षांत मात्र असे राजकारण करणाऱ्यांची आणि बौद्धिक क्षेत्रात वर्षानुवर्षे अनुदाने-शिष्यवृत्त्या लाटणाऱ्यांची दुकानदारी बंद झाली, पण म्हणतात ना विझता दिवा जरा जास्तच फडफडतो, तशी या लोकांची फडफड आणि तडफड अधूनमधून समोर येतच असते. तशी ती आताच्या अलीगड मुस्लीम विद्यापीठातील देशविरोधी प्रकारातून समोर आली.

 

मोदी सरकार सत्तेवर आल्यापासूनच देशात असंतोष पैदा करण्याचे पद्धतशीर प्रयत्न एका गटाकडून केले गेले. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयु), जाधवपूर विद्यापीठ, हैदराबाद विद्यापीठ अशा मोठ्या शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना सरकार, भाजप व संघाविरोधात भडकविण्यासाठी निरनिराळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यापीठात विद्यार्थी येतात ते ज्ञानार्जनासाठी व त्यानंतर आयुष्यात स्थिरस्थावर होऊन स्वतःच्या व कुटुंबीयांच्या आशा-अपेक्षांना सत्यात उतरविण्यासाठी, पण जेएनयुत दहशतवादी अफझल गुरूच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशविघातक कारवायांना प्रतिष्ठा मिळवून देण्याचे उद्योग सुरू झाले व देशातले शैक्षणिक क्षेत्र ढवळून निघाले. कन्हैय्याकुमार, उमर खालिदसारख्या विद्यार्थ्यांना बुद्धीजीवी वर्गातून व प्रसारमाध्यमांतून सतत लोकांपुढे दाखविण्यात आले. अशाप्रकारे आपण केलेल्या देशविरोधी कृत्यांना अभिव्यक्तिस्वातंत्र्य वा तत्सम भंपकपणामुळे मिळणारा पाठिंबा वकोणीतरी आपल्यामागे उभे राहणारेअसल्याचे पाहून विद्यार्थ्यांच्या मनात काहीही केले तरी काही बिघडणार नसल्याची हिंमत निर्माण झाली. यातूनच देश, राष्ट्र व राष्ट्रीय अस्मिता-प्रतिकांनाच सुरुंग लावण्याचे डाव आखले गेले. आताचे अलीगड मुस्लीम विद्यापीठातील प्रकरणही त्यातलेच. सरकारी अनुदानावर पोसलेल्या विद्यापीठांतील विद्यार्थ्यांनी दहशतवाद्याची बाजू घेत देशावरच उलटण्याचे हे उद्योग जितके धोकादायक तितकेच संतापजनक. देशाच्या मुळावर घाव घालणाऱ्या व पाकिस्तानसारख्या अनैसर्गिक देशाची निर्मिती करणाऱ्या मोहम्मद अली जिना यांचे छायाचित्र हटवू नये म्हणूनही मागे याच अलीगड मुस्लीम विद्यापीठात तमाशा झाला होता. उठसूट राष्ट्रवादाची, राष्ट्राभिमानाची टवाळी करणाऱ्या विकृतांमुळेच अशा उपद्व्यापांना खतपाणी घातले जाते, हे इथे लक्षात ठेवलेले बरे. आता अशा लोकांना ताळ्यावर आणण्यासाठी सरकारसह सर्वसामान्य नागरिकांनीही पुढाकार घ्यायला हवा, तरच या लोकांचे असले उद्योग बंद पडतील. शिवाय आताच्या प्रकारावरुन बाकी समाजातील घटकांतून प्रतिक्रिया उमटतच राहतील, पण विशेषत्वाने मुस्लिम समाजातल्या राष्ट्रवादी, दहशतवाद्यांचे उदात्तीकरण मान्य नसलेल्या, देशप्रेमी मंडळींनीही पुढे येत या प्रकाराचा विरोध केला पाहिजे. जेणेकरुन मुस्लिम समाजाविषयी जी संशयाची भावना तयार होते, तिला तिलांजली देणे शक्य होईल व एकत्वाची-अखंडत्वाची भावना बळकट होईल.

 

आताच्या अलीगड मुस्लीम विद्यापीठातील दहशतवाद्याच्या महिमामंडनला आणखी एक वळण लागले, ते म्हणजे काश्मिरी विद्यार्थ्यांशी केला जाणारा कथित दुजाभाव. मन्नान वानीच्या समर्थनार्थ कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांपैकी तिघांना विद्यापीठाने निलंबित केले, तर त्यावरून काश्मिरी विद्यार्थ्यांनी आमच्याशी भेदभाव केला जात असल्याचा आरोप केला. अलीगड मुस्लीम विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचा उपाध्यक्ष व काश्मिरी विद्यार्थी असलेल्या सज्जाद राठर याने विद्यापीठाला एक पत्र पाठवले. पत्रात म्हटले की, “आम्ही आमच्या सुरक्षेवरून चिंतीत असून निलंबित केलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा घ्या, आमच्या मागण्या मान्य करा; अन्यथा विद्यापीठातील सर्वच १२०० काश्मिरी विद्यार्थी विद्यापीठ सोडून निघून जातील.” काश्मिरी विद्यार्थ्यांनी मुळात हे लक्षात घेतले पाहिजे की, संपूर्ण भारतात त्यांना अतिशय आपुलकीने व प्रेमाने वागवले जाते. देशातल्या कितीतरी विद्यापीठात काश्मिरी विद्यार्थी शिक्षण घेतात आणि अनेकानेक स्वयंसेवी संस्था काश्मिरी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचीही व्यवस्था करतात. असे असताना त्यांना उर्वरित देशात स्वतःच्या सुरक्षेची चिंता वाटायला नको, तर काश्मिरातल्या दगडफेक्या, पाकधार्जिण्या, फुटीरतावाद्यांपासून आणि जी लोकं काश्मिरच्या भल्याचे नाव घेऊन सर्वसामान्य काश्मिरींवर अत्याचार करतात, त्यांची घरेदारे उद्ध्वस्त करतात, त्या दहशतवाद्यांपासून असुरक्षितता वाटली पाहिजे, पण काश्मिरी विद्यार्थ्यांच्या मनात सुरुवातीपासूनच विशिष्ट लोकांनी भारताविषयी विष कालवत द्वेषाची लागवड केली. आता ही मुले देशाच्या निरनिराळ्या भागात जाऊन शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभी राहत नव्या जगातल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी सिद्ध होत आहेत, तर ते न पाहवणारे लोक सक्रिय झाले. अशा लोकांनीच काश्मिरी व भारतीय वेगळे, शत्रू असल्याचे इथल्या मुलांवर बिंबवण्याचे कट-कारस्थान केले. मन्नान वानी या दहशतवाद्याच्या समर्थनार्थ आयोजित केलेला कार्यक्रम आणि पुढे काश्मिरी विद्यार्थ्यांनी लिहिलेले पत्र, या लोकांच्या षड्यंत्राचेच उदाहरण. त्यामुळे आधी गरज आहे ती, अशी देशविघातक, देशविरोधी व देशाच्या एकता-अखंडतेला बाधा आणणाऱ्या लोकांना वठणीवर आणण्याची, अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली बुद्धीवादाची पोपटपंची करणाऱ्या धेंडांना अद्दल घडविण्याची.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@