‘तिवरे ते मालदेव व्हाया बैलमारव घाट’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Oct-2018
Total Views |



सह्याद्रीच्या माथ्यावर उंच पठारावरील सपाट माळरान म्हणजे माळदेव किंवा मालदेवहोय. कोयना खोऱ्यातील वासोटा किल्ल्याजवळ असलेल्या ‘मालदेव’चे सन 1959 नंतर कोयना जलविद्युत प्रकल्पाची गरज म्हणून मनुष्य वस्ती उठवून पुनर्वसन झाले आहे.


ईतिहासात, ‘देश आणि कोकण’ या दरम्यान चालणारी चिपळूणसह त्याला जोडलेल्या अनेक गावांची व्यापारी देवघेव ज्या मार्गाने चालत होती तो घाट ‘बैलमारव घाट’ या नावाने प्रसिद्ध आहे. पूर्वापार या मार्गाने लमाणांचे तांडे कोकणात येत असत. सन १८४६ च्या दरम्यान रत्नागिरी-सातारा सीमा जोडणाऱ्या कुंभार्ली घाटातून बैलगाडी प्रवास सुरू झाला आणि ‘बैलमारव घाट’ परिसराचे व्यापारी महत्त्व हळूहळू कमी होत गेले. मात्र प्रदूषणाने घेरलेल्या सध्याच्या काळात या प्राचीन घाटमार्गांवर असणाऱ्या पदभ्रमण मार्गांना महत्त्व प्राप्त होऊ घातले आहे. वन्यजीव परीक्षण, पर्यटनासह ट्रेकिंग करणाऱ्यांसाठी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील महाबळेश्वर ते आंबा घाट दरम्यान आठ ‘हॉट स्पॉट’नजीकच्या बफर झोनचे दरवाजे वन्यजीव विभागाने नुकतेच उघडले. ‘तिवरे ते मालदेव व्हाया बैलमारव घाट’ हा त्यापैकी एक आहे. या ‘ट्रेकरूट’वरील प्रत्यक्ष अनुभवलेल्या, सामान्य पर्यटकाला आपलंस करण्याची क्षमता असलेल्या परिसराचा आढावा ! चिपळूण पर्यटन विकासासाठी झटणारी मातृसंस्था ‘ग्लोबल चिपळूण टुरिझम’ने या जंगल ट्रेकना पर्यटकाभिमुख बनविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नुकताच आबालवृद्धांच्या उत्साही सान्निध्यात सह्याद्री टायगर रिझर्व्ह’नजीक असलेला ‘तिवरे ते मालदेव व्हाया बैलमारव घाटहा ट्रेक ३० निसर्गप्रेमींनी १६ किमी भटकंती करीत अडीच हजार फूट उंचीपर्यंत जात यशस्वी केला. या ट्रेकदरम्यान तिवरेदुर्ग, मालदेव, पाली, देवसरी, बैलमारव घाट, रेडे घाट हा परिसर नजरेच्या टप्यात येतो. रत्नागिरी जिल्ह्याच्या ८२४८.८ चौकिमी भौगोलिक क्षेत्रापैकी अवघे ६२.५९ चौकिमी वनक्षेत्र आहे. जिल्ह्याच्या पूर्व सीमेवर सह्याद्रीच्या उंच शिखरांची उंची ४०० ते दोन हजार मीटरपर्यंत आहे. जिल्ह्याला लागूनच कोयना व चांदोली अभयारण्ये असल्याने वन्यप्राण्यांचा वावर सह्याद्रीच्या खोऱ्यात आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या पायथ्याशी वसलेल्या गावांमध्ये या माध्यमातून स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘जंगलट्रेक’चे प्रयोजन असून हे घडल्यास जंगलतोड, जंगलातील वणवे यांचे प्रमाण कमी होऊ शकेल, असा प्रशासनाला विश्वास आहे. चिपळूणहून ३१ किमी अंतरावर असलेले तिवरे हे गाव सह्याद्रीतील चिपळूण तालुक्यात इतिहासप्रसिद्ध ‘दसपटी’ (दस म्हणजे दहा आणि पट्टी म्हणजे कर दहा टक्क्यांची करवसुली) या २८ गाव इनाम भागात येते. चिपळूण तालुक्याच्या या पूर्व भागात, सह्याद्रीत बारराव कोळ्याचे साम्राज्य होते. मौजे पेढांबे गावाच्या माथ्यावर खडपोली, कळकवणे यांच्या सीमामध्यावर १५०० फूट उंचीचा बारराव कोळ्यांचा किल्ले बारवईआहे. तेथे १२ कोरीव लेणी (ओवरी/खोली) आहेत. त्यांचा पाडाव केल्यानंतर शिंदे-कदम सरदारांनी या भागात आपला अंमल प्रस्थापित केला. या दरम्यान, त्यांनी कुंभार्ली, चोरवणे खिंड आणि तिवरेच्या घाटात ध्वज लावून चौक्या बसविल्या होत्या. या घाटांतून वाहतूक चालू असताना चिपळूणसह गोवळकोट बंदरात पडाव लागत. गोवळकोट बंदरात ४०० लोकांना एकाचवेळी आणणाऱ्या बोटी प्रवासात होत्या. शहरातील जुन्या पद्मा चित्रमंदिरासमोरील ‘कोकणी आणि घाटी’ अशा दोन स्वतंत्र भव्य गाडीतळात शेकडो बैलगाड्या उभ्या असत. सांगली, कराड, कोल्हापुरातून गूळ, ज्वारी, मिरची, कांदा, लसूण, गुळ, हरभरा, चवळी, मूग, आणि इतर शेतमालाची वाहतूक होत असे. बैलमारव घाटातून पुरातन काळापासून देशावरून लमाणांचे तांडे या वाटेने कोकणात येत. हा घाट कोकण व पश्चिम घाट यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा होता. याच मार्गे बैलांच्या पाठीवर माल लादून त्याची ने-आण चाले. म्हणून त्यास ‘बैलमारव घाट’ असे नाव पडले. तिवरेचे ग्रामदैवत श्रीदेवी व्याघ्रांबरी देवस्थानचा त्रैवार्षिक जत्रोत्सव आपली सुमारे ५०० वर्षांची परंपरा जोपासून आहे. गावात सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या गंगेची वाडी भागात, खडकाळ नदीप्रवाहाच्या तीरावर ‘गंगाकुंड’ आहे. या कुंडात दर तीन वर्षांनी कार्तिक महिन्यात ७०० वर्षापूर्वीपासून गंगा उगम पावते आहे. या पर्वणी काळात गंगास्नानास भाविक, जिज्ञासू, पर्यटक यांची येथे रीघ लागलेली असते. तिवरे येथील सह्याद्रीच्या रांगेत उंच टेबलासारखा पठारवजा डोंगर दिसतो, तो तिवरे गड.

 

तिवरे गावातून बैलमारव घाटातून या गडाकडे, मालदेवकडे जाण्याचा प्रवास सुरू होतो. घाट संपल्यानंतर खिंडीतून उजव्या बाजूने पाल घाटातून पाली गावाकडे, तिवरे गडावर पोहोचता येते. तिवरे गडावर देवीची छोटी मूर्ती, चौथऱ्याचे भग्नावशेष दिसतात. हा परिसर सह्याद्री प्रकल्पाच्या कोअर झोनमध्ये असल्याने तेथे जाता येत नाही. घाटमार्गांवर लक्ष ठेवण्यासाठी किल्ल्याची योजना असावी. तिवरे धरणाच्या उजवीकडील, भेंडवाडीतील उंच टापूवर आपल्या गाड्या उभ्या करून ठेवून धरणाच्या डाव्या किंवा उजव्या तीरावरून (स्थानिक वाटाड्यांच्या सूचनांनुसार) ट्रेकची सुरुवात करता येते. तिवरे ते मालदेव हा बैलमारव घाटातील प्रवास प्राचीन इतिहासाची आठवण करून देतो. घाटाच्या मध्यभागीही श्रीदेवी व्याघ्रांबरीचे स्थान आहे. याच घाटमार्गे तिवरे गावात प्रवेश करताना देवीने येथे काहीकाळ विसावा घेतला होता. तेथून थोडे पुढे मार्गक्रमण केल्यानंतर, ‘बैलमारव आलं हं!’ ही अक्षरे लिहिलेला मोठासा काळाकभिन्न पत्थर दिसतो. तिवरे धरणाच्या बॅकवॉटरच्या शेजारून सुरुवातीचा प्रवास पूर्ण झाल्यानंतर हा घाट सुरू होतो. घाटातील वातावरण आल्हाददायक आहे. घाट संपतो तिथे खिंड आहे. तिवरे गावातून मालदेवकडे पहिले असता खिंडीचा आकार इंग्रजी ‘ण’ अक्षरासारखा दिसतो. मालदेवच्या पश्चिमेला कोकणात याच खिंडीतून दोन वाटा उतरल्या आहेत. त्यातली एक बैलमारव घाटमार्गे आणि दुसरी सोंडेवरून उतरणारी देवसरीची वाट आहे. तिवरे गावातून १३०० फूट उंचीवर सह्याद्रीत उर्ध्व बाजूकडून पायाकडे निमुळता होत गेलेला सुमारे २२ फूट उंचीच्या विशाल प्रस्तरखंडाच्या शेजारून ही वाट गेलेली आहे. प्रस्तरखंडाचा आकार साधारणपणे उभ्या केलेल्या चिलमीसारखा दिसायचा म्हणून त्यास ‘चिलीम खडक’ही म्हणत. किमान अडीच-तीन तासांच्या पदभ्रमणानंतर ‘बफर आणि कोअर झोनच्या सीमांवर असलेल्या अडीच हजार फूट उंचीवरील मालदेव गाव सीमेत आपण तिवरे घाट खिंडीतून प्रवेश करतो. सुखावणारा थंडगार वारा येथे आपले स्वागत करतो. जवळचा एखादा जीवंत झरा आपली तृष्णा भागवतो. मालदेव हद्दीत डाव्या बाजूस असलेल्या उंच टापूवरून दिसणारे तिवरे धरणाचे विहंगम दृश्य, सह्याद्रीच्या विशालतेचे दर्शन घडते. सह्याद्रीच्या माथ्यावर उंच पठारावरील सपाट माळरान म्हणजे ‘माळदेव किंवा मालदेव’ होय. कोयना खोऱ्यातील वासोटा किल्ल्याजवळ असलेल्या ‘मालदेव’चे सन १९५९ नंतर कोयना जलविद्युत प्रकल्पाची गरज म्हणून मनुष्य वस्ती उठवून पुनर्वसन झाले आहे. परंतु शहरीकरणाचा स्पर्श न झालेले, गेली अनेक दशके मालदेव ट्रेक करणाऱ्या असंख्य डोंगरभटक्यांचे स्थानिक मार्गदर्शक ‘पितृतुल्य’ ८५ वर्षीय शामराव कोकरे यांनी गावावरचे प्रचंड प्रेम, मातीशी असणारे मायेचे नाते यांमुळे अगदी काल-परवापर्यंत गाव सोडलेले नव्हते. ‘मालदेव’ रिकामं झाल्यानंतरही शामराव भूतासारखे एकटे तिथं राहात. श्वापदांनी हल्ल्यात त्यांचा अडीचशे जनावरांचा गोठा रिता केला. पण ‘मरेन तर इथंच’ या हट्टाने शामराव अनेक दशके येथे राहिले. डोक्याला गुंडाळलेलं मुंडासं, अंगात शर्ट, भगवी लुंगी, हातात काठी, खांद्यावर बॅग असा पेहेराव असलेल्या शामरावांचा अनेक ट्रेकर्सना कोयनेतील निसर्गाइतकाच लळा आहे. वन्यजीवांच्या सान्निध्यात राहण्याची सवय जडल्याने त्यांना आजही कुठेही गेलं तरीही मालदेव आठवत राहतं. याच आठवणीतूनच त्यांनी (दि. १ ऑक्टोबर, २०१८) मालदेवकडे कूच केली आणि ट्रेकदरम्यान आमची-त्यांची भेट घडली. ट्रेकच्या दिवशी पहाटे आमच्या सौभाग्यवतीने बनवून सोबत दिलेले ‘कांदेपोहे’ शामरावांना खाऊ घालताना आम्हाला जो आत्मिक आनंद मिळाला तो शब्दातीत! ‘वाघ आता म्हातारा झालाय, आता त्याला किंमत उरली नाही’, हे त्यांचे वाक्य ऐकून मनाला वेदनाही झाल्या. जंगली श्वापदांची शास्त्रीय माहिती बाजूला ठेवून शामरावांना विविध प्रश्न विचारून ‘खरं जंगल’ जाणून घेण्याचा अनेकांचा शिरस्ता आम्हीही पाळला. मालदेव हे ठिकाण सातारा जिल्ह्यापासून ९७ किमी, तर जावळी ९२ किमी अंतरावर आहे. ७३४ हेक्टर क्षेत्र असलेल्या कोअरझोनमध्ये असलेल्या मालदेवात आता मनुष्य वस्ती नाही. ‘शामराव’ मात्र आजही या भागात अधून-मधून भटकताना दिसतात. या भागात उंबर, अंजन, कढीपत्ता, शिकेकाई, वावडिंगची झाडे, रानगवे, अस्वल, जंगली कुत्रे, रानडुक्कर, बिबट्या, कोल्हा आदि वन्यजीवांचे अस्तित्त्व आहे. अरण्यसहवासासाठी ‘मालदेव’ उत्तम आहे. शामराव कोकरेंचे वास्तव्य राहिलेल्या वाड्यानजीक एक पुरातन जांभ्या दगडाची बांधीव चौकोनी विहीर (घोडेबाव) असून तीत उतरण्यास रूंद पायऱ्या आहेत. मुख्य मंदिरात चार कोनाड्याचे छप्पर असून भैरव व देवीच्या मूर्ती आहेत. कोयना धरणाचे बॅकवॉटर पसरलेल्या बामणोली गावातूनही बोटीने मालदेवला जाता येते. हा परिसर कोअरझोन (अतिसंवेदनशील) असल्याने येथे जाण्यास मज्जाव आहे.

 

‘मनुष्याला अरण्यवाचन आल्यासच ‘जंगले’ टिकतील’ ही नामवंत वन्यजीव अभ्यासक निलेश बापट यांची भूमिका ट्रेकमध्ये त्यांच्याच तोंडून ऐकण्यातला आनंद काही औरच! ‘ग्लोबल चिपळूण पर्यटन’चे अध्यक्ष श्रीराम रेडीज यांनी आपली संपूर्ण शारीरिक क्षमता पणाला लावून हा ट्रेक पूर्ण केला. हे पाहून त्यांना ‘सलाम’ करावासा वाटला. आज पर्यटनाचा ट्रेण्ड बदलतोय. लोक त्याच-त्याच पर्यटनाला कंटाळलेत. शहरातील जगण्यातील हिरवाईची उणीव भरून काढण्यासाठी पर्यटकांची पावलं निसर्ग सफरींकडे वळू लागलीत. पर्यटकांना जंगलातला भन्नाट रानवारा शीळ घालतोय. जंगलातील, आडरानातील वाटा खुणावू लागल्या आहेत. म्हणूनच नेचरट्रेल्स, जंगल सफरींना प्रतिसाद मिळतो आहे. महत्त्वाचे म्हणजे सर्व वयोगटातील निसर्गप्रेमी तिथं जाताना दिसत आहेत. ट्रेकिंग करताना मानवाच्या शारीरिक क्षमतांचा कस लागतो. अनेकदा ‘शरीर अजून सुदृढ बनवायला हवं, खाण्यापिण्यावर नियंत्रण गरजेचंअसल्याची जाणीवही होते. वयाच्या चाळीशीत थोडंस चालल्यानंतर पाय दुखायला लागले, तर आपल्या शरीराच्या सूचना आपल्यालाच मिळत जातात. ट्रेक करताना नुसतेच काय डोंगर चढता आणि उतरता? हा पूर्वीचा खोचक प्रश्न आता कमी झाला आहे. ट्रेकिंगमध्ये निसर्गातील अनेक घटकांशी मुक्तपणे संवाद करता येतो. अनेक सहकाऱ्यांशी जुळवून घेत जीवनाची शिस्तबद्ध हालचाल करता येते. डोंगरात वर चढताना श्वासांची क्रिया जलद होते, त्यामुळे पूर्ण श्वासोच्छ्वासाची जलद प्रक्रिया घडते. रक्तप्रवाह वाढतो, रक्ताभिसरणाची क्रिया जलद होते. प्रसंगी शीरांतील, नसांतील ब्लॉकेज निघतात. ब्लड-प्रेशरचा त्रास कमी होतो. गुडघे, पायांवर ताण येऊन स्नायू उत्तेजित होतात. चढ चढताना दम भरल्याने फुफ्फुसे पूर्ण क्षमतेने ऑक्सिजन आत घेतात आणि बाहेर सोडतात. गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध चालल्याने कधीकधी डिहायड्रेशनमुळे शरीरातील पाणी पातळी कमी होते मात्र, इप्सित ठिकाणी पोहोचल्यावर झरा, तळी, पावसाचे अतिशुद्ध पाणी प्यायल्याने शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमालीची वाढते. शरीरातील चरबी कमी होते. मन प्रसन्न करणाऱ्या, निसर्गाची मुक्तहस्त उधळण असलेल्या वातावरणाने ताण-तणाव दूर होण्यास मदत होते. ट्रेकिंगमुळे श्वसन, रक्तप्रवाह, गुडघे, छाती, पोट आणि मानसिक मानसिक आजारांचे प्रमाण कमी होते. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा स्वतः खात्री केव्हाही श्रेयस्कर! निसर्गावर मात करू पाहणाऱ्या जीवनशैलीने आम्हाला गेल्या शतकात हृदयरोग आणि चालू शतकात कर्करोग ‘दान’ केला आहे. यामुळे मनुष्य नावाचा भारतीय प्राणी निसर्गाकडे, निसर्ग सहवासाकडे, आयुर्वेदीय संकल्पनांकडे अतिशय सकारात्मक दृष्टीने पाहू लागला आहे. दैनंदिन टिपिकल घर ते ऑफिस जीवन जगणाऱ्या अनेकांना ट्रेकिंगचे महत्त्व पटल्याने डोंगरातील पदभ्रमणहा साहसी पर्यटन प्रकार आता सामान्य पर्यटकांत रुजतो आहे. ट्रेकिंग, मॅरेथानसारख्या उपक्रमांना सामान्यजनांचा प्रतिसाद वाढतो आहे. शहरात खाण्यावर वाट्टेल तसा आडवा-उभा ताव मारत, अरबट-चरबट खाणं शरीराला लवकर थकवतं आणि डोंगर-दऱ्यांमधील पाऊलवाटांवरून चालताना हे जाणवतं. या बाबतच्या वाढत्या जाणीवांमुळे ‘पर्यटक’ म्हणवणारा एक वर्ग ‘ट्रेकिंग’कडे वळतो आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील महाबळेश्वर ते आंबा घाटादरम्यान वन्यजीव विभागाने आठ ‘हॉट स्पॉट’नजीकच्या बफर झोनचे दरवाजे नुकतेच उघडल्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या ‘ट्रेक’ला मिळालेला प्रतिसाद त्याचेच द्योतक आहे. तेव्हा ‘ग्लोबल चिपळूण पर्यटन’ संस्थेने सुरू केलेल्या या ‘ट्रेक’चा आनंद घ्यायला तुम्हीही या! इथला सह्याद्री तुमचे स्वागताला सज्ज आहे!

 

-धीरज वाटेकर

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@