पळवून नेले तरी रावणाने सीतेच्या चारित्र्याला धक्का लावला नाही, हे रावणाचे मोठेपण अधोरेखित करणारा समाज आपला. नारीला थेट दुर्गा-लक्ष्मीचा दर्जा देत देवत्व बहाल करणारा अन् तिला ‘ताडन के अधिकारी’ ठरवणाराही हाच समाज. स्त्रियांनी फार सोशीक असणे, जे काही घडेल ते गुमान सहन करणे, अन्याय असला तरी तिने त्याची कुठे वाच्यता करू नये, एवढेच उर्वरितांना अपेक्षित. तीच परंपरा, त्याच संस्कारातून जडणघडण होत गेल्याने, सर्वदूर तोच कित्ता गिरवला जातोय्. अशात कुणी स्वत:वरील अन्याय जगजाहीर करण्याचा प्रयत्न केला, तर त्यालाच आरोपीच्या पिंजर्यात उभे केले जाणार नाही, याची शाश्वती ती नाहीच. लक्ष्मणरेषा फक्त स्त्रीजातीसाठीच असल्याचा समज करून बसलेल्यांच्या गर्दीत याहून वेगळेे काय घडणार?
तशी जगाच्या पाठीवर ही चळवळ अस्तित्वात येऊन आता एक तप मागे पडले आहे. महिलांवरील लैंगिक अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करण्याचा हा प्रयोग गेल्या वर्षी अधिक प्रचलित झाला. तसा तो सुरू त्यापूर्वीच झाला होता. हार्वे विन्स्टिन या हॉलीवूडच्या एका बड्या निर्मात्याकडून आलेल्या अनुभवाविरुद्ध जाहीरपणे आवाज उठविण्याची सुरुवात, अमेरिकेतील सामाजिक कार्यकर्त्या तराना बुर्के यांनी 2006 मध्ये केली. त्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला. चळवळीला- ‘मी सुद्धा’- ‘मी टू’ असे नामाभिधान लाभले. पण, गेल्या वर्षी अमेरिकन सिनेजगतातील कलावंत अल्यासा मिलानो यांनी ती लौकिकार्थाने रूढ केली. आणि मग तिथल्या हाय प्रोफाईल कलावंतांकडून या चळवळीचा वापर सुरू झाला. भारतातील त्या प्रयोगाची सुरुवात तशी परवापरवाचीच.
भारतीय समूहाला स्त्रियांवरील अत्याचाराचे तसे अप्रूप नाहीच. अंगवळणी पडलेला आणि सर्वांनीच गृहीत धरलेला तो प्रकार असल्याने, इथे त्याचे आश्चर्य नाहीच. खरंतर पाश्चात्त्य देशांच्या तुलनेत संस्काराची भाषा आम्ही अधिक बोलतो. पण, एकमेकांच्या भावनांचा सन्मान राखण्यात त्यांचा जास्त पुढाकार आहे. खुले विचार आणि वर्तणुकीसंदर्भात आमच्या तुलनेत ते कितीतरी पुढे गेलेत, पण तरीही समोरच्या व्यक्तीच्या सहमती, अनुमतीला त्यांच्यालेखी अधिक महत्त्व. मुलींची छेड काढण्यात इथे कुणाला काय गैर वाटते? आमबात आहे आमच्यासाठी ती. पण तिकडे, त्यामुळे कुणाच्या भावना दुखावू शकतात, याचीही नोंद घेण्याची तजवीज आहे कायद्यापलीकडेही. बहुधा त्याचमुळे की काय, पण नवरा आज फार मोठ्याने ओरडला आणि त्यामुळे आपण दुखावलो गेलो, एवढे कारणही पुरेसे ठरते पोलिसांकडे तक्रार दाखल करायला. भारतीय समाजाला हास्यास्पद वाटावा असा हा प्रकार.
मुळातच इतरांच्या भावनांची किंमत राखणे, समोरच्या व्यक्तीच्या होकार-नकाराची दखल घेणे, त्याचा सन्मान करणे, ही सारी तर सभ्य समाजाची लक्षणे. मुक्त जीवनाकडे कल असलेल्या पाश्चात्त्य संस्कृतीतील लोकांना त्याचे महत्त्व समजले, उमजले आणि नेमके आम्ही मात्र त्यात कमी पडलो. स्त्री ही ‘वापरण्याजोगी’ वस्तू असल्याचा दिवसागणिक बळावत चाललेला गैरसमज हा त्याचाच परिणाम. चित्रपटात एखाद्याला काम देणे हा त्याच्यावरील उपकाराचा भाग असून, त्या उपकाराची परतफेड करणे हे त्याचे कर्तव्यच असल्याच्या भावनेतून महिला कलावंताचा निर्मात्याकडून होणारा लैंगिक छळ असो, की मग हाताखाली नोकरी करण्याची संधी प्रदान करण्याच्या मोबदल्याची अपेक्षा ठेवून कुणाचे वागणे असो, उपभोगवादाचे सारे परिणाम भारतीय समाजालाच भेडसावताहेत की काय, असे वाटू लागले आहे आताशा.
पद, हुद्दा, पत, पैसा या दृष्टीनं मोठी असलेली माणसंही खूप खालच्या स्तराला जाऊन वागतात अनेकदा. त्याविरुद्ध आवाज उठवणं तितकंसं सोपंही नसतं. शिवाय जगण्याच्या विवंचनेच्या चौकटीत बंदिस्त झालेल्या अस्तित्वाच्या लढाईचा मुद्दाही असतोच. अशा वेळी कुणी मर्जीविरुद्ध वागलं, लगट केली, डिमांड केली वगैरे सारखे मुद्दे गौण ठरतात. बर्याचदा, समोरच्या व्यक्तीची ‘मोठी’ प्रतिमाही आडवी येते. तक्रार केली तरी ती बेदखल राहते. समोरच्यावर कारवाई होण्यापेक्षाही निंदा-नालस्ती आपल्याच वाट्याला येण्याची शक्यता बळावते. चूक कुणाची, हे जाणून न घेताच समाजही त्या बड्या माणसाच्या पाठीशी ठामपणे उभा राहतो. म्हणूनच पीडितांकडूनही अनेकदा, चूप राहण्याचा ‘सोपा मार्ग’ निवडला जातो. कित्येकदा समाजस्वास्थ्याचा विचारही असतो त्यामागे. आताही संधी मिळताच, किंवा कुणीतरी सुरुवात केल्याने बळ एकवटल्यावर ज्या पद्धतीने चित्रपट आणि इतर विविध क्षेत्रांमधून महिलांचा आक्रोश व्यक्त होतोय्, त्यावरून या समस्येची तीव्रता ध्यानात यावी. असे तेव्हाच घडू शकते, जेव्हा सभोवतालच्या परिस्थिती व समस्यांपलीकडे जाऊन एक स्त्री स्वत:चे अस्तित्व मोठे मानते. त्याला महत्त्व देते.
एरवी परक्या पुरुषांच्या स्पर्शातला, नजरेतला भाव ओळखण्याची ताकद तिला निसर्गानेच प्रदान केली आहे. पण कित्येकदा, अनुमती देण्याचे किंवा नाकारण्याचे तिचे अधिकार एकतर गृहीत धरले जातात, किंवा मग पायदळी तुडवले जातात. बाहेरच्यांसोबतच घरच्या, जवळच्या, नात्यातल्या लोकांकडून मांडला जाणारा छळवादही तितकाच बोचरा असतो. बाहेर, कामाच्या ठिकाणी सहन करावा लागणारा प्रकारही कष्टप्रद आहे. समाजाची सारीच क्षेत्रं त्यानं कशी व्यापली आहेत, ही कालपर्यंत लपून राहिलेली, दबक्या आवाजात बोलली जाणारी बाब यानिमित्ताने उघडपणे मांडली जाऊ लागली आहे, एवढंच.
मुळात या प्रकरणात सर्वांचंच प्रबोधन होण्याची गरज आहे. नकाराधिकाराचा वापर करण्याचे बळ एकवटण्याची बाब जशी महिलावर्गाने अंगीकारण्याची आवश्यकता आहे; तसेच मुक्त समाजजीवनाच्या संकल्पनेतही एखाद्याच्या नकाराचा सन्मान करण्याचे मोठेपण पुरुषांनीही अंगी बाणवले पाहिजे. माध्यमांच्या प्रबोधनाची तर नितान्त निकड आहे. एखाद्या सामूहिक बलात्काराची बातमी तयार करताना त्यात भडकपणा किती आणायचा, घटनेचे रसभरीत वर्णन किती करायचे, बातमी विस्तृत किती करायची, याचे समाजभान सुटत चालल्यानेही काही प्रश्न नव्याने निर्माण होताहेत अलीकडे. समाजस्वास्थ्याशी काहीच घेणेदेणे नसल्याने त्यांचे बेताल वागणे तसेच सुरू आहे. या पार्श्वभूमीवर या नव्या चळवळीचा खेळ होऊ नये, बस्स! आता, संधी उपलब्ध झाली म्हणून स्वत:चे मार्केटिंग करून घेण्यासाठी कुणी या चळवळीचा गैरवापर करू नये ही बाब तर आहेच, पण समाजाने, खरोखरीच बोध घ्यावा अशी ही चळवळ आहे- मी टू...