नवी दिल्ली : काही दिवसापूर्वीच सरन्यायाधीशपदाची सूत्रे हाती घेतलेले न्यायमूर्ती रंजन गोगोई यांनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी ‘नो लीव्ह’ फॉर्म्यूला सुरु केला असून यामुळे न्यायाधीशांना कामकाजांच्या दिवशी सुट्टी घेता येणार नाही. न्यायालयात प्रलंबित असणाऱ्या प्रकरणांचा बोजा कमी करण्यासाठी सरन्यायाधीश गोगोई यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. न्या. गोगोई यांनी ३ ऑक्टोबर रोजी सरन्यायाधीपदाची शपथ घेतली होती. अवघ्या दहा दिवसांमध्येच त्यांनी हा मोठा निर्णय घेतला.
देशात सध्या तीन कोटींपेक्षा जास्त प्रकरणे न्यायपालिकेत प्रलंबित आहेत. यामुळे न्यायव्यवस्था व नागरिकांवर याचा परिणाम होतो. या गोष्टीची जाण असल्यानेच सरन्यायाधीश गोगई यांनी सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि ट्रायल कोर्टमधील प्रलंबित प्रकरणांचा प्रश्न लवकरच निकाली लावला जाईल असे संकेत दिले होते. त्यानंतर त्यांनी लगेच नो लीव्ह’ हा फॉर्म्यूला सुरु केला.
दरम्यान, उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना कामकाजात कामचुकारपणा करणाऱ्या न्यायाधीशांना कामकाजातून वगळण्याच्या सूचना सरन्यायाधीशांनी दिल्या आहेत. तसेच न्यायालयाच्या कामकाजादरम्यान जे न्यायाधीश शिस्तीचे पालन करत नाहीत अशांची सर्वोच्च न्यायालय स्वत: दखल घेऊन कारवाई करेल असे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करताना आश्वासन दिले.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/