सरसंघचालकांवर ‘मोक्का’ लावण्याची मागणी लोकशाहीत करता येणे शक्य आहे. पण, ज्या नक्षल्यांचे समर्थन प्रकाश आंबेडकर करतात त्यांच्याकडे असलेल्या शस्त्रास्त्रांचे काय?
खरे तर आंबेडकरी चळवळीने समाजाला नेतृत्व करणा-या अनेक व्यक्ती दिल्या. केवळ राजकीयच नव्हे, तर सामाजिक आणि साहित्यिक क्षेत्रातही आंबेडकरी चळवळीने नवे प्रवाह निर्माण केले. रामदास आठवले, राजा ढाले, नामदेव ढसाळ ही यापैकीच काही नावे. नाकारता न येणा-या अन्यायातून निर्माण झालेली वेदना आणि वेदनेच्या सच्चाईतून निर्माण झालेल्या परिस्थितीत झगडण्याची ताकद, ही खरी आंबेडकरी चळवळीतील ऊर्जा. खुद्द बाबासाहेब आंबेडकरांनी जे केले तोदेखील एक प्रकारचा विद्रोहच होता. मात्र, बाबासाहेबांना मार्क्सपेक्षा बुद्ध जवळचा वाटला. बाबासाहेबांची स्वत:ची क्षमता इतकी अफाट होती की, संपूर्ण देशाला एकत्र बांधणारी घटना त्यांनी आपल्या सहकार्यांच्या साहाय्याने निर्माण केली. बाबासाहेब विद्रोही होतेच. गांधीजींनी जो संघर्ष दक्षिण आफ्रिकेत केला, त्याच प्रकारचा संघर्ष बाबासाहेबांना दुर्दैवाने आपल्याच समाजात व देशात करावा लागला. बाबासाहेब लढले, मात्र सनदशीर मार्गाची कास त्यांनी कधीही सोडली नाही. त्यांनी हिंसेचा मार्ग चुकूनही अवलंबिला नाही आणि हिंसेचे समर्थनही कधी केले नाही. आंबेडकरांच्या अंगभूत क्षमता आणि पयार्र्य देण्याची ताकद हेच यामागचे खरे कारण. हा सगळा संदर्भ पुन्हा देण्याचे कारण म्हणजे, बाबासाहेबांशी रक्ताचे नाते सांगणा-या आणि त्यांचेच आडनाव लावणा-या प्रकाश आंबेडकरांनी जे क्लेषकारक उद्योग चालविले आहेत ते.
बाबासाहेबांनी मार्क्स नाकारला होता. प्रकाश आंबेडकर माओवाद्यांचे समर्थक झाले आहेत. ‘भारत के तुकडे’ फेम जेएनयु गँगलाही प्रकाश आंबेडकरांचे खुले समर्थन आहे. लोकशाहीत मोर्चे काढायला हरकत नाही. सरकार बनवून आपली धोरणे राबवायला लोकशाहीतच वाव आहे, पण सरकार उद्ध्वस्त करण्याचे स्वप्न पाहणा-या नक्षल्यांचे समर्थन करायचे आणि लोकशाही मार्गाने निवडून येऊन पंतप्रधान होण्याचे स्वप्नही पाहायचे, अशा दोन गोष्टी एकाच वेळी करण्याचे उद्योग केवळ आणि केवळ प्रकाश आंबेडकरच करू शकतात. डावे, उजवे आणि भांडवलवाद याच्या पलीकडे जाऊन बाबासाहेब आंबेडकरांनी आंबेडकरवादी विचारांचा एक विचारप्रवाह निर्माण केला. दुर्दैवाने बाबासाहेबांनंतर या समाजाला बाबासाहेबांइतके प्रभावी नेतृत्व लाभले नाही. ज्यांच्या हाती थोड्याफार सत्तेची पदे आली त्यांनीही प्रस्थापित राजकीय पक्षांच्या वळचणीला जाऊन उभे राहण्यातच धन्यता मानली. प्रकाश आंबेडकरांना सत्तेच्या पाय-या कधीच चढता आल्या नाहीत. मात्र, त्यांनी जे केले आहे त्यापेक्षा उफराटे अन्य काहीच असू शकत नाही. माणूस विद्वान असूनही योग्य दिशेने लढण्याची क्षमता नसल्याने प्रकाश आंबेडकर राजकीय क्षितिजावर धडपडतच राहिले. ज्या रिकामटेकड्या डाव्यांचा आज त्यांना आधार वाटतो, ती मंडळी निव्वळ पोकळ आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे यांच्याकडे लोकांच्या कुठल्याही प्रश्नासाठी लढण्याची तयारी नाही. मुद्दे नाहीत. कार्यकर्ते नाहीत. यांची सगळीच लढाई लुटूपुटूची असते. आंबेडकरी चळवळीतून जसा एक निराळा विचार नाणावला, तसेच स्वातंत्र्योत्तर काळात आपल्या देशात डाव्या विचारांची माणसेही उभी राहिली होती. यात डांगे होते, रणदिवे होते. मतांशी फारकत घेतली तरी त्यांचे योगदान नाकारता येत नाही. आता मोदी, संघ व ब्राह्मण यांच्याविरोधात जो अधिकाधिक गरळ ओकू शकतो, तो डाव्यांचा ‘मसीहा’ होतो. असा कुणी सापडला रे सापडला की, डावे देवदूत भेटल्याप्रमाणे आनंदतात. प्रकाश आंबेडकरांचे सगळे साथी तसेच आहेत, त्यामुळे त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार?
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/