ठाणे: जिल्ह्यासह राज्यात ‘स्वाईन फ्लू’ ची साथ दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांत या आजाराच्या रुग्णांत वाढ झाली आहे. तसेच या आजारामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे. मागील दहा दिवसांत ठाणे शहरात स्वाईन फ्लूने दोघांचा तर जिल्ह्यात आतापर्यंत चौघांचा बळी घेतला आहे. यामुळे सणासुदीच्या दिवसांत जिल्ह्यावर स्वाईन फ्लूचे सावट निर्माण झाल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
ठाणे जिल्ह्यात यावर्षी सप्टेंबर महिन्यापर्यंत बाधितांचा आकडा ५७वर गेला असून, ठाण्यात १४, कल्याण शहरात १४, नवी मुंबईत १८, तसेच मीरा-भाईंदरमध्ये ११ बाधित आहेत. उल्हासनगर, भिवंडीत एकही रुग्ण आढळलेला नाही. जिल्ह्यात स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने, आतापर्यंत १ लाख, ६ हजार, ७९४ जणांनी फ्लूची तपासणी केलेली आहे. दरम्यान स्वाईन फ्लूमुळे ठाणे महानगरपालिका हद्दीत गेल्या दहा दिवसांमध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. यात एक महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे.
स्वाईन फ्लूची लक्षणे
या आजाराची लक्षणे प्रामुख्याने सामान्य तापासारखीच असतात
* थंडी वाजून ताप येणे
* सर्दी, खोकला
* अंगदुखी, डोकेदुखी
* मळमळणे, अतिसार ही लक्षणे असू शकतात
स्वाईन फ्लूपासून बचाव कसा कराल?
* तोंडावर मास्कचा वापर करा
* वारंवार आपले हात साबणाने स्वच्छ धुवावेत
* गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा
* स्वाईन फ्लूची लागण झाल्यास त्वरित रुग्णालयात दाखल व्हा
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/