अमिताभ बच्चन हे एकाचवेळी त्यांच्या दोन्ही हातांनी सुवाच्छ हस्ताक्षरात लिखाण करू शकतात.
अमिताभ यांचे वडील हरिवंशराय बच्चन हे त्यांचे नाव ‘इन्कलाब’ ठेवणार होते. इन्कलाब याचा अर्थ क्रांती असा होतो. परंतु नंतर त्यांचे अमिताभ असे नाव ठेवण्यात आले. अमिताभ म्हणजे ‘अमर्यादित चमक असणारा’ आणि अमिताभ हे आज अगदी त्यांच्या नावाच्या अर्थाला साजेशे असेच जगभरात अमर्याद चमकत आहेत.
अमिताभ यांची इंजिनियर व्हायची इच्छा होती. तसेच भारतीय वायूसेनेत भरती होऊन देशसेवा करण्याचाही त्यांचा विचार होता. पण आज ते देशातील एक महत्वपूर्ण व्यक्ती आहेत. देशभरातील लोक अमिताभ यांचा आदर करतात.
करिअरच्या सुरुवातीच्या खडतर काळात अमिताभ यांना मरिन ड्राइव्हच्या एका बाकड्यावर काही रात्री राहावे लागले होते. आज अमिताभ यांची अमाप संपत्ती आहे. मुंबईतील त्यांचे जलसा हे निवासस्थान पाहण्यासाठी अनेकांची गर्दी होते. पण अमिताभ यांनी आपले पाय अजूनही जमिनीवर ठेवले आहेत याचा प्रत्यय त्यांच्यातील विनम्रपणा पाहून येतो.
‘खुदा गवाह’ या सिनेमाच्या चित्रिकरणाच्या वेळी अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनी अमिताभ यांच्या सुरक्षेसाठी आपल्या देशाचे अर्धे हवाई सैन्य तैनात केले होते. ‘खुदा गवाह’ हा सिनेमा अफगाणिस्तानमध्ये आजवर सर्वाधिक पाहिला गेलेला भारतीय सिनेमा आहे.
अमिताभ आणि त्यांच्या पत्नी जया भादुरी यांची पहिली भेट ही पुण्यात ‘फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्युट ऑफ इंडिया’ येथे झाली होती. त्यानंतर गुड्डी सिनेमाच्या सेटवर ते पुन्हा भेटले.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/