विमाने आणि क्षेपणास्त्रे : संहारक कोण ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |
 
 

विमानांचा युद्धात वापर झाला, त्याला शंभर वर्षे उलटून गेली आहेत. ‘मिग’ आणि ‘सुखोई’च्या पाठोपाठ भारतीय हवाई दलात आता ‘राफेल झुंजी’ विमान येणार आहे. नुकताच ८ ऑक्टोबरला वायुसेना दिवस पार पडला आहे. त्यानिमित्ताने...

 

बॅलेस्टिक मिसाईल्स’ किंवा ‘आंतरखंडीय प्रक्षेपणास्त्र’ हा शब्द आपण वाचलाच असेल. कितीही दूरचे ठिकाण उद्ध्वस्त करण्याची क्षमता असलेल्या या दीर्घ पल्ल्याच्या अस्त्रांवर अर्थातच आण्विक स्फोटके बसवलेली असतात. शीतयुद्ध काळात सोव्हिएत रशिया आणि अमेरिका या दोन्ही महासत्तांनी परस्परांच्या प्रदेशावर इतकी प्रक्षेपणास्त्रे रोखून ठेवली होती की, अमेरिकेचा अध्यक्ष दोन मिनिटांच्या अवधीत फक्त एक बटण दाबून सोव्हिएत प्रदेश खाक करू शकतो, असे म्हटले जाई. सोव्हिएत अध्यक्षही हेच करण्याची क्षमता बाळगून होता. सर्व आण्विक प्रक्षेपणास्त्र तळांना ’फायर’ची सूचना देणारे हे बटण किंवा ’रिमोट कंट्रोल’ अमेरिकन अध्यक्ष सतत स्वत:बरोबर एका ब्रीफकेसमध्ये बाळगून असत. हे झाले दीर्घ पल्ल्याच्या प्रक्षेपणास्त्रांबाबत, पण कमी पल्ल्याची, जमिनीवरून जमिनीवर मारा करू शकणारी, हलकी प्रक्षेपणास्त्रे शोधून काढण्यासाठी सर्वच देशांच्या लष्करी प्रयोगशाळा खूप प्रयत्नशील होत्या. अत्यंत अभिमानाची गोष्ट अशी की, भारताने ‘अग्नी’ आणि ‘पृथ्वी’ या प्रक्षेपणास्त्रांचा शोध लावून, त्याची यशस्वी चाचणी घेऊन या क्षेत्रात बाजी मारली.

 

या शोधामुळे लष्करी क्षेत्रात खळबळ उडाली. काही तज्ज्ञांच्या मते, भारताकडे एक प्रभावी हत्यार आले, एवढ्यापुरतीच ही खळबळ मर्यादित नसून, एकूणच क्षेपणास्त्रांमुळे विमान दलाचे निर्णायक महत्त्व कमी होणार की काय, अशी ही भीती आहे. भारतीय क्षेपणास्त्रं अजून प्रत्यक्ष रणांगणात कसाला लागलेली नाहीत, पण आखाती युद्धात पर्शिंग, क्रूझ, टॉमहॉक या अस्त्रांनी हाहाकार माजवला. अफगाण युद्धात तालिबान सैनिक खांद्यावरून क्षेपणास्त्रे घेऊन आगेकूच करतानाची दृश्ये आपण पाहिली. जे काम आतापर्यंत बॉम्बफेकी विमानं करत होती, म्हणजे शत्रूच्या लष्करावर जबरी बॉम्बवर्षाव करून आपल्या लष्कराला मार्ग मोकळा करणे, ते काम आता जर लवकरच क्षेपणास्त्रांच्या मदतीने करू शकत असेल, तर विमानांचे महत्त्व साहजिकच कमी होणार. या प्रश्नाचा निर्णायक फैसला तसा अजून झालेला नाही. कारण, आखाती युद्धात सद्दाम हुसेनची शक्ती चिमूटभर आणि अमेरिकेची घागरभर, असाच प्रकार झाला. सामना तुल्यबळ नव्हता. प्राचीन भारतात रथदल, अश्वदल, गजदल आणि पदाती म्हणजे पायदल असे चतुरंग दल असे. आधुनिक लष्करी इतिहासकारांच्या मते ’रिकीब’ या वस्तूचा शोध युरोपात किंवा मध्य पूर्वेत लागला आणि त्यामुळे तुर्की आक्रमकांचे सैन्य हे अत्यंत वेगवान बनले. ‘रिकीबी’च्या साहाय्याने घोड्यावर उभे राहून तुर्की सैनिक शत्रूवर बाणांचा वर्षाव करू शकत. झपाट्याने आक्रमण किंवा माघार घेऊ शकत, अल्पावधीत मोठी दौड मारू शकत. त्यांच्या या झपाट्यामुळेच हिंदूंची सैन्ये पराक्रमी असूनही पराभूत झाली. प्रथम शहाजीराजे भोसले आणि नंतर अर्थातच शिवाजीराजे यांनी गतिमान अश्वदलाचे हे तंत्र तुर्कांकडून उचलले आणि त्याच्या जोरावर त्यांनाच खडे चारले. गतिमान अश्वदलाच्या या परिणामकारकतेमुळे जगभरच्या प्रत्येक सैन्यात घोडदळ असायचेच. शत्रूची फळी फोडण्याचे काम प्रामुख्याने हे घोडेस्वारच करायचे. हे तंत्र कुठपर्यंत चालू होते? थेट पहिल्या महायुद्धापर्यंत. तसे विमान बनविण्याचे प्रयत्न गेल्या शतकापासूनच युरोप, अमेरिकेतले अनेक संशोधक करत होते. अमेरिकेच्या राईट बंधूंनी या प्रयत्नात मोठा पल्ला मारला. १९०३ साली त्यांनी आपल्या विमानातून ८५१ फुटांची झेप घेतली. याच विमानात सुधारणा करत करत १९०८ साली त्यांनी अत्युत्तम, दोषरहित असे विमान बनवले.

 

हा शोध एकूण मानवी विकासाच्या दृष्टीने क्रांतिकारक होताच, पण सामाजिकदृष्ट्या तर तो युगप्रवर्तक होता. १९११-१२ साली इटलीने त्रिपोलीत तुर्कांवर स्वारी केली. तेव्हा विमानांचा पहिला लष्करी वापर इतिहासात नोंदला गेला. गंमत म्हणजे इटलीसारख्या दुय्यम दर्जाच्या राष्ट्राने विमानं वापरली, पण इंग्लंड, फ्रान्स आणि जर्मनी ही जी युरोपातली श्रेष्ठ राष्ट्रे, त्यांना विमानांचे काहीच महत्त्व वाटले नाही. पहिल्या महायुद्धाच्या पूर्वी काही काळ फ्रेंच सेनापती जनरल फर्डिनांड फॉक याने विमानांच्या कसरती पाहिल्या, त्याची त्यावर प्रतिक्रिया अशी की, “खेळ म्हणून हे ठीक आहे, पण प्रत्यक्ष युद्धाच्या दृष्टीने ही यंत्रे निरुपयोगी आहेत.” जर्मन सेनापती जनरल एरिक लुडेडॉर्क याचेही हेच मत होते. कापडाने वेढलेले पंख आणि तारांचा गुंताडा हे तत्कालीन विमानाचे स्वरूप त्याला अजिबात आवडत नसे. एकोणिसाव्या शतकाप्रमाणेच घोडदळच शत्रूची आघाडीवरची फळी फोडणार याची दोन्ही बाजूच्या सेनापतींना खात्री होती. १९१४ साली महायुद्ध सुरू झाले. यावेळी जर्मनीकडे ४६ विमाने होती, तर इंग्लंडकडे ४८ आणि फ्रेंचांकडे १३६ होती. या विमानांनी बॉम्बफेक केली का? छे! असे करता येईल, हेच कोणाच्या डोक्यात आले नाही. दोन्ही बाजू या विमानांचा वापर शत्रूच्या प्रदेशाच्या टेहळणीसाठीच फक्त करायच्याटेहळणी करताना दोन प्रतिस्पर्धी विमाने समोरासमोर आली तर काय घडायचे? शोल्टो डग्लस हा ब्रिटिश वैमानिक १९१४ साली आपल्या विमानातून नू शॅपेल भागात छायाचित्रे घेत होता. अचानक एक जर्मन विमान त्याच्या विमानाच्या खालच्या बाजूस शंभर यार्डावर आले. डग्लसकडे बॉम्ब किंवा मशीनगन सोडाच, साधे पिस्तूलही नव्हते. डग्लस लिहितो, ”मी जर्मन वैमानिकाकडे पाहून मैत्रीदर्शक हात हलवला. त्यानेही तसाच प्रतिसाद दिला आणि आम्ही आपापल्या दिशेने निघून गेलो. माझ्या या वागण्यात काही हास्यास्पद होते, असे मला त्यावेळी वाटले नाही.” हा शोल्टो डग्लस-पुढे दुसर्‍या महायुद्धात एअर मार्शल बनला. ही अर्थात युद्धाच्या अगदी सुरुवातीची गोष्ट झाली. स्थिती झपाट्याने बदलली. दोन्हीकडचे वैमानिक स्वतःबरोबर एक बंदूक बाळगू लागले. विरोधी वैमानिकाला ठार करणे, एवढेच त्यांचे उद्दिष्ट असायचे. वैमानिक मेला की विमान आपोआपच कोसळायचे. १९१५ सालच्या फेब्रुवारीत रोलें गॅरों या फ्रेंच वैमानिकाने सर्वप्रथम आपल्या विमानात मशीनगन बसवली. युद्ध जसजसे लांबत चालले तसतशी विमानाच्या क्रांतिकारकत्वाची जाणीव सर्वच सेनापतींना झाली. त्याचप्रमाणे मशीनगनमुळे घोडदळाचा अपरिमित नाश झाला. मशीनगनच्या संहारक शक्तीसमोर घोडदळाची प्रहारक्षमता उणी पडली. परिणामी घोडदळ हा सेना विभाग कायमचा बंद झाला. आणखी एक गंमत म्हणजे विमानाचा शोध लागला अमेरिकेत, पण युद्धसमाप्तीला सर्वाधिक म्हणजे ३८५७ विमाने होती ती फ्रान्सकडे. त्याखालोखाल जर्मनीकडे २८०० होती आणि अमेरिकेकडे अवघी ७८० होती. पुन्हा त्यापैकी फक्त १९४ विमाने अमेरिकेत बनलेली होती. उरलेली अँग्लो-फ्रेंचांनी पुरवलेली होती.

 
 

दुसरे महायुद्ध सुरू झाले १९३९ साली. १९१८ ते १९३९ या २१ वर्षांच्या काळात विमानविद्येने अक्षरशः सगळ्या आकाशालाच गवसणी घातलेली होती. इंग्लंड, फ्रान्स, अमेरिका यांच्यापेक्षाही जर्मन विमान दल जास्त आधुनिक आणि सुसज्ज होते. एकदा युद्ध सुरू झाल्यानंतर सर्वच राष्ट्रांच्या विमान दलांनी आपली प्रहारक्षमता वाढवत नेली. तरीही ’बॅटल ऑफ ब्रिटन’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या लढाईत जर्मन विमानांनी घातलेला हैदोस आणि जपानी विमानांनी अमेरिकेच्या पर्ल हार्बर नाविक तळाचा केलेला विध्वंस या दोन घटना जास्त प्रख्यात आहेत. भारतापुरते बोलायचे तर १९६५ आणि १९७१ या दोन्ही भारत-पाक युद्धात पाकिस्तानची ‘मिराज’ आणि ‘रोवरजेट’ ही अत्याधुनिक विमाने विरुद्ध भारताची चिमुकली ‘नॅट’ विमाने हा लढा चांगलाच गाजला. माशीएवढ्या ‘नॅट’नी गरुडाएवढ्या ‘रोवरजेट’चा केलेला पाडाव हा संरक्षणतज्ज्ञांच्या मते चमत्कार होता. चमत्कार वारंवार घडत नसतात, हे लक्षात ठेवून, राज्यकर्त्यांनी पाकिस्तानच्या तोडीस तोड विमाने बनवायला हवीत, असा इशाराही तज्ज्ञांनी दिला होता. त्यामुळेच नेहमीच्या गलथान शैलीत का होईना, ‘मिग’ विमानांचा विकास सुरू झाला. तेवढ्या अवधीत अमेरिकेने ’एफ १६’ ही अत्यंत वेगवान विमाने विकसित केली. त्यावर तोड म्हणून भारताने ‘सुखोई’ ही रशियन विमाने आता आपल्या ताफ्यात भरती केली आहेत. एकीकडे विमानामध्ये अशा प्रकारे नव्यानव्या सुधारणा होत असताना, क्षेपणास्त्रेही विकसित होत आहेतच. विमाने ही अत्यंत प्रभावी असली तरी त्यांना लागणारे इंधन, त्यांची बांधणी, त्यांचे सुटे भाग, दुरुस्ती, उच्च प्रशिक्षित चालक या सगळ्याच गोष्टींचा खर्च नुसता प्रचंड नसून अवाढव्य आहे. शिवाय एक विमान निकामी होते म्हणजे अक्षरशः काही कोटी रुपये किंवा डॉलर्स पाण्यात जाणे. याउलट क्षेपणास्त्रे या प्रत्येक बाबतीत खूपच स्वस्त आहेत. त्यांच्यासाठी फार उच्च प्रशिक्षणाची गरज नसते, परिणामकारकताही प्रभावी असते. म्हणून तर ’एफ १६’ विमाने जवळ असूनही ‘पृथ्वी’ आणि ‘अग्नी’च्या यशाने पाकिस्तानचे धाबे दणाणले आहे. दुसरीकडे अमेरिकेच्या चिंतेचा विषय असा आहे की, जे संशोधक ‘पृथ्वी’ आणि ‘अग्नी’सारखी मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्रे बनवू शकतात, त्यांना ‘क्रूझ’ आणि ‘टॉमहॉक’ क्षेपणास्त्रे किंवा त्यापुढे जाऊन आंतरखंडीय क्षेपणास्त्रेे बनवणे अशक्य नाही. याचा अर्थ विमाने साफ मोडीत निघतील, असा नक्कीच नाही. नागरी वाहतुकीसाठी विमाने राहतीलच, पण सामरिकदृष्ट्या त्यांची कामगिरी कदाचित बॉम्बफेकीऐवजी पुन्हा एकदा फक्त निरीक्षणाची राहील. आगामी काळातल्या युद्धांमधून स्थिती हळूहळू स्पष्ट होत जाईल.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@