नवी दिल्ली : एटीएममधून एकावेळी काढता येणाऱ्या रकमेची मर्यादा स्टेट बँक ऑफ इंडियाने निम्म्याने कमी केली आहे. त्यामुळे जादा रक्कम काढणाऱ्या ग्राहकांची मोठी गैरसोय होणार आहे. स्टेट बँकेच्या एटीएममधून एकावेळी आणि दिवसभरात कमाल २० हजार रुपयांची मर्यादा ठेवली आहे. रक्कम काढण्यावरील ही मर्यादा ३१ ऑक्टोबरपासून लागू होईल. देशभरात एटीएमचा वापर मोठ्या प्रमाणात वाढतो आहे पण त्याचसह एटीएम संबंधित गुन्ह्यांचे प्रमाणही वाढते आहे. एटीएमचा पीन चोरी किंवा कार्ड क्लोनिंगद्वारे एटीएमच्या माध्यमातून चोऱ्या वाढल्याचे निदर्शनास आले आहे. या रोख रकमेच्या चोरीला आळा घालण्यासाठी स्टेट बँकेने हे पाऊल उचललले आहे. एटीएममधून काढत्या येणाऱ्या रकमेवर अधिकाधिक निर्बंध घालण्याचा आमचा प्रयत्न असून याआधी अनेक आंतरराष्ट्रीय बँकांनी एटीएमवर निर्बंध घालून फ्रॉड्सचे प्रमाण कमी केले आहे, अशी माहिती स्टेट बँकेतर्फे देण्यात आली आहे.