आज शंभर कोटी वार्षिक उलाढाल असलेल्या ‘अशिदा इलेक्ट्रॉनिक्स’चा जन्म हा प्रतिकूलतेतून झाला. ‘प्रतिकूल तेच घडेल आणि प्रतिकूलतेतही आहे अनुकूलता,’ अशी सावरकरांची वचने ज्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग होती, अशा भाऊ तथा मनोहर कुलकर्णी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाने व एस.डी. नाईक आणि सुनील कुलकर्णी यांच्या सहकार्याने ‘अशिदा’ नावाचा वटवृक्ष बहरला.
उद्योजकाचे नाव: सुनील कुलकर्णी
कंपनीचे नाव: अशिदा इलेट्रॉनिक्स प्रा. लि.
कंपनीचे उत्पादन: इलेक्ट्रिकल ट्रान्समिशन-डिस्ट्रिब्युशन
व्यावसायिक कार्यक्षेत्र: देशांतर्गत, आंतरराष्ट्रीय
वार्षिक उलाढाल: १०० कोटी
प्रेरणास्त्रोत: वडील - कै. मनोहर कुलकर्णी
कर्मचारी संख्या: ४०० हून अधिक
भविष्यातील लक्ष्य: आगामी ३ वर्षांत २०० कोटी
कोपरीतल्या सिंधी कॉलनीतील २३ क्रमांकाच्या इमारतीतील दीडशे फुटाची जागा, त्यात दहा-बारा कुटुंबसदस्यांसह एक अनोखं अस्तित्व बाळसं धरत होतं. १९७० साली इमर्जन्सी ट्यूबलाईटच्या उत्पादनाने प्रवास सुरू झाला. लोकलने लोहार चाळीतून सुटे पार्ट्स आणणे आणि घरातील सगळ्यांनीच लहान-मोठी जबाबदारी घेत ट्युबलाईट बनविणे, असा शिरस्ता. भाऊ १९६५-७० या काळात एका रेडिओ कंपनीत कामाला होते. तिथे असताना रेडिओची ट्रान्झिस्टर आवृत्ती ही भाऊंच्या प्रयत्नातून विकसित झालेली. मूलत: संशोधक स्वभाव व चिवट मेहनत याची देणगी भाऊंना होतीच. नंदुरबारसारख्या आदिवासी जिल्ह्यात मॅट्रीकपर्यंतचे शिक्षण आणि पुढे धुळ्यात डिप्लोमाचे त्यांचे शिक्षण झाले. बंगळुरूच्या आयटीआय कंपनीत आरएनडी विभागात नोकरी केल्यानंतर अवघ्या पाच वर्षांनंतर भाऊ तसेच त्यांचे मेव्हणे श्रीकृष्ण नाईक यांनी ‘अशिदा’ची पायाभरणी केली.
एव्हाना ‘अशिदा’ नावाचा ब्रॅण्ड उदयाला आला होता. १९८३-८४ मध्ये एका फ्रेंच कंपनीने पाठवलेल्या महाकाय क्रेन्सच्या भरवशावर भातसा धरण उभे राहत होते. आयात केल्यानंतर काही महिन्यांतच या क्रेन्स नादुरुस्त झाल्या. या क्रेन्स आणि त्यांचे कंट्रोल पॅनल ‘अशिदा’ने उभे केले. आजचे भातसा धरण हे भाऊ तसेच सुनील कुलकर्णी यांच्या अपरिमित परिश्रमाचे प्रतीक आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. ‘कुटुंब रंगलंय उद्योगात’ असे ‘अशिदा’च्या बाबतीत म्हणता येईल. भाऊ व सुनील कुलकर्णी यांचे चिरंजीव सुजय तथा सुयश हेदेखील आता कंपनीची धुरा समर्थपणे सांभाळत आहेत. याचबरोबर त्यांच्या धर्मपत्नी कंपनीच्या विविध जबाबदार्यांमध्ये आपला मोलाचा वाटा उचलत आहेत. एमएसईबीनंतर ‘अशिदा’ने सर्वात मोठे योगदान रेल्वे खात्यात दिले. रेल्वेची ‘नेत्रा’ नावाची बग्गी ही ‘अशिदा’च्या कौशल्यविकासातून उभी राहिलेली आदर्शवत अशी भारतीय तंत्रकौशल्याचा नमुना आहे, जिने आज युरोपियन एकाधिकारशाही मोडीत काढली.
- भटू सावंत
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/