चित्ता नामशेष होणार?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jan-2018
Total Views |
 

 
 
चित्ता हा जंगलातील सर्वात जलद धावणारा प्राणी. चित्ता त्याच्या धावण्याच्या कौशल्यामुळेच बाकी सगळ्या मांजरांपेक्षा वेगळा ठरतो. ११० ते १२० किमी प्रति तास वेगाने तो पळतो. मात्र, सध्याचे हवामानातील बदल, ग्लोबल वॉर्मिंग या सर्व कारणांमुळे आधीच पृथ्वीवर अनेक समस्या निर्माण होत आहेत. त्याचाच परिणाम आता जगभरातील अनेक प्राणीजीवनावर होणार असल्याचे देखील अनेक संशोधक आणि संस्था व्यक्त करत आहेत.
 
 
 
हे सर्व सांगण्याचा उद्देश असा की नुकत्याच एका संशोधनात हवामान बदल आणि ग्लोबल वॉर्मिंगमुळे चित्त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होऊन चित्ता नामशेष होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नॅशनल जिओग्राफीच्या 'बिग कॅट इनिशिएटिव्ह' उपक्रमाअंतर्गत हे संशोधन करण्यात आले आहे. नॅशनल जिओग्राफीने चित्ता हा प्राणी नामशेष होण्याची शक्यता असल्याचे या संशोधनाच्या अहवालामध्ये म्हटले आहे. 'इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्व्हेशन ऑफ नेचर' या संघटनेनेही आधीच चित्ता या प्रजातीचा ‘असुरक्षित’ प्राण्यांच्या यादीमध्ये समावेश केला आहे.
 
 
 
पुढील १५ वर्षांमध्ये चित्त्यांची संख्या ५३ टक्क्यांनी कमी होण्याची भीती या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. या संशोधनामध्ये नामिबिया, बोसवाना, दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे असा सर्वात मोठा जंगली प्रदेश असणार्‍या देशांमध्येही एकूण ३ हजार ५७७ चित्तेच जिवंत असल्याची नोंद झाल्याचे सांगण्यात आले आहे. चित्त्यांच्या नैसर्गिक अधिवास असणार्‍या जागेपैकी ९० टक्क्यांहून अधिक जागेत मानवाने अतिक्रमण केले आहे. त्यामुळेच चित्ता आणि माणसांचा संघर्ष वाढत असल्याचे नॅशनल जिओग्राफीने म्हटले आहे. संशोधकांच्या मते जगभरातील जंगलांमध्ये केवळ ७ हजार १०० चित्ते उरले आहेत.
एकेकाळी चित्ता हा आफ्रिका युरेशिया व भारतीय उपखंडातील मोठ्या भूभागावर आढळायचा, परंतु आज चित्त्यांचा अधिवास केवळ आफ्रिकेच्या गवताळ प्रदेशापुरते मर्यादित राहिला आहे. याला मुख्य कारण चित्त्यांचे नष्ट झालेले वसतिस्थान. चित्त्यांचे मुख्य वसतिस्थान जे गवताळ प्रदेश आहे, त्यावर शेती व इतर कारणासाठी मानवी अतिक्रमण झाले. तसेच चित्त्यांचे वैशिष्ट्य जे अतिवेग आहे तो चित्त्यांच्या प्रगतीत खरेतर मारक ठरला. चित्त्यांने उत्क्रांतीमध्ये वेग मिळवला खरा परंतु त्याने शारीरिक ताकद गमावली. त्यामुळे बहुतेक वेळा चित्ता त्याच्या पिलांचे इतर भक्षकांपासून अथवा त्याने मिळवलेल्या भक्ष्याचे रक्षण करू शकत नाही. त्यामुळे चित्त्यांची बर्‍याच ठिकाणी संख्या कमी झाली. भारतातील चित्ता ज्याला ‘अशियाई चित्ता’ म्हणत, त्याचा भारतात एकेकाळी मोठ्या भूभागावर वावर होता. भारतातील शेवटचा जंगली चित्ता १९५१ मध्ये आंध्र प्रदेशात दिसला. यानंतर भारतातून जंगली चित्ता दिसल्याची नोंद नाही. त्यामुळे भारतातून चित्ता नामशेष झाला आहे.
 
 
 
महाराष्ट्रातील मुख्यत्वे मराठवाडा, विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रातील कमी पावसाच्या प्रदेशात चित्ता होता, अशी नोंद आहे. विदर्भातील शिकार्‍यांनी चित्त्यांच्या शिकारी केल्याच्या नोंदी आहेत. आशियाई चित्त्यांची आज केवळ इराणमध्ये जवळपास पन्नास इतकी संख्या राहिली आहे. आफ्रिकेतील मुख्यत्वे सव्हानाच्या गवताळ प्रदेशात अजूनही चित्त्यांचे अस्तित्व आहे. जेथे खाद्याची मुबलकता आहे, अशा भागात अजूनही चित्ते मुबलक आढळतात.
 
 
 
 
 
 
 
चित्त्यांच्या अंगावरचे ठिपके भरीव असतात व चेहर्‍यावरील अश्रूंसारख्या दिसणार्‍या रेषा हे त्याचे वैशिष्ट्य आहे. चित्त्याला ओळखण्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे अंगावरचे ठिपके. ठिपक्यांमुळे बिबट्या आणि चित्तामध्ये लोक नेहमी गफलत करतात. परंतु दोन्ही प्राण्यांत मूलभूत फरक आहे. चित्त्यांच्या अंगावरचे ठिपके हे भरीव असतात तर बिबट्याचे आतून पोकळ असतात. चित्याचे ठिपके हे २ ते ३ सें.मी. व्यासाचे असून ते केवळ बाह्य भागातील त्वचेवर असतात. पोट व पायांच्या आतील भागांवर ठिपके नसतात. चित्त्याच्या चेहर्‍यावर दोन काळ्या रेषा असतात त्या ओघळणार्‍या अश्रूंप्रमाणे दिसतात. बाकी शरीरयष्टीमध्ये दोन्हींमध्ये मूलभूत फ़रक आहे. बिबट्याची शरीरयष्टी ही भरभक्कम मांजरांसारखी गुबगुबीत असते, तर चित्याची कुत्र्याप्रमाणे लांबसडक जोरात पळण्यास सक्षम अशी असते. चित्त्यांची छाती ही खोलवर व कंबर अतिशय बारीक असते. पाय अतिशय लांबसडक व लवचिक असतात. चित्त्यांचे वजन साधारणपणे ४० किलोग्रॅमपर्यंत भरते. त्याची लांबी सव्वा ते १.३५ मी.पर्यंत भरते. चित्त्यांची शेपटी साधारणपणे ८४ सें.मी.पर्यंत असते. लांब शेपटीचा उपयोग चित्त्याला पळताना दिशा बदलायला होतो. शेपटीच्या टोकाला सुरेख काळा पुंजका असतो. चित्त्याचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या नख्या. चित्त्यांना इतर मांजरांप्रमाणे नखे पूर्णपणे आत घेता येत नाहीत. ती अर्धवट बाहेर, अर्धवट आत घेता येतात, तर मांजरांना पूर्णपणे आतबाहेर करता येते. याचा फायदा चित्त्यांना अतिवेग घेण्यास झालेला आहे.
 
 
 
चित्ता हा लांबी रुंदीत मांजरांमध्ये मोठ्या आकारात येत असला तरी तो पँथर उपकुळात येत नाही. त्याचे कारण चित्त्याला डरकाळी फोडता येत नाही तसेच गुरगुरतादेखील येत नाही. चित्ता केवळ लहान मांजरांप्रमाणे क्यांव क्यांव करू शकतो.
अतिवेगासाठी सक्षम होण्यास चित्त्यामध्ये मोठ्या नाकपुड्या, मोठी फुप्फुसे व वेगाने पळू शकणारे हृदय विकसित झाले आहे. चित्ता हा मांसभक्षक असून त्याच्या आहारात छोट्या हरिणांचा समावेश होतो. आफ्रिकेत मुख्यत्वे इंपाला, विविध प्रकारचे गज़ेल्, स्प्रिंगबक हे त्याचे खाद्य आहे. कधीकधी मोठे प्राणी जसे की झेब्रा किंवा वाईल्ड बीस्ट या प्राण्यांचीही शिकार करण्यात चित्ता यश मिळवतो. चित्ताचे अतिशय वेगवान होण्याचे कारण त्याचे खाद्य आहे. वरील हरिणे हीदेखील अतिशय वेगाने पळू शकतात व त्यांना गाठण्यासाठी चित्त्याला अतिवेग मिळवावा लागतो.
 
 
 
चित्ता साधारणपणे दिवसा शिकार करतो. सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उन्ह ओसरल्यानंतर तो शिकार करतो. दुपारच्या उन्हात तापमानामुळे तो शिकार करणे टाळतो. दुरून शिकार टेहाळल्यावर भक्ष्याच्या जास्तीतजास्त जवळ दबा धरून जातो व साधाराणपणे १० ते २० मीटरमध्ये भक्ष्य आल्यावर तो जोरदार वेगवान चाल करतो. चित्त्यांची ही चाल पाहणे अतिशय नेत्रसुखद अनुभव असतो. अनेक छायाचित्रकार चित्त्याचा हा क्षण टिपण्यास आतुर असतात. चित्ता कधी लांबवर खूप काळ पाठलाग करत नाही. चित्त्याला वेग असला तरी लांबवर पाठलाग करण्याचे बळ त्याच्याकडे नसते. साधारणपणे १ ते दीड मिनिटापर्यंत पाठलाग करून शिकार साधतो. नाही जमल्यास तात्पुरता शिकारीचा नाद सोडून देतो. पाठलाग करताना चित्ता आपल्या शिकारीला सरळसरळ गळा पकडून ठार मारत नाहीत. पाठलागादरम्यान पहिले शिकारीला पाडायचा डाव असतो व त्यानंतर त्याचा वेग कमी होतो व मग जखमी करून मग शिकारीला मारण्यात येते. शिकार साधल्यानंतर चित्ता बराच वेळ दम खातो. त्याचे शरीराचे तापमान पाठलागादरम्यान प्रचंड वाढते व ते कमी करण्यात बराच वेळ जातो.
 
 
 
मादी चित्ता एका वेळी एक ते नऊ पिल्लांना जन्म देऊ शकते. जन्माच्या वेळी, चित्त्याला मानेवर मऊ केस असतात. पाठीच्या मधल्या भागातील मऊ केस आयाळासारखे भासतात. मात्र जसजसे चित्त्यांचे वय वाढते त्याच्या मानेवरचे हे केस निघून जातात. जन्मानंतर चित्ता तेराव्या ते विसाव्या महिन्यापर्यंतच आपल्या आईसोबत असतो. त्यानंतर तो स्वतंत्र आयुष्य जगू लागतो. नर चित्त्यांच्या तुलनेत मादी चित्ता एकटे राहणे जास्त पसंत करते. अशा या चित्त्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. जर ते नामशेष होत गेले तर मानवी जीवनात येणाऱ्या पुढील पिढ्यांना तो फक्त पुस्तकातच दाखवावा लागेल.
 
 
 
- पूजा सराफ
 
 
@@AUTHORINFO_V1@@