आफ्रिकेचा संघ १९४ धावांमध्ये गारद! भारत एक बाद ४९ धावांवर
जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या तिसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात काल भारतीय संघाच्या गोलंदाजांनी उत्तम कामगिरी केल्याने दक्षिण आफ्रिकेचा संघ अवघ्या १९४ धावांमध्ये गारद झाला. यामध्ये जसप्रीत बुमराहने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करत आफ्रिकेचा निम्मा संघ तंबूत पाठवला. त्याने ५४ धावांच्या मोबदल्यात पाच गडी बाद केले. भुवनेश्वर कुमारनेही त्याला उत्तम साथ देत ४४ धावांमध्ये मोक्याच्या क्षणी तीन बळी टिपले.
भारताच्या १८७ धावांचा पाठलाग करत दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावाची सुरुवात झाली. भुवीने आफ्रिकेचे सलामीवीर अगदी स्वस्तात माघारी धाडले. संघाची धावसंख्या १६ असतानाच दोन्हीही सलामीवीर तंबूत परतले होते. त्यानंतर एक- एक करून बुमराहने पाच फलंदाजांना आपल्या जाळ्यात अडकवले. यात हाशिम आमलाचा बळी सर्वात महत्वाचा ठरला. कारण आमलाने आफ्रिकेसाठी सर्वाधिक धावा करत (६१) संघाला एका मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहचविण्याचा जणू चंगच बांधला होता. परंतु बुमराहने त्याचे मनसुबे नाकाम ठरवले.
पहिल्या डावात आफ्रिकेचा संघ १९४ धावांमध्ये बाद झाल्याने त्यांना केवळ सातच धावांची आघाडी मिळाली आहे. काल भारताने दुसऱ्या डावाची सुरुवात करताना संयमी खेळी करणं पसंद केलं. या डावात आश्चर्यकारकरित्या पार्थिव पटेलला बढती मिळाल्याचे दिसून आले. मुरली विजय सोबत तो सलामीला आला होता. परंतु कर्णधार विराट कोहलीचा हा प्रयोगात्मक फार यशस्वी होऊ शकला नसल्याचेच दिसून आले. पार्थिव १६ धावांवर फिलँडरच्या गोलंदाजीवर बाद झाला. पण दुसरीकडे विजय चिवट खेळी करून ४९ चेंडूत १३ धावा करत खेळपट्टीवर टिकून राहिला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताची ४९ धावांवर १ बाद अशी आश्वासक परिस्थिती होती. आजच्या तिसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांनी उत्तम खेळी केल्यास या सामन्यात विजय मिळवणे त्यांना अवघड होणार नाही.