पाण्यावरून रणकंदन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Jan-2018   
Total Views |
 

 
 
मानवी जीवनात पाण्याचे महत्त्व काय सांगावे? पूर्वी मानवी वस्ती ही पाण्याजवळच स्थिरावली, कारण पाण्याचे असलेले अनन्यसाधारण महत्त्व. अन्नावाचून मनुष्य २१ दिवस जिवंत राहू शकतो, असं म्हणतात. पण, पाण्यावाचून फक्त आठवडा किंवा त्यापेक्षाही कमी. पाण्यावाचून मनुष्य राहूच शकत नाही, हे त्रिकालबाधित सत्य आहे. या पाण्यामुळे पूर्वी अनेक युद्धेही झाली. भारत-पाकिस्तान शत्रुत्व असण्याचे कारण नद्यांच्या पाण्याच्या वाटपाचेही आहे. तिसरे महायुद्ध हे पाण्यासाठी होईल, असेही भविष्य वर्तवले जाते. पण, हे तिसरे युद्ध होईल तेव्हा होईल. पण, भारतात या पाण्यावरूनच रा-ज्यराज्य आणि जिल्हा-जिल्ह्यात भांडणं निर्माण झाली आहेत. सध्या गोवा आणि कर्नाटक या दोन राज्यांत महादाई नदीच्या पाणीवाटपावरून संघर्ष निर्माण झाला असून कर्नाटकाने अगदी संपही पुकारला आहे.
 
स्वातंत्र्योत्तर अशीच परिस्थिती निर्माण झाल्याने केंद्र सरकारने १९५५ साली आंतरराज्य जलविवाद अधिनियम लवादाची निर्मिती केली. या अधिनियमानुसार जेव्हा दोनपेक्षा अधिक राज्यांत पाणीवाटपावरून वाद निर्माण होतो, तेव्हा या लवादाची निर्मिती होते. या लवादात तीन सदस्य असतात. त्यापैकी एक अध्यक्ष असतो. हे तीनही सदस्य उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयाचे कार्यरत सदस्य असतात. १९६९ साली महाराष्ट्र, आंध्र आणि कर्नाटक या तीन राज्यांत पाणी वाटपावरून जेव्हा वाद निर्माण झाला, तेव्हा कृष्ण लवाद निर्माण झाला. असे लवाद वेळोवेळी निर्माण झाले आणि त्यांनी हे वाद, प्रश्न सोडविण्याचे पुरेपूर प्रयत्न केले आहेत. पण, प्रश्न असा आहे की असे वाद का निर्माण होतात? तर भारतात चार महिने पाऊस पडतो. आपण फक्त या नद्यांच्या पाण्यावर अवलंबून असतो. पाण्यावरुन रणकंदन निर्माण होण्याचे एक कारण असे की नदीतील पाणीसाठा आणि राज्यांची पाण्याची गरज यात मोठी तफावत असते.
 
पाणीसाठा कमी असतो आणि गरज मोठी असते. आजही जर या नद्यांच्या पाणीवाटपावरून आपण भांडत असू तर ते आपले अपयश आहे. २१ व्या शतकात पाण्याचे नियोजन, पाणीस्रोताचे पुनरुज्जीवन, नद्याजोड प्रकल्प हे आखण्यात अपयशी पडलो आहोत. कावेरी नदीच्या पाणी वाटपावरून गृहयुद्ध सुरू होईल की काय, अशी अवस्था निर्माण झाली होती. आता गरज आहे हवामानाचे योग्य आडाखे बांधून पाण्याचे नियोजन करण्याची. महाराष्ट्रात ‘जलयुक्त शिवार’ आणि ‘मागेल त्याला शेततळे’सारख्या योजना देशभरात तालुका पातळीवर राबविण्याची नितांत गरज आहे.
 
 
- तुषार ओव्हाळ

 
@@AUTHORINFO_V1@@