गेल्या सहा महिन्यांपासून तयारी सुरू असलेल्या या सोहळ्याची तामिळनाडूमध्ये सर्वत्र चर्चा दिसून येत होती. दि. २२ जानेवारी रोजी भल्या पहाटेच जवळपास दोन लाख स्क्वेअर फुटाचा मंडप सेवेकर्यांच्या उपस्थितीने खचाखच भरला होता. भव्य व्यासपीठ, बैठक व्यवस्था, व्यासपीठावरील सोहळ्याची माहिती देणारे फलक लक्ष वेधून घेत होते. सकाळी उपस्थित सेवेकर्यांनी एका सुरात आरती केली. त्यानंतर श्रीराम सेतू पूजन व मुख्य लिंगार्चन सोहळा संपन्न झाला. सर्व सेवांमध्ये गुरुमाऊलींनी सपत्निक हजेरी लावून सहभाग नोंदविला. या निमित्ताने गुरूमाऊली प.पू. आण्णासाहेब मोरे यांनी श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे पंचांग २०१८-१९ व क्षात्रधर्म ग्रंथाचे प्रकाशन केले. तसेच सर्वांशी हितगुज केले. ते म्हणाले,“आज आपण सर्व भाग्यवान आहात, जन्मोजन्माचे पुण्यसंचय ज्यांच्या जवळ आहे तेच रामेश्वरी येतात व आपल्या भावी पिढ्यांसाठी आशीर्वाद घेऊन जातात. स्वत:साठी रामेश्वराजवळ आशीर्वाद मागायचे आहेतच पण आपण आज भारतमाता समृध्द बनावी, तिचे रक्षण व्हावे यासाठी ही अत्युच्च अशी सेवा करीत आहोत. अतिरेकी कारवाया, युध्द, महायुध्द, रोगराई, दुष्काळ, जलप्रलय, भ्रष्टाचार, अनाचार यापासून भारतमातेचे रक्षण व्हावे, देशांतर्गत व बाहेरील शत्रूंपासून तिचा बचाव व्हावा, ती आर्थिकदृष्ट्या संपन्न व्हावी. देशातील जातीय, धार्मिक, प्रांतवाद, नष्ट होऊन माणुसकीचा धर्म वाढीस लागावी या उदात्त हेतूने ही सेवा करीत आहोत असे त्यांनी यावेळी नमूद केले.
रामेश्वरात सुध्दा सेवाकेंद्राची स्थापना