राष्ट्रीय सेवा योजनांतर्गत विशेष शिबिराचे थाटात उद्घाटन संपन्न
गडचिरोली: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारधारणेतून तथा संकल्पनेतून राष्ट्रीय सेवा योजना सुरु झाली. आपला भारत देश कृषिप्रधान देश म्हणून ओळखल्या जाते. आपल्या देशाची अर्थरचना सुध्दा शेतीतील उत्पन्नावर अवलंबून आहे. अर्थात शेती ही अर्थरचनेचा कणा आहे. म्हणूनच आपल्याला कृषी महाविद्यालयात मिळालेले तांत्रिक ज्ञान ग्रामीण भागातील शेतकऱ्यापर्यंत पोहचवा असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर यांनी केले.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी महाविद्यालय गडचिरोली येथील विद्यार्थ्यांचे विशेष शिबीर आयोजित केले आहे. या शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कृषी महाविद्यालय गडचिरोली आणि ग्रामपंचायत पारडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयेाजित पारडी महोत्सव २०१८ चे आजपासून शुभारंभ होत आहे.
१९६९ पासून केंद्र सरकारच्या माध्यमाने प्रत्येक महाविद्यालयाला विद्यार्थ्यांकडून राष्ट्रीय सेवा योजना राबविण्यासाठी आदेशित करण्यात आले आहे. व या विद्यार्थ्यांकडून शेती, आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, पशुसंवर्धन आदी विविध विषयावर मार्गदर्शन करणे, श्रमदानातून स्वच्छता अभियान राबविण्याचा कार्यक्रम आयोजित केल्या जाते. याकरीता ग्रामस्थांचे सहकार्य घेऊन त्यांच्यात जागृती निर्माण करण्याचे महत्वाचे काम करण्यात येते. यामधुनच विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातील अडीअडचणी जाणता येतात. या एक आठवडयाच्या काळात रचनात्मक काम करण्यासाठी मिळालेली संधी आहे असेही दैठणकर म्हणाले.