नवी दिल्ली : ज्येष्ठ कलावंत मोहन जोशी, हिंदुस्थानी शास्त्रीय गायक पदमा तळवळकर, प्रभाकर कारेकर यांना आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आले.
केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्यावतीने आज राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपतींच्या हस्ते वर्ष - २०१६ च्या संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले. संगीत नाटक अकादमी शिष्यवृत्ती प्राप्त पुरस्कार्थींना 3 लाख रूपये रोख अंगवस्त्र आणि ताम्रपट प्रदान करण्यात आले. तर संगीत नाटक अकादमी पुरस्कार्थींना १ लाख रूपये रोख, अंगवस्त्र आणि ताम्रपट प्रदान करण्यात आले. यावर्षी ४ मान्यवरांना अकादमी शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली तर ४३ कलाकारांना अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
चित्रपट तसेच नाटकातून अभिनय करणारे प्रसिद्ध कलावंत मोहन जोशी यांना अभियन क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी यंदाचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला. मोहन जोशी यांनी अनेक नाटकांमध्ये तसेच चित्रपटांमध्ये अभिनय केलेला आहे. यामध्ये आगऱ्याहून सुटका, झालं गेलं गंगेला मिळालं, माझ छान चाललंय ना, मा. राष्ट्रपती, आंधळी कोशिंबीर, आसू आणि हसू, कलम 302, धर्मयुद्ध, लष्कराच्या भाक-या अशा अनेक नाटकांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. यासह १५० पेक्षा अधिक मराठी तसेच हिंदी चित्रपटात काम केलेले आहे. मोहन जोशी यांना आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आले.
पदमा तळवळकर या हिंदुस्थानी शास्त्रीय गायिका आहेत. खयाल गायकीसाठी त्या प्रसद्धि आहेत., तळवळकर यांनी ग्वालेर, किराना आणि जयपूर घराण्यातून खयाल गायकीचे शिक्षण घेतलेले आहे. तळवळकर या जयपूर-अत्रौली घराण्याच्या आहेत. त्यांनी प्रसिद्ध तबला वादक पंडित सुरेश तळवळकर यांच्याशी लग्न केले असून त्यांना सत्यजीत आणि सावनी हे दोन अपत्य आहेत. ते ही तबलावादक आहेत. श्रीमती तळवळकर यांना भुलाभाई मेमोरियल ट्रस्टची शिष्यवृत्ती प्राप्त झाली होती, यासह राष्ट्रीय कला प्रदर्शन केंद्राची त्यांना फेलोशिप मिळाली. श्रीमती तळवळकर पंडित जसराज गौरव पुरस्कार २००४, श्रीमती वत्सला भीमसेन जोशी पुरस्कार २००९, राजहंस प्रतिष्ठान पुरस्कार २०१० ला प्राप्त झालेले आहे.
पंडित प्रभाकर कारेकर हे हिंदुस्थानी शास्त्रीय गायक आहेत. त्यांचा जन्म गोव्याचा असून त्यांची संपूर्ण कारर्कीद ही मुंबईतील आहे. त्यांनी आग्रा घराणा आणि ग्वालेर घराण्यातून शास्त्रीय गायनाने धडे गिरविले. यासोबतच पं. जितेंद्र अभिषेकी आणि पं. सी आर व्यास यांच्याकडूनही त्यांनी गायनाचे धडे घेतले. ते नाकातून गात असल्यामुळे त्यांच्या आवाजात कुठलाही राग अधिक बहरत असल्यामुळे ते कार्यक्रमात श्रोत्यांना मंत्रमुग्ध करतात. आकाशवाणीवर त्यांनी अनेक कार्यक्रम सादर केलेली आहेत.